एप्रिल-मे महिन्यात मनसोक्त आंबे खाऊन झाले की वेध लागतात पावसाचे. वरुणराजाने वेळेवर यावे व तापलेल्या भूमीला, मलूल झालेल्या तना-मनाला पुन्हा ताजेतवाने करावे ही सर्वांचीच इच्छा असते. हवाहवासा पाहुणा येण्याअगोदर आपण त्याच्या स्वागताची जशी जय्यत तयारी करतो तसेच वरुणराजाच्या आगमनापूर्वीही खूप काही करावे लागते.
पावसाची पहिली सर आबालवृद्धांना सुखावते हे खरे पण आरोग्याचा विचार करता पावसाळ्यामध्ये सर्वांनाच आरोग्यरक्षणासाठी तत्पर राहायला हवे. उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होणे स्वाभाविक असले तरी या दोन्ही ऋतूंमध्ये फरक खूप जास्ती आहे. उन्हाळ्यात तळपता सूर्य असतो तर पावसाळ्यात कधी कधी दिवसभरात एकदाही सूर्यदर्शन होत नाही. उन्हाळ्यात उष्णतेमुळे हवा कोरडी असते तर पावसाळ्यात हवेत खूप दमटपणा असतो.
उन्हाळ्यात हवा गरम असते तर पावसाळ्यात हवेत थंडावा येतो. वातावरणातील हा बदल आपण छत्री, रेनकोट, डी-ह्युमिडीफायर (हवेतील बाष्प शोषून घेणारे यंत्र) वगैरेंच्या साहाय्याने सुसह्य करायचा प्रयत्न करतो, तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही दोन ऋतूंमधला हा फरक काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक असते.
आयुर्वेदात ‘ऋतुसंधी’ची संकल्पना समजावलेली आहे ती याच दृष्टीने. कोणताही ऋतू एकाएकी बदलत नाही तर हवामानात हळूहळू क्रमाक्रमाने बदल होत जातो. हवामानात बदल होत असलेला दोन ऋतूंमधला काळ म्हणजे ऋतुसंधी. ऋतुसंधीमध्येच आहार-आचरणात बदल करणे आरोग्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असते.
पावसाळ्याचा विचार करता जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच हळूहळू पावसाच्या स्वागताला आणि तयारीला लागायला हवे.आहार, आचरण आणि उपचार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ऋतुचर्या ठरवायची असते. आपणही याच क्रमाने काय बदल करायचे ते पाहणार आहोत.
भजेत्साधारणं सर्वं उष्मणस्तेजनं च यत् ।
अशा अन्नाचे सेवन करावे की जे वात-पित्त-कफ या तिघांचे संतुलन करेल, उष्ण असेल व अग्नीला प्रदीप्त करण्यास सक्षम असेल.
पावसाळ्यात अशीही भूक कमीच लागते. त्यामुळे इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात चार घास कमी खाणे चांगले असते. विशेषतः संध्याकाळी लवकर जेवावे आणि अगदी हलके अन्न खावे. संध्याकाळी नुसती मुगाची खिचडी, कढी-भात, किंवा द्रवाहार म्हणजे सूप घेता येते. सकाळी नाश्त्याला साळीच्या लाह्या व दूध, मेतकूट भात, तांदळाची उकड यासारखे पचण्यास सोपे व दुपारी १२-१२.३० पर्यंत नक्की भूक लागले असे पदार्थ घेता येतात.
दुपारचे जेवणही गरम असण्याकडे लक्ष हवे. पोळीऐवजी ज्वारी-बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी, फुलका यांच्यावर भर देणे चांगले. दुपारच्या जेवणानंतर जिरे, काळे मीठ, आले टाकून वाटीभर ताजे ताक पिणे उत्तम. दही मात्र टाळणेच चांगले.
पावसाळ्यात हवा दमट होते तसेच पाण्यातही बदल होतो. पावसाळ्यात पाण्याचा विपाक ‘आंबट’ होतो असे आयुर्वेदात सांगितलेले असल्याने तसेच पावसाळ्यात पाण्यामार्फत जंतुसंसर्ग होण्याची शक्यताही सर्वाधिक असल्याने पिण्याचे पाणी उकळून घ्यावे. वास्तविक प्यायचे पाणी उकळून घेणे कायमच चांगले असते, पण पावसाळ्यात पिण्यासाठी निश्र्चितपणे उकळलेले पाणीच वापरायला हवे. पाणी २० मिनिटे उकळलेले असावे.
पाण्याचा आंबट विपाक कमी करण्याच्या दृष्टीने पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ यासारखी मधुर विपाकाची द्रव्ये किंवा तयार जलसंतुलन टाकले तर ते खऱ्या अर्थाने शुद्ध होते आणि पचायलाही सोपे होते.
पावसाळ्यात वातप्रकोप होतो त्यामुळे शरीरात कोरडेपणा वाढवणारे पाव, चुरमुरे, मैद्यापासून बनवलेले पदार्थ वगैरे टाळणे आवश्यक असते. तसेच पचण्यास जड व वात वाढवणारे चवळी, वाटाणा, पावटा, चणा, ढोबळी मिरची, गवार, वांगे वगैरे गोष्टी पावसाळ्यात अपथ्यकर होय. अंडी, मांसाहार सुद्धा पावसाळ्यात वर्ज्य करणेच चांगले.
हवा शुद्ध राहावी, जंतुसंसर्गाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पावसाळ्यात घरात नियमितपणे धूप करण्याची सवय उत्तम असते. धूपनाची सामग्री पावसाळ्यापूर्वीच जमवून ठेवणे उत्तम होय.वाढलेला वात कमी करण्यासाठी तसेच धातूंची शक्ती वाढविण्यासाठी हाताने अभ्यंग करणे, पादाभ्यंग करणे उत्तम असते.स्नानाच्या वेळी वातशामक व स्निग्ध, सुगंधी द्रव्यांचे उटणे अंगाला लावण्यानेही वातशमन होते.
अग्नी प्रदीप्त राहावा, पचन व्यवस्थित राहावे यासाठी पावसाळ्यात अधून मधून जेवणापूर्वी काळे मीठ व जिरे टाकून आल्या-लिंबाचा रस घेणे तसेच जेवणानंतर ‘अन्नयोग गोळ्या’,‘सॅनकूल चूर्ण’ घेणेही चांगले असते. साध्या चहाच्या ऐवजी ‘हर्बल टी’ म्हणजे उकळ्त्या पाण्यात आले, पुदिना, गवती चहा, तुळशी, साखर टाकून गाळून घेऊन पिण्यानेही पचन नीट राहण्यास मदत मिळते, सर्दी-खोकला-तापाला प्रतिबंध करता येतो.
वाताचे तसेच श्र्वसनाचे विकार पावसाळ्यात डोके वर काढतात त्यामुळे या प्रकारचा त्रास असणाऱ्यांनी वातशामक औषधे, सर्दी-खोकला-दमा वगैरे त्रास होऊ नये यासाठीची औषधे पावसाळ्यात सुरू करणेच चांगले असते.याप्रमाणे पावसाळ्याचे नियोजन सुरुवातीपासूनच केले तर आरोग्य नीट राहून पावसाचा खरा आनंद घेता येईल.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून ‘संतुलन आयुर्वेद’द्वारा संकलित)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.