भारतीय साहित्यामध्येसुद्धा ऋतू आणि आकाश यांचे हे नाते खोलवर दिसते. कालिदासाच्या ऋतुसंहार आणि मेघदूत यांसारख्या काव्यांमध्ये बदलणारे ऋतू, ढग, तारे आणि आकाशातील भावविश्व यांचे सुंदर वर्णन आढळते. गोव्यात मॉन्सूनच्या आगमनाची चाहूल आता लागली आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत, तर काही दिवस अजूनही ढग आणि उन्हाचा खेळ सुरू आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून आपण वारंवार आकाशाकडे पाहत होतो. पाऊस कधी येणार, ढग किती टिकणार, याचा अंदाज घेत. एप्रिल-मे महिन्यांत स्वच्छ दिसणारे तारे आणि नक्षत्रे आता हळूहळू फिकट होत चालली आहेत. क्षितिजावर ढग जमा होऊ लागले आहेत आणि रात्रीच्या आकाशाचे स्वरूप बदलू लागले आहे.
पण हजारो वर्षांपूर्वी या बदलत्या आकाशाकडे केवळ सौंदर्य म्हणून पाहिले जात नव्हते. त्याकडे आशेने, काळजीने आणि अत्यंत बारकाईने पाहिले जात होते. कारण त्या काळात मॉन्सूनचं आगमन, शेतीची सुरुवात आणि मानवी जीवनाचं संपूर्ण चक्र हे मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या आणि आकाशाच्या संकेतांवर अवलंबून होते. जेव्हा पाऊस आकाशातून ओळखला जात होता
हवामान विभाग, उपग्रह किंवा रडार यंत्रणा अस्तित्वात येण्यापूर्वी मानव ऋतूंचा अंदाज आकाशातून घेत होता. सूर्याची नक्षत्रांमधील हालचाल, विशिष्ट ताऱ्यांचे दिसणे-अदृश्य होणे, वाऱ्यांची दिशा आणि रात्रीच्या आकाशातील बदल, या सर्व गोष्टी मिळून निसर्गाचे एक विशाल कालदर्शक तयार होत असे.rainy sisson
भारतात या ऋतुचक्रात मृग नक्षत्राला विशेष महत्त्व आहे. आजही ‘मृगाचा पाऊस’ हा शब्द ग्रामीण भागात सहज ऐकू येतो. पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असे. पेरणीची तयारी, शेतीची मशागत आणि संपूर्ण कृषीचक्र हे मॉन्सूनच्या आगमनावर अवलंबून असते.
मॉन्सूनचे हे आगमन नेहमीच अनिश्चित राहिले आहे. कधी पाऊस लवकर येतो, कधी अरबी समुद्रावरच काही दिवस घुटमळत राहतो. काही वेळा आकाश काळ्या ढगांनी भरून जाते, पण पाऊस पडत नाही. अशा परिस्थितीत, पावसावर अवलंबून असलेल्या समाजाने आकाशात संकेत शोधणे स्वाभाविकच होते.
भारतीय कालगणना आणि खगोलज्ञानाची मुळे अशाच दीर्घकालीन निरीक्षणांत आहेत. सूर्य वर्षभर नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर सरकत असल्याचे निरीक्षण करून भारतीय सौर आणि चांद्र-सौर कालदर्शिका विकसित झाल्या. ऋतू आणि आकाश हे दोन स्वतंत्र विषय नव्हते; उलट ऋतू समजून घेण्यासाठी आकाशच मार्गदर्शक होते. ऋतूनुसार बदलणारं आकाश
आजही जागरूक निरीक्षकाला ऋतूनुसार बदलणारे आकाश सहज जाणवते. उष्ण प्री-मॉन्सून काळात वृश्चिक तारकासमूह दक्षिण आकाशात उठून दिसतो. त्यातील तांबूस अँटारेस तारा, भारतीय परंपरेतील ज्येष्ठा विशेष लक्ष वेधून घेतो. त्यानंतर हळूहळू क्षितिजावर ढग जमा होऊ लागतात आणि पुढे संपूर्ण आकाशच मॉन्सूनच्या पडद्यामागे झाकोळून जाते.
