

केळिल गावातून जाणारा घाट केळघाट म्हणून नावारूपास आला होता. म्हापसा, साखळी आदी ठिकाणचे व्यापारी, यात्रेकरू, प्रवासी सोनाळ- म्होवाचा गुणो येथून हिवाळ्यात, उन्हाळ्यात म्हादई नदी ओलांडून केळघाटमार्गे हळशी खानापूर आणि परिसरात जायचे. गवाळी जवळच्या तळेवाडी येथे भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी गोवा, कोकणातले व्यापारी केळघाटातून ये-जा करायचे.
कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील एकेकाळी महत्त्वपूर्ण असलेला केळिल हा महसुली गाव, आज इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. २०११ साली कर्नाटक राज्यातल्या समृद्ध अशा १९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळातल्या जंगलाला भीमगड अभयारण्याचा दर्जा प्रदान केला आणि सध्या कर्नाटक सरकारच्या वन्यजीव विभागाने केळिल गावातून जाणारा ऐतिहासिक घाटमार्ग ये-जा करण्यासाठी
तसेच वाहतूक, दळणवळणासाठी कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने, त्याच्याशी निगडीत शेकडो वर्षांचा इतिहास आणि संस्कृती विस्मृतीत जाणार आहे. १८७८ साली अँग्लो पोर्तुगीज तहानुसार कर्नाटकातील लोंढाहून गोव्यातील मुरगाव बंदराला जोडणारा जेव्हा ८३ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग कार्यान्वित झाला, तेव्हा प्राचीन आणि मध्ययुगीन काळात वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा ठरलेला आणि कृष्णापूर जवळील केळिल गावातून जाणाऱ्या केळघाटाचा वापर कमी कमी होत गेला.
केळिल गावातून जाणारा घाट केळघाट म्हणून नावारूपास आला होता. म्हापसा , साखळी आदी ठिकाणचे व्यापारी, यात्रेकरू, प्रवासी सोनाळ- म्होवाचा गुणो येथून हिवाळ्यात, उन्हाळ्यात म्हादई नदी ओलांडून केळघाटमार्गे हळशी खानापूर आणि परिसरात जायचे. गवाळी जवळच्या तळेवाडी येथे भरणाऱ्या आठवडी बाजारासाठी गोवा, कोकणातले व्यापारी केळघाटातून ये-जा करायचे.
मोगल साम्राज्याखाली जेव्हा गोवा आणि त्याच्याशी संलग्न असणारा प्रदेश आला, तेव्हा त्यांनी कोकणातल्या त्याचप्रमाणे सत्तरी, डिचोली, पेडणे आदी महालांसाठी (भिवगड )भीमगड परगण्याची निर्मिती करून, त्याचे मुख्यालय किल्ल्यावर स्थापन केले होते.
मुगल, त्याचप्रमाणे शिवशाहीत महसूल गोळा करण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनाच्या सोयीखातर अनेक गावांचा एकत्रित परगणा निर्माण केला जायचा. भीमगड जेव्हा परगणा म्हणून अस्तित्वात होता,
तेव्हा केळिल आणि तेथून जाणारा केळघाट व्यापारी, यात्रेकरू यांना विशेष परिचित होता. आज सत्तरीतील करंजोळ गावात बोंदीर नावाचा वाडा असून, पर्शियन भाषेत बोंदीरचा अर्थ बंदर असा होतो. गोवा पर्यटन विकास महामंडळाने जेव्हा चित्तथरारक असा ‘व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टींग’चा उपक्रम सुरू केला तेव्हा त्यांनी बोंदीर ते सोनाळ या जलमार्गाला प्राधान्य दिलेले आहे.
गोवा कंदब राज्यकर्त्यांची घाट माथ्यावरती हळशी राजधानीला ये-जा करण्यासाठी जुन्या काळी खानापूर, शिरोली, हेम्माडगा, तळेवाडी, केळिल या गावांतून कार्यान्वित असणाऱ्या केळघाटाचा वापर केला जात असावा आणि त्याच काळात केळिलजवळ कृष्णापूर नावारूपास आले असावे. १८०० फूट उंचीवरती वसलेल्या या किल्ल्याची सुमारे १३८० फूट लांबीच्या दगडी भिंतीचे जे जीर्णावशेष.
तसेच शेकडो वर्षांच्या इतिहासाशी नाते सांगणाऱ्या दगडावरती कोरलेली मत्स्याकृती, नैसर्गिक गुंफा त्याचप्रमाणे धार्मिक, सांस्कृतिक संचिते, तोफा अस्तित्वात होत्या, त्यावरून भीमगडाच्या गतवैभवाची कल्पना येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा बेळगाव आणि परिसरातल्या प्रदेशावरती ताबा मिळवला, तेव्हा त्यांचे वास्तव्य भीमगडावाती असल्याचे ऐतिहासिक दफ्तरात संदर्भ उपलब्ध आहेत.
