

पणजी: करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर पकडल्या जाणाऱ्या माशांबाबत ‘असुरक्षित’ असल्याचा दावा करणाऱ्या अहवालावर कारंझाळेतील मच्छीमारांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अहवालाबाबत स्पष्टता देण्याची मागणी केली.
गोवा विद्यापीठाच्या एका अभ्यास अहवालात करंझाळे किनाऱ्यावर मिळणारे मासे प्रदूषित व मानवाने खाण्यासाठी असुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मच्छीमारांनी हे आरोप दिशाभूल करणारे असून त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले.
मच्छीमारांचे म्हणणे आहे की, करंझाळे किनाऱ्यावरून पकडले जाणारे मासे सुरक्षित असून वर्षानुवर्षे नागरिक ते सेवन करत आहेत. कोणतीही ठोस व सर्वसमावेशक वैज्ञानिक तपासणी न करता असे निष्कर्ष जाहीर करणे चुकीचे आहे. विशिष्ट हितसंबंधांपोटी कारझाळे समुद्रकिनारा ‘हस्तगत’ करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.
गोवा विद्यापीठ व राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था येथील शास्त्रज्ञांनी पुढील तीन दिवसांत याविषयावर स्पष्ट भूमिका मांडावी व करंझाळे किनाऱ्यावरील मासे खाण्यास सुरक्षित आहेत की नाहीत, याबाबत ठोस माहिती जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. स्पष्टता न आल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
करंझाळे परिसरात आढळलेल्या माशांमधील प्रदूषण व त्यामध्ये धातू असल्याच्या आरोपांबाबतचा अहवाल अद्याप सरकारकडे प्राप्त झालेला नाही, अशी माहिती मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली. संबंधित अहवाल मिळाल्यानंतरच याविषयावर सरकार आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करेल, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.