हिवाळ्यात मात्र हेच आकाश पुन्हा बदलते. हवा स्वच्छ आणि पारदर्शक बनते. पूर्व दिशेला मृग म्हणून ओळखला जाणारा ओरायन तारकासमूह तेजाने झळकू लागतो. तारे अधिक स्पष्ट, अधिक चमकदार दिसतात. पावसाळ्यात हरवलेली आकाशाची खोली पुन्हा अनुभवास येते.म्हणजेच भारतीय आकाश केवळ वेळेनुसार नव्हे, तर ऋतूंनुसारही बदलत असते.नाईलपासून भारतापर्यंत ऋतू, शेती आणि आकाश यांचा हा संबंध केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता.
प्राचीन इजिप्तची संस्कृतीही एका महान ऋतुचक्रावर अवलंबून होती. नाईल नदीच्या पुरावर. सिरियस या तेजस्वी ताऱ्याचे जवळपास नव्वद दिवस अदृश्य राहिल्यानंतर पहाटेच्या आकाशात होणारे पुनर्दर्शन इजिप्शियन लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाई. कारण त्यानंतर नाईल नदीला पूर येण्याचा काळ सुरू होत असे. या पुरामुळे नदीकाठावर सुपीक गाळ साचत असे आणि शेतीच्या नव्या हंगामाची सुरुवात होत असे. त्यामुळे हा काळ उत्सव आणि नवचैतन्याचा मानला जाई.
म्हणजेच पृथ्वीवरील जीवन टिकवण्यासाठी मानवाला आकाशातील पुनरावृत्ती होणारे संकेत समजून घेणे आवश्यक होते. भारतीय साहित्यामध्येसुद्धा ऋतू आणि आकाश यांचे हे नाते खोलवर दिसते. कालिदासाच्या ऋतुसंहार आणि मेघदूत यांसारख्या काव्यांमध्ये बदलणारे ऋतू, ढग, तारे आणि आकाशातील भावविश्व यांचे सुंदर वर्णन आढळते. त्या काळात आकाश हा दैनंदिन जीवनापासून वेगळा विषय नव्हता.
खगोलशास्त्र, शेती, काव्य, परंपरा आणि स्मृती, हे सर्व एका अखंड सांस्कृतिक अनुभवाचा भाग होते. आकाशाशी तुटत चाललेले नाते आज आपण ऋतूंची माहिती मोबाईल ॲप्स आणि हवामानाच्या अंदाजातून घेतो. शहरांतील कृत्रिम प्रकाशामुळे रात्रीचे आकाशही पूर्वीसारखे स्पष्ट दिसत नाही. ऋतूंचे निरीक्षण आता जगण्यासाठी आवश्यक राहिलेले नाही. तरीसुद्धा आपल्या वरती चालणारे हे प्राचीन आकाशचक्र अजूनही तस्सेच आहे. सूर्य अजूनही नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर प्रवास करतो आहे.
ऋतूनुसार दिसणारी नक्षत्रे अजूनही आपल्या वार्षिक यात्रेत मग्न आहेत. आणि मॉन्सूनचे ढग अजूनही पूर्वीप्रमाणे तारकांना झाकोळून टाकतात. कदाचित म्हणूनच आकाश आजही मानवाला आकर्षित करत राहते. कारण ते आपल्याला आठवण करून देते की, आधुनिक उपकरणांच्या खूप आधी, मानवाने वेळ, ऋतू आणि जीवनाचे संकेत या शांत तारकांमधूनच वाचायला शिकले होते.
(लेखक असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ ॲस्ट्रोनॉमी, मडगाव चॅप्टरचे माजी अध्यक्ष आहेत.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.