

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गोव्याचा ५ धावांनी पराभव करत एका रोमहर्षक विजयाची नोंद केली आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे कर्णधार ऋतुराज गायकवाड. सुरुवातीला अत्यंत बिकट अवस्थेत असलेल्या महाराष्ट्राला ऋतुराजच्या नाबाद शतकाने सावरले आणि त्यानंतर गