पणजी: "गोव्याला वाचविण्याची आता गरज नाही. जे करायचं ते १९६१ साली पोर्तुगीज गेल्यानंतरच करायला हवे होते. आता फार उशीर झालाय, मी गोवा सोडून ब्राझीलला जातोय," अशी उद्विग्न पोस्ट एका गोमंतकीय व्यक्तीची सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
रेडीट या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरती फिट – हेलिकॉप्टर८३२१ या अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. गोमंतकीय ओळख नष्ट झाल्याचे कारण देत ब्राझीलला जात असल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे.
पोस्टमध्ये या व्यक्तीने पाच मुद्दे देखील मांडले आहेत. यात त्याने गोव्याची संस्कृती, भाषा, झाडे, शेती, जमीन याचा कशापद्धतीने ऱ्हास केला जातोय, याबाबत खंत व्यक्त केली आहे. ही पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आली असून, अनेकांनी यावर विविध मत देखील व्यक्त केले आहे.
काय आहे पोस्ट?
१) गोव्याला वाचविण्याची गरज नाही, जे करायचं ते १९६१ मध्ये पोर्तुगीज गेल्यानंतर करायला हवं होतं. आता फार उशीर झालाय.
२) गोव्याची भाषा, संस्कृती, परंपरा आणि सण बदलले जातायेत.
३) राज्यातील जंगले तोडली जातायेत... गोमंतकीयांची लोकसंख्या वाढावी म्हणून नव्हे तर गर्दी वाढवी म्हणून
४) गर्दी आणि प्रदुषणाला कंटाळलेल्या देशातील श्रीमंत लोकांचे मॉल आणि व्हिला उभे राहावेत यासाठी आमची जमीन गीळंकृत केली जात आहे.
५) भाषा आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा सोडली तर ब्राझीलमध्ये सर्व गोव्यासारखंच आहे. अधिक तिथे खूप झाडे आहेत. गोव्यातील सूवर्णकाळ आठवत मी तिथे दिवस व्यथित करेन.
या पोस्टवर अनेकांनी मत व्यक्त केले आहे. मला तुझा राग आणि दु:ख कळतंय पण, ब्राझीलमध्ये देखील असाच प्रकार सुरु आहे, असे मत एकाने या पोस्टवर व्यक्त केले आहे.
रोमानी नागरिकांचे उदाहरण देत एकाने गोवा सोडल्यानंतर आपली देखील ओळख पुसली जाईल अशी भीती व्यक्त केली. "किमान आपल्याकडे स्वत:चे घर तरी आहे. परप्रांतीय घरे विकण्याचे आपण थांबवायला हवं. गोव्यातील कॅथलिक चर्चेसकडे खूप जमीन आहे. तसेच, गोवा सरकारकडे असलेल्या जागेची आपण संरक्षण करायला हवं," असं मत आणखी एकाने व्यक्त केले आहे.
“मला तुझं दु:ख कळतंय, गोव्यात दररोज सुरु असलेली सर्कस पाहून फार वेदना होतात. गोमंतकीय मिळूनमिसळून राहत होते. लहानपणी आम्ही हिंदू – मुस्लिम एकत्र खायचो, खेळायचो. आत्ताच्या राजकारणी आणि इन्फ्युएन्सर्सनी वातावरण खराब केले आहे,” असे मत आणखी एका युझरने मांडले आहे.
आणखी एका व्यक्ती गोव्याला मिळालेले स्वातंत्र्य, स्वातंत्र्य नव्हते तर परकीय सत्तेचे येथील लोकांकडील सत्तेत हस्तांतरण होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
"तुझे बरोबर आहे, देशी लोकांची गोव्यात गर्दी वाढल्याने परदेशी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली आहे. २००० पूर्वी गोवा फार सुंदर होता. आता गोव्याचा वाट लागलीय, बॉलीवूडला धन्यवाद. लग्न होण्यापूर्वी, करिअर सुरु करण्यापूर्वी प्रत्येकाला दिल चाहता है अनुभव घ्यायचा आहे. राज्यात बुरशी सारख्या सिमेंटच्या इमारती आणि व्हिला उभे राहत आहेत," असे मत आणखी एकाने व्यक्त केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.