bjp  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

एक हैं तो सेफ हैं! हाच संदेश महाराष्ट्राने दिलाय, तो आता भारताचा महामंत्र झालाय; गोवा भाजपचे प्रवक्ते वेर्णेकर

Goa BJP's Role In Mahayuti Victory: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, यांच्यासहित इतर मंत्री, आमदार, नेते व असंख्य कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने प्रचार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः कार्यकर्ते व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

गिरीराज पै वेर्णेकर

महायुतीच्या या विजयात गोवा भाजपचीदेखील महत्त्वाची भूमिका होती. प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, यांच्यासहित इतर मंत्री, आमदार, नेते व असंख्य कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने प्रचार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः कार्यकर्ते व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप कार्यकर्त्यांना केलेल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या राज्यात महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे कौतुक केले. या विजयाचे सार त्यांनी मोजक्या शब्दात मांडले. हरयाणानंतर महाराष्ट्रानेदेखील ‘एक हैं तो सेफ हैं’, हाच संदेश दिला आहे. हा मंत्र आता भारताचा महामंत्र झाला आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने नेत्रदीपक यश मिळवले. काही महिन्यांपूर्वी एकही ‘राजकीय विश्लेषक’ भाजप जिंकण्याची तिळमात्रदेखील शक्यता वर्तवत नव्हता. परंतु लोकसभेत भाजप काहीसा कमी पडल्याचे दिसताच इंडी आघाडीचे नेते व कार्यकर्ते अति आत्मविश्वासाने वावरू लागले व शेवटी हाच अतिआत्मविश्वास ‘महा विनाश आघाडी’ला नडला.

या विजयानंतर उत्साही कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीसमोर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज आपण महाराष्ट्रात विकासाचा व गुड गव्हर्नन्सचा विजय झाल्याचे पाहतो आहोत. हा सत्याशी सुसंगत सामाजिक न्यायाचा विजय आहे’.

‘महाविनाश आघाडी’च्या पतनाची सुरुवात

खरे म्हणजे महाराष्ट्रात (Maharashtra) यथातथाच अस्तित्व असलेल्या काँग्रेसच्या वाट्याला जागावाटपात जरा जास्तच जागा आल्या. तेव्हाच ‘महाविनाश आघाडी’च्या पतनाची नांदी झाली होती असे म्हटल्यास हरकत नाही. मविआच्या या घोडचुकीने राजकारणातील अजून एक ट्रेंड अधोरेखित केला: ज्या ज्या वेळी काँग्रेस मित्रपक्षांच्या कुबड्या घेऊन निवडणूक लढू पाहते, त्या त्या वेळी एक तर काँग्रेस स्वतःच आघाडी प्रचंड कमकुवत तरी करते किंवा केवळ मित्रपक्षांना यश मिळाल्यामुळे सत्तेची थोडीफार ऊब मिळवण्यात यशस्वी होते. जम्मू काश्मीर व बिहारमधील घटनाक्रमातून हे दिसून येते. इंडी आघाडीने नुकत्याच जिंकलेल्या झारखंडमध्येदेखील जिंकलेल्या जागांच्या हिशोबाने काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

‘महाविनाश आघाडी’च्या असल्या चुकांनी त्यांच्या पराभवास हातभार लावला, पण त्यांच्या पतनाचे सर्वांत मोठे कारण होते. भाजपची उत्कृष्ट रणनीती व ती अमलात आणण्याचे कौशल्य असलेले शिस्तबद्ध संघटन.

भाजपची संघटनात्मक शक्ती

भाजपच्या (BJP) अतुलनीय अशा संघटनात्मक ताकदीने या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. लोकसभेत पक्ष काहीसा कमी पडल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते विरोधी पक्षांच्या कणाहीन समर्थकांप्रमाणे पक्षाची साथ सोडून पांगले नाहीत. विधानसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले व विशिष्ट लक्ष्य निश्चित करून भाजपचे देशभरातील कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठवण्यात आले.

महायुतीच्या या विजयात गोवा भाजपचीदेखील महत्त्वाची भूमिका होती. प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, यांच्यासहित इतर मंत्री, आमदार, नेते व असंख्य कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने प्रचार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः कार्यकर्ते व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले, त्यांच्या भावना व मते समजून ती रणनीतीत सामावून घेतली व कार्यकर्त्यांमध्ये योग्य समन्वय साधला. प्रत्यक्ष जमिनी स्तरावर इतक्या सूक्ष्म व अचूक नियोजनाचे भारतीय राजकारणातील हे एकमेवाद्वितीय उदाहरण आहे, आणि केवळ भाजपच आपल्या शिस्तबद्ध संघटन व नेतृत्वाच्या बळावर ते करू शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेसशी युती असल्याची सल काही कार्यकर्त्यांच्या मनात जरूर होती, पण ती बाजूला सारून पंतप्रधान मोदींसाठी व भाजपसाठी निवडणुकीत विजय मिळवण्याचे ध्येय त्या सर्वांनी ठेवले. देवेंद्र फडणवीसांचे धीरोदात्त नेतृत्व, नितीन गडकरी व इतर दिग्गज नेत्यांचा झंझावाती प्रचार, यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला.

