

गोव्यात कदंब राजांची प्रथम राजधानी चंद्रपुर मानली जाते, असे इतिहासतज्ञ मानतात, नंतर व्यापारी दृष्टीने ती कुशावती मुखाकडून गोपकापट्टणम् म्हणजे आताचे गोवा वेल्हा जुवारी नदीच्या काठाकडील परिसरात आणले. नदी तटावर दोन तीन कि.मी. लांबीचा पोर्ट नाविक व्यापारी बंदर बांधून तिथे विदेशातील गलबते येऊन व्यापार सुरू करून ते गोपकापट्टणम् बंदर भरमसाटीस आणले.
मॉन्सून पावसाची पहिली सर कोसळताच निबांच्या झाडाला चमेलीच्या फुल आकाराची सफेद फुले फुलतात, त्या फुलांनी संपूर्ण काटेरी झाड सफेद फुलांनी सजलेले पहावयास मिळते, नवशिक्या लेकुरांना पाहून मला त्या झाडाचे अजबपण दिसते, उन्हाच्या झळांनी तरळून जाणारा त्याचा सुगंध ते आपल्या भोवती लपेटून घेते, आणि हळूहळू त्याचा फुलोरा गळतीला लागून त्याच्या फांद्या वाऱ्यावर फडफडू लागतात.
अचानक आलेला वावटळीचा सपकारा त्याच्यावर बसून ते धुळीच्या लोटात आडवे उभे होऊ लागते, विचित्र बुंध्याचे निमुळते विसंगत गर्द हिरव्या रंगाचे हाडकुळ्या माथ्याचे पंधरा मिनिटे ते झाड वावटळीच्या लोटात घुमत होते, तिथून वावटळ उभी वर जात ढगांना झोंबत गर्जली आणि वर काळे ढग कडे करून एकत्र होत रूंदावताच वावटळ विसावली. त्यानंतर पाऊस पडून गेल्यावर त्या काळ्या ढगांची जागा निळ्या आकाशाने घेतली.
खाली पडलेला वज्ररूपी पाऊस पाणी बनून पृथ्वीवरील बियाण्याला लागलेली तहान भागवतो. त्याने काळ्या मातीच्या धरणी कुशीत सुक्या पाचोळ्यात लपलेले बियाण्यांचे दाणे, अधाशासारखे पाणी पिऊन पिवळा अंकुर हिरवा रंग लपेटत असतो, ते दोघेही एकमेकांना भेटण्याच्या प्रयत्नात असतात. पाच सहा दिवसांनी त्यांची रूपे दिसली, की जमिनीवरील सुकलेले जल परत वाऱ्याकडून निरोप पाठवून काळ्या ढगांतील वज्रमोती उगवलेल्या कोंबावर वर्षाव करताच ते सोनेरी अलंकार टाकून हिरवे वस्त्र परिधान करतात.
मध्ये मध्ये काळे ढग त्या कोंबावर कृष्णछाया पसरून त्या कोंबांना सावली देतात, त्यामुळे सूर्याची उष्ण किरणे ते थोपून धरून आपल्या अपत्यांचे रक्षण करतात, अशा वनातून भ्रमण करताना सुकलेला पालापाचोळा ओला होऊन त्यातून चिकट झालेली माती पायाला लागते, पहिल्या सरीच्या पावसाने भिजून ओरडणारे कावळे, चिवचिवणारे पक्षी, बागडणारी जनावरे, सरपटणारे प्राणी सूर्याच्या उष्णतेला भिऊन दडी मारलेले मुके, पावसाचा ओलावा मिळताच बाहेर येऊन वनदेवीच्या अंगणात आपापली कला सादर करून आनंदोत्सव साजरा करतात.
त्यांना विसावा देण्यास उंच आकाशाला गवसणी घालणारे मोठ्या हिरव्या पानांचे ‘कदंब’ त्यांची वाट पहात उभे असतात. त्या झाडाला कदंब राजाचे नाव का पडले, हे कुणी सांगू शकणार नाही. मात्र, कदंब, कुडा, ओटम या झाडांची पाने समान दिसतात. पण, ओटमची पाने जरा या जाड असतात, ओटम झाडाच्या पत्रावळी करीत होते, कुड्याची पाने विड्या करण्यास वापरत होते. शिवाय कुड्याची साल आयुर्वेदात औषधासाठी वापरतात.
कदंबाच्या पानाच्या पत्रावळी करून जेवत होते, पश्चिम घाटाच्या जंगलात नद्या ओहोळांच्या काठावर दिलदारपणे दिसणारा कदंब वर्षा सुरू झाल्यावर त्या धारा अंगावर झेलून केसरी कळ्या फुलांनी गेंदावत आपले अंग आणि सजवतो. काश्मीरातला चिनार, हिमालयातील देवदार, आणि पश्चिम घाटातील कदंबाची झाडे वनाचे सौंदर्य वाढवणारे अलंकार आहेत. पुराणात कदंब वृक्षाचे वर्णन सापडते, यमुनेच्या काठावर श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह चेंडू, लगोरीचा खेळ खेळताना चेंडू कदंब झाडावर अडकला होता,
झाडाखाली गायी, गुरे आणि गोपी सुखावत होत्या. त्या कदंबाच्या झाडाखाली श्रीकृष्ण बासरी वाजवून वातावरण भक्तीमय करीत होता, तो कदंब वृक्ष मराठ्यांचे कुल-पालक म्हणून त्या समाजातील लोक या वृक्षाला तोडत नाहीत. लग्न सोहळा साजरा करताना त्या वृक्षाकडे वाजत गाजत जाऊन त्याला हळद, कुंकू, फुले वाहून त्याची विधीवत पूजा करतात.
लोकसंस्कृतीत लग्नाच्या ओव्यांमधून त्याची फांदी कापून घरी आणून त्या फांदीला मंडप-देवते बरोबर पूजेला लावतात. काही ठिकाणी आंबा फांदी आणि शामळी झाडाची फांदी पूजतात. हे सारे आपल्या लोकसंस्कृतीचे ललित रंग अविष्कार आहे .कवी कुलगुरू कालिदास आपल्या काव्यात कदंबवृक्ष आणि वर्षा ऋतुचे वर्णन करून वेडा होतो, संकृत पंडितांनी कदंबाच्या फुलांना आरक्त गालाची गोंडबाज प्रियकर आणि प्रेयसीच्या पुलकीत प्रेमाची सुंदर उपमा दिली आहे.
कदंबाची पाने, पारिजातक खर्वत झाडांच्या पानाप्रमाणे खरखऱीत असतात, वड, पळसाच्या आकाराचा मिलाफ असलेली गर्द हिरवी मोठाली. फळाला रुद्राक्षाप्रमाणे दिसणाऱ्या काळ्या गुंड्या लटकतात, काही भारतीय प्रांतातील बाया कदंब फुलांच्या आकृतीची कर्णफुले करून कानात घालतात, मंगळसूत्रात जो मणी असतो त्याची आकृती कदंब फुलाप्रमाणे असते. कदंबाची फुले राधाकृष्णाचे प्रेम जीवन मानले आहे.
हिंदू धर्मातील स्त्रियांचे सांस्कृतिक जीवनरूप स्थिर झाले आहे, अशाने कदंब वृक्ष केवळ पुराणकथांत असला तरी कलाकुसरीतही तो पहावयास मिळतो, पश्चिमघाटाच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या स्वच्छ पाण्यात कदंबवृक्षाचे छायाचित्र परावर्तित होताना दिसते.
अकरा, बाराव्या शतकात गोव्यात राज्य करून गोव्याचा विस्तार राजापूर महाराष्ट्र ते कर्नाटक होन्नावर आणि पश्चिम घाटातील जांबोटी, खानापूर कणकुंबी, लोंढा, हल्याळ, सुपा, दांडेली, शिरशी भाग आपल्या ताब्यात घेऊन विशाल गोमंतक राज्य बनवणारा कदंब राजा या कदंब वृक्षाच्या पाहण्यातून आपली आठवण देतो.
गोव्यात कदंब राजांची प्रथम राजधानी चंद्रपुर मानली जाते, असे इतिहासतज्ञ मानतात, नंतर व्यापारी दृष्टीने ती कुशावती मुखाकडून गोपकापट्टणम् म्हणजे आताचे गोवा वेल्हा जुवारी नदीच्या काठाकडील परिसरात आणले. नदी तटावर दोन तीन कि.मी. लांबीचा पोर्ट नाविक व्यापारी बंदर बांधून तिथे विदेशातील गलबते येऊन व्यापार सुरू करून ते गोपकापट्टणम् बंदर भरमसाटीस आणले. आमचे मीठ, भात, मासळी, सुपारी, नाचणी, वरी,
पाकड, कुळीथ, कोकम, नारळ, वनस्पती औषधे, त्यांना विकत देऊन त्यांचे मसाले, खजूर, गहू, चणे, रॉकेल घेऊन तो व्यापार गोव्यातून घाट मार्गाने महाराष्ट्र, कर्नाटकात नेऊ लागल्याने गोवा म्हणजे विशाल गोमंतक अन्नधान्यांचे सुजलाम् सुफलाम् कोठार झाले होते. त्या कदंब राजवटीत, चांदोरचे देऊळ, तांबडीसुर्ल देऊळ, खानापूरचे देऊळ, शिरशीचे देऊळ पहिल्यावर ते शिवाचे भक्त होते ते जाणवते, त्यांनी उभारलेली मोठी देऊळे म्हणजे ओल्ड गोव्याचे महादेव मंदिर व नार्वेचे सप्तकोटेश्वर ही मंदिरे कशी होती हे इतिहासच सांगू शकेल, पोर्तुगीज राजपत्रात आणखी दोन देवळांची नोंद सापडते.
एक सांगेचे सोमनाथ मंदिर आणि दुसरे खांडोळ्याचे देवळाय देवराईतील सातेरीचे मंदिर त्याची मोडतोड फिरंग्यांनी केल्याने गावकऱ्यांनी तिथून ते देऊळ आमोणे रस्त्याकडे बांधले आहे. आज त्या देवीला शांतादुर्गा म्हणतात, पण त्या देवीचे मूळ नाव सातेरी, देवीच्या गर्भगृहात हल्लीच वारूळाच्या पुढे पाषाणी मूर्ती बसवली आहे.
त्या देवीची पालखी दरवर्षी कालोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अंदाजे एक कि.मी. दूर म्हणजे त्या देवळायच्या देवराईतील जुन्या सातेरी देवळाच्या परिसरातील ऐतिहासिक तळ्यावर सातेरीची पालखी नेऊन मूर्तीस स्नान घालतात. रचना पाहता तळ्याचे कदंबकालीन बांधकाम असावे, असा तर्क निघतो. तलावाच्या पूर्व बाजूने जांभ्या दगडाची भिंतीला नक्षीदार कमान आहे.
दक्षिण बाजूने तलावाच्या काठावर ऐतिहासिक नक्षीदार विहीर आहे. मात्र, कदंबानंतर आलेल्या पोर्तुगीजांनी तिथले देऊळ जमीनदोस्त करून त्या परिसरात कपेल बांधून ते देवळाय देवराई परिसर भाटावर कब्जा मिळवला असावा. चाळीस वर्षांपूर्वी ती देवराई कापून तिथे कॉंक्रिट जंगल उभारून त्या कदंबकालीन सातेरी देवळाचा इतिहास गाढून टाकला आहे, राहिले आहे ते फक्त देवळाय खांडोळा नाव व जुना तलाव.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.