

मडगाव: कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे देशभरात भाजपच्या विरोधात वातावरण तयार होत आहे; पण त्या वातावरणाचा पुरेसा फायदा घेऊ न शकणारी ‘हतबल काँग्रेस’ अशी देशभरात परिस्थिती असून गोव्यातही तशीच परिस्थिती आहे. या सऱ्या पार्श्वभूमीवर आता गोव्यातही काँग्रेसची ‘जागा’ घेण्यास बाकीचे विरोधी पक्ष सज्ज झाले आहेत, असे वाटू लागले आहे.
यासंदर्भात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राधाराव ग्रासियस यांनी अचूक असे भाष्य केले. ते म्हणाले, गोव्यात अजूनही लोकांच्या मनात काँग्रेस आहे. मात्र, गोव्यातील काँग्रेसकडे लोकभावनेचा फायदा घेणारा सक्षम असा नेता नाही. त्यामुळेच काँग्रेसवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे, असे वाटते.
मिळत असलेल्या माहितीनुसार, गोवा फॉरवर्डने जो सर्व्हे केला आहे, त्यात गोव्यातील मतदारांचा काँग्रेसवरील विश्वास नाही, असा निष्कर्ष पुढे आला असून त्यामुळेच विजय सरदेसाई यांनी काणकोण येथे बोलताना, गोव्यात कदाचित कॉक्रोच पार्टीला जास्त मते पडतील; पण काँग्रेसला नाही, असे वक्तव्य केले होते, असा निष्कर्ष आता काढला जात आहे.
सध्याची गोव्यातील परिस्थिती भाजपला प्रतिकूल असली तरी तिचा फायदा उठवण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही, अशी अन्य विरोधी पक्षांची ठाम भूमिका बनली आहे. गोव्यातील काँग्रेसला सध्या गटबाजीने पोखरले असून वारंवार या पक्षातील आमदारांनी केलेल्या पक्षांतरामुळे काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार असलेला ख्रिस्ती मतदारही या पक्षावर नाराज आहे. त्यामुळे तयार झालेल्या पोकळीचा फायदा आता इतर पक्ष उठवू पाहत आहेत.
गोवा फॉरवर्डकडून ‘पक्षसंघटने’वर भर!
गोवा फॉरवर्डने यापूर्वीच आपल्या पक्षाचा विस्तार सुरू केला असून काँग्रेसचे ज्या हिंदू बहुल मतदारसंघात स्थान कमकुवत आहे, अशा सावर्डे, सांगेसारख्या मतदारसंघांत त्यांनी आपली पक्षसंघटना बळकट करण्यास सुरवात केली आहे. आम आदमी पक्षानेही काँग्रेसची ‘जागा’ काबिज करण्यासाठी आपली रणनीती निश्चित करताना, काँग्रेसचे आमदार असलेल्या कुंकळ्ळी आणि केपे मतदारसंघात लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांमध्ये खटकेही उडाले आहेत.
कुंकळ्ळी मतदारसंघात सध्या काँग्रेसमध्ये असलेले एल्विस गोम्स यांनीही आपली वेगळी चूल मांडली आहे. वेळ्ळी आणि बाणावली हे मतदारसंघ आम आदमी पक्षाकडे ठेवावेत की तिथे काँग्रेस उमेदवार उभे केले जावेत यावरून निश्चितच वाद होणार आहेत.
अशा परिस्थितीत काँग्रेसबरोबर युती न करता बाकीच्या इतर विरोधी पक्षांबराेबर युती करण्याची खेळी ‘आप’ गोव्यात खेळू शकतो, असा निष्कर्ष राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. दुसऱ्याबाजूने ‘आरजी’ पक्षही काँग्रेसला पर्याय म्हणून पुढे येण्याच्या तयारीत असून ही सर्व पार्श्वभूमी पहाता भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून अन्य तीन पक्षांची तिसरी आघाडी या विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.