

POK Violence Pakistan Army Firing: पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये सध्या अत्यंत भीषण आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक आंदोलक आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षामध्ये तब्बल 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. पाकिस्तानी सैन्याने आंदोलकांचा थरारक पाठलाग करुन त्यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये आतापर्यंत 100 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या अमानुष कारवाईमुळे संपूर्ण पूंछ आणि रावलकोट भागात लष्करी राजवटीविरुद्ध कमालीचा असंतोष पसरला.
स्थानिक पातळीवर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या 'जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी'ने पाकिस्तानी सैन्यावर अत्यंत गंभीर आरोप केले असून, रावलकोट येथील एका अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या निष्पाप नागरिकांवर सुरक्षा दलांनी अचानक बेछूट गोळीबार केल्याचे म्हटले.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहजेब नावाच्या मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेदरम्यान उपस्थित नागरिक पाकिस्तानी सैन्य आणि शाहबाज शरीफ सरकारच्या हुकूमशाही धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत होते. हा विरोध सहन न झाल्याने पाकिस्तानी रेंजर्सनी थेट जमावावर गोळीबार सुरु केला. कमिटीचा असाही आरोप आहे की, सैन्याने केवळ गोळीबारच केला नाही तर मृत पावलेल्या आंदोलकांचे मृतदेहही स्वतःसोबत जबरदस्तीने वाहनात भरुन नेले. अवामी ॲक्शन कमिटीने आज एका मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु त्यापूर्वीच लष्कराने 27 लोकांना गोळ्या घालून ठार केले. या आंदोलनाचे प्रमुख नेते शौकत नवाज मीर यांना तर 'बघताक्षणी गोळ्या घालण्याचे' आदेश जारी करण्यात आले.
या भीषण नरसंहारानंतर रावलकोट आणि परिसरातील मशिदींमधून लाऊडस्पीकरद्वारे सातत्याने एकच आवाहन केले जात आहे की, ‘आपल्या काश्मीरवर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला.’ मशिदींमधील या घोषणेनंतर लोकांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडून सैन्याचा मुकाबला करण्याचे आवाहन केले जात आहे. आणखी एका धक्कादायक वृत्तानुसार, सोमवारी झालेल्या या गोंधळात पंजाब रेंजर्सनी स्वतःच्याच तीन पोलिसांना गोळ्या घातल्या, ज्यात एका सब-इन्स्पेक्टरचाही समावेश आहे. लोकांमध्ये समन्वय राहू नये आणि आंदोलनाची माहिती जगभरात पसरु नये, यासाठी संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प करण्यात आली.
वास्तविक पाहता, या हिंसाचाराची पाळेमुळे राजकीय अन्यायात आणि मूलभूत सुविधांच्या कमतरतेमध्ये दडलेली आहेत. येत्या जुलै महिन्यात या भागात विधानसभा निवडणुका होणार आहेत, ज्यापूर्वी येथील जनतेने योग्य राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी लावून धरली आहे. PoK मधील विधानसभेत जम्मू-काश्मीरमधून विस्थापित होऊन पाकिस्तानात राहणाऱ्या लोकांसाठी 12 जागा राखीव आहेत. या जागांमुळे गैर-स्थानिक लोक येथील राजकारणावर ताबा मिळवतात आणि पाकिस्तानचे मुख्य राजकीय पक्ष या क्षेत्राला नियंत्रित करतात. या 12 जागा रद्द करण्याच्या मुख्य मागणीसोबतच स्थानिक नागरिक स्वस्त वीज, आर्थिक सुधारणा, मोफत आरोग्य सेवा आणि अन्नधान्याची मागणी करत आहेत.
पाकिस्तान (Pakistan) सरकारने वर्षानुवर्षे या भागाकडे दुर्लक्ष केले असून, आता हक्काची मागणी करणाऱ्या आपल्याच नागरिकांना थेट "भारतीय एजंट" ठरवून त्यांचा आवाज दडपण्याचा क्रूर प्रयत्न लष्कर करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.