कारवार येथील ब्रिटीश अधिकाऱ्याने १४ मार्च १६६५ च्या पत्रात; शिवाजी येथून २५ मैलावर भीमगडाला आहे. मोंगलावर तो चालून जाईल असे म्हणतात. मोंगल दरदिवशी विजापूरच्या जवळ जवळ जात असून, तेथील शहा भेदरून गेला, असा उल्लेख केलेला आहे.त्यानंतरच्या काही कागदपत्रांत छत्रपती संभाजी महाराज भीमगडावरती कवी कलशासह वास्तव्यास असल्याचा उल्लेख आहे.
त्यावेळी भीमगडाशी संबंधित केळघाट मार्गाचा प्रामुख्याने उपयोग होत असला पाहिजे. गोव्यात सौंधे संस्थानाच्या ऐतिहासिक दफ्तरातील उपलब्ध दोन पत्रांत केळघाटाचा उल्लेख आलेला आहे. सौंधे राजाचा अधिकारी वीरवादर नवरू याने पोर्तुगीज सचिवाला केळघाटमार्गे शिरसीला जाणाऱ्या बारा माणसांना प्रवास करण्यास परवानगी देण्यासंदर्भात पत्र २० जानेवारी १७८९ रोजी लिहिले होते.
१२ नोव्हेंबर १७८९ रोजी पुन्हा एकदा वीर वादर नवरु याने पोर्तुगीज सचिवाला लिहिलेल्या पत्रात खांडेपार तपासणी नाक्यावरती सावनूर येथून केळघाटमार्गे प्रवास करणाऱ्या काही लोकांना परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली होती. १७१९ मध्ये भीमगड किल्ला छत्रपती शाहू महाराजांच्या ताब्यात आला आणि त्यानंतर १७८७ साली या किल्ल्यावर नेसगिरी या संस्थानाच्या प्रमुखाच्या काही काळ अख्यातरीत गेला.
परंतु त्यानंतर आपल्या सत्तेला वारंवार उपद्रव करणाऱ्या आणि भीमगडावर आश्रय घेणाऱ्या बंडखोरांना अद्दल घडवण्यासाठी ब्रिटिशांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला होता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सदर किल्ला आणि केळघाट मार्ग बराच काळ विस्मृतीत गेला. २०११ साली तळेवाडीच्या बारापेडा गुंफांच्या एका ठिकाणी व्रॉटन फ्रि टेल्ड आणि कृष्णापूर येथील आक्री कोक्री येथील नैसर्गिक गुंफेत असलेल्या तापोझायट थिओ बाल्डी वटवाघळाच्या दुर्मिळ आणि
संकटग्रस्त प्रजातींबरोबर पट्टेरी वाघ, अस्वले, बिबटे, भुजंग, विहरणारी मलय शेकरू आदी वन्यजीवांचा तसेच दुर्मिळ वृक्षवेलींचे वैभव असल्याने भीमगड किल्ल्यावरून नव्या अभयारण्याला हे नाव देण्यात आल्याने, हा किल्ला आणि जैविक संपदेची श्रीमंती मिरवणारा हा परिसर चर्चेत आलेला आहे.
आज भीमगड अभयारण्याच्या निर्मितीमुळे कर्नाटक सरकारने दुर्गम आणि रस्ता तसेच नागरी सुविधेअभावी संत्रस्त असणाऱ्या तळेवाडी, गवाळी, केळिल -कृष्णापूर आदी भागांतील कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी स्थानिक लोकांच्या सहकार्याने योजना कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळे केळिल कृष्णापूर १६८४.४६ हेक्टर क्षेत्रफळात वास्तव्य करणाऱ्या १३ घरांतील कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे ठरवलेले आहे.
खानापूर तालुक्यातील शिरोली ग्राम पंचायत क्षेत्रात येणारा आणि सत्तरीतील सावर्डे ग्राम पंचायत क्षेत्राशी सीमा भिडलेला केळिल गाव आणि ऐतिहासिक केळघाट विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहे. चुनखडीच्या गुंफा आणि भूविज्ञानाच्या चमत्कृतीचा प्रत्यय देणारे शिलाखंड, बारामाही वाहणारी म्हादई आणि महशीर माश्यांचे देवडोहाद्वारे संवर्धन आणि संरक्षण करणारी पिस्त्याची कोंड हे नैसर्गिक आणि भूविज्ञानाचे संचित त्याचप्रमाणे आदि मानवांच्या पाऊलखुणा जपणारा हा परिसर म्हणजे अनमोल खजिना आहे.