सीमापार शत्रुत्वाची किनार लाभल्याने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात प्रेक्षकांना जी झिंग चढते, त्याची बरोबरी इतर कुठल्याच स्पर्धेशी होत नाही. ऐंशीच्या दशकात भारतीय संघावर पाकिस्तान वर्चस्व गाजवायचा. पण नव्वदीच्या दशकापासून सतत खचणाऱ्या अर्थव्यवस्थेसोबत पाकिस्तानचे क्रिकेटही गाळात गेले आणि त्याच कालखंडात भारताचा दोन्ही आघाड्यांवर उत्कर्ष होत गेला. भारताला क्रिकेटच्या मैदानात हरविण्याची पाकिस्तानात शक्ती राहिलेली नाही. पण सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.
गमावण्यासारखे काहीही नसल्याने पाकिस्तानने ‘ट्वेंटी-२०’ च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या निमित्ताने भारतावरुन तमाशा केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) वेठीस धरुन क्रिकेटविश्वात उभी फूट पाडण्याचे चित्र निर्माण केले. पण क्रिकेटमधील आर्थिक समृद्धीच्या जोरावर ‘आयसीसी’ने तो डाव हाणून पाडला. भारताविरुद्ध (India) रविवारी कोलंबोत होणारा सामना खेळण्यास राजी झालेल्या पाकिस्तानची गुर्मी जिरली आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिफ मुनीर आणि पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांचाही मुखभंग झाला.
क्रिकेटमधील पैशापुढे पाकिस्तान झुकणारच होता, हे अनेकांचे म्हणणेही खरे करुन दाखवत आपले हसे करुन घेतले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रत्येक मोठ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा नेहमी एका गटात ‘योगायोगा’ने समावेश होत असतो. कारण स्पर्धेच्या उपांत्य किंवा अंतिम फेरीत उभय संघ एकमेकांशी झुंजतील, याची खात्री नसते. त्यामुळे दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्याचा ‘योगायोग’ साधून ‘पैसा वसूल’ सामन्याविषयी कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली जाते. भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा अनेकपटींनी सरस आहे. त्याची जाणीव पाकिस्तानला आहे.
भारत-पाकिस्तान (Pakistan) सामन्यात भारतातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या भावना गुंतलेल्या असतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय संघही उत्सुक असतो, हेही त्यांना पक्के ठाऊक आहे. त्याचा फायदा उठविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो. भारताचा प्रतिस्पर्धी संघ म्हणून आपली किंमत कशी वसूल करायची याची पाकिस्तानला ‘आयसीसी’नेच चटक लावली आहे. भारतातील ‘जेन झी’ आणि ‘अल्फा’च्या सर्व आवडीनिवडी आधीच्या पिढीच्या तुलनेत भिन्न असल्या तरी भारत-पाकिस्तान सामन्यांविषयीचे आकर्षण त्यांनाही तेवढेच आहे. ती क्रेझ टिकवून ठेवण्यात ‘आयसीसी’च्या व्यवस्थापनाचा मोठा वाटा मोठा आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा गाडा नफ्यात रेटला जात आहे.
कुठल्याही कार्पोरेट कंपनीप्रमाणे क्रिकेटच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन आपला नफा वाढवित नेणे हे ‘आयसीसी’चे उद्दिष्ट आहे. ‘आयसीसी’च्या महसुलात भारत-पाकिस्तान सामन्यांचा वाटा महत्त्वाचा असतो. भारत-पाकिस्तान-बांगला देशाच्या मिळून १९० कोटींच्या घरात असलेल्या क्रिकेटवेड्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारुन घेतल्यासारखे ठरेल, याची कल्पना ‘आयसीसी’ला आहे. त्यामुळे नफावृद्धीसाठी लागणारा पाकिस्तान नावाचा ऐनवेळी दगा देऊ पाहणारा कच्चा माल जोपासणे ‘आयसीसी’ला भाग पडते.
त्याचा फायदा पाकिस्तान प्रत्येकवेळी उठवत असतो. भूराजकीय वाद बाजूला ठेवून पैसा कमावणे आणि सदस्य देशांत त्याचे योग्य प्रमाणात वाटप करणे ही ‘आयसीसी’ची जबाबदारी. त्यामुळे कौशल्य दाखवून पेच सोडविल्याबद्दल ‘आयसीसी’ला पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही. राष्ट्रवादाची भूमिका घेणाऱ्या बांगला देशाला ‘आयसीसी’ने एका बोनस स्पर्धेच्या आयोजनाचे आश्वासन देऊन चुचकारले आहे. त्यामुळे त्या देशालाही आपलीच सरशी झाल्याचा दावा करण्याची संधी मिळाली.
कोलंबोचा सामना न खेळून भारताला पुढे चाल देण्याचे आत्मघातकी पाऊल उचलण्यासाठी पाकिस्तानला अप्रत्यक्ष बळ मिळाले आहे ते ‘ऑपरेशन सिंदूर’पश्चात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या देशाचे लाड पुरविल्याने. त्यामुळे क्रिकेटजगतात होणारी नाचक्की आणि आर्थिक हानीची पर्वा करीत नसल्याचा आव आणत भारताविरुद्ध कुरापती करण्याची संधी पाकिस्तानला मिळाली. ब्लॅकमेलिंगचे राजकारण करुन भारताविरुद्ध वातावरणनिर्मिती करण्याची संधी पाकिस्तान शोधत होता. ती बांगला देशामुळे मिळाली. पण पाकिस्तानच्या या नौटंकीची आर्थिक झळ सामना रद्द झाल्यास श्रीलंकेला बसणार होती.
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या श्रीलंकेची स्थिती त्यामुळे आणखी दयनीय झाली होती. भारताला पुढे चाल देण्याचा हेकेखोरपणा सोडावा म्हणून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह बहुतांश देशांच्या क्रिकेट नियामक मंडळांनी आपली ‘समजूत’ काढल्याने आपण भारताशी खेळण्यास राजी झालो, असा शहाजोगपणा पाकिस्तान दाखवत आहे. हा राजकीय मुखवटा पाकिस्ताने घेतला यात आश्चर्य नाही; पण यासगळ्यांत अखेर निर्णायक ठरले ते क्रिकेटमधील अर्थकारण.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.