Weather Impact Fishing : सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघरसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर सध्या वेगवान आणि थंड वारे वाहत आहेत. अरबी समुद्राच्या पाण्याचे तापमान अचानक खालावल्याने मासळी खोल समुद्रात किंवा सुरक्षित ठिकाणी निघून गेली आहे. यामुळे मासे मिळणे कठीण झाले असून, खोल समुद्रात गेलेल्या ३०० हून अधिक बोटींना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. या परिस्थितीमुळे हजारो मच्छीमार बांधवांच्या उपजीविकेवर टांगती तलवार निर्माण झाली असून किनारपट्टीवर चिंतेचे ढग दाटले आहेत.
खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे ही एक मोठी आर्थिक गुंतवणूक असते. उरणच्या करंजा बंदरातील एका मच्छीमाराने दिलेल्या माहितीनुसार, एका बोटीला सहा दिवसांच्या सफरीसाठी किमान साडेतीन लाख रुपये खर्च येतो. यात डिझेलसाठी तीन लाख, तर बर्फ, रेशन आणि १७ कामगारांच्या पगाराचा समावेश असतो.
काही धाडसी मच्छीमारांनी मासळी मिळेल या आशेने समुद्रात १२-१२ दिवस मुक्काम ठोकला, पण डिझेल आणि अन्न संपल्यानंतर अखेर त्यांना माघार घ्यावी लागली. इतका मोठा खर्च करूनही पदरात काहीच न पडल्याने मच्छीमार पूर्णपणे कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मासळीची आवकच घटल्याने केवळ मच्छीमारच नाही, तर बाजारात मासळी विकणाऱ्या महिलाही अडचणीत आल्या आहेत. "विकायला मासळीच नाही, तर उदरनिर्वाह कसा करायचा?" असा आर्त सवाल या महिलांकडून विचारला जात आहे. मासळीचा तुटवडा निर्माण झाल्याने दरात वाढ झाली असली, तरी मुळात मालच उपलब्ध नसल्याने छोटे विक्रेते आणि ग्राहक दोघेही हवालदिल झाले आहेत.
पर्ससीन नेट फिशिंग संघटनेचे प्रतिनिधी रमेश नाखवा यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. "अरबी समुद्रातील शीतलहरींमुळे मासळीचा दुष्काळ पडल्यासारखी स्थिती आहे. मच्छीमारांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे," असे त्यांनी नमूद केले. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका बसलेल्या मच्छीमार कुटुंबांना शासनाने तातडीने आर्थिक मदत किंवा डिझेल सवलत द्यावी, अशी आग्रही मागणी आता किनारपट्टीवरून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.