भाजपचा वैचारिक मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपचे हात बळकट केले. संघाचे तळागाळातील ‘नेटवर्क’ अनन्यसाधारण असेच आहे व वैचारिकदृष्ट्या अटीतटीच्या लढायांमध्ये संघाचे स्वयंसेवक स्वेच्छेने कार्य करण्यास पुढे येतात. महाराष्ट्रातील हा विजय भाजप व संघामधील उत्तम समन्वयाचे द्योतक आहे. एकाच वेळी विविध पातळ्यांवर असा समन्वय साधत मिळून काम करणे इतर कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा बिगरसरकारी संघटनेसाठी अशक्य आहे

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’: मोठा गेमचेंजर

महायुतीच्या विजयाचे बरेचसे श्रेय जरी भाजपच्या संघटनाचे असले तरी, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ हाही या विजयाचा एक मोठा घटक होता. कमालीच्या कार्यक्षमतेने राबवलेल्या या योजनेचा जवळपास २ कोटी महिलांना थेट लाभ झाला व कोणत्याही मध्यस्थाशिवाय तत्काळ १,५०० त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले. यामुळे भाजपला मतदान करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्या.

‘बटेंगे तो कटेंगे’, ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी हरियाणा निवडणुकीच्या वेळी दिलेली घोषणा, तमाम भारतीयांना प्रेरित करणारा एकतेचा महामंत्र झाला. पुढे ‘एक हैं तो सेफ हैं’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावर शिक्कामोर्तब केले. हे ‘एक हैं तो सेफ हैं’ लोकांना, विशेषतः हिंदूंना भावले.

भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे निराश झालेल्या मतदारांना आता आव्हानांना सामोरे जाताना गरजेच्या असणाऱ्या एकीचे महत्त्व लक्षात आले. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत दिसलेल्या अल्पसंख्याकांच्या, विशेषतः मुस्लीम समुदायाच्या एकीने हिंदू एकत्रीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘एक हैं तो सेफ हैं’ या घोषणेने मतदारांना स्फूर्ती आली व भाजपवरील त्यांचा विश्वास वाढला. महाराष्ट्रातील भाजपचा ९० टक्के ‘स्ट्राईक रेट’ हा याच विश्वासाचे प्रतीक आहे.

या वेळेस सलग तिसऱ्या वेळी महाराष्ट्राच्या जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. २०१९मध्येदेखील उद्धव ठाकरे यांनी सत्ताप्राप्तीसाठी विश्वासघात करूनही जनतेने भाजप-शिवसेना युतीलाच स्पष्ट कौल दिला होता.

तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अंत

महाराष्ट्रातील मतदारांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाला स्पष्ट नकार दिल्याचे दिसत आहे. मुस्लीम तुष्टीकरणासाठी ‘महाविनाश आघाडी’चा पराकोटीचा खटाटोप, वक्फ बोर्डाच्या नवीन सुधारणांना विरोध करणे, यातून महाराष्ट्र आणि भारताच्या हितापेक्षा क्षुल्लक राजकीय फायद्यांसाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची त्यांची वृत्ती महाराष्ट्राच्या जनतेने पहिली.

महाराष्ट्र निवडणुकीचा गोव्यासाठी धडा

महाराष्ट्राच्या निकालाचा गोव्यावर परिणाम होईल यात शंका नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्राने हिंदू एकतेने मुस्लीम ध्रुवीकरणाचा सामना केला, त्याचप्रमाणे गोवादेखील धार्मिक शक्तींच्या हस्तक्षेपास ठामपणे नकार देईल. विधानसभा निवडणुकीस दोन वर्षे शिल्लक आहेत. या काळात गोवा प्रदेश भाजप निश्चितच महाराष्ट्रातील घटनांचा अभ्यास करेल व त्यातून शिकलेले धडे गोव्यात अमलात आणेल यात वाद नाही.

निष्कर्ष

महाराष्ट्रातील भाजपचा विजय हा केवळ राजकीय विजय नसून ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’ या मंत्रांचा स्पष्ट हुंकार आहे. विकास, गुड गव्हर्नन्स आणि सामाजिक एकता कायम ठेवण्यासाठी जागृत झालेली समाजाची इच्छाशक्ती यातून दिसत आहे. भाजपसाठी हा विजय एक मैलाचा दगड आहे, ज्याने पक्षाची बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत संघटन मजबूत करण्याची व तळागाळातील लोकांना जोडत पुढे जाण्याची क्षमता सिद्ध केली आहे.

(लेखक गोवा प्रदेश भाजपचे प्रवक्ते आहेत. प्रस्तुत लेखातील सर्व मते ही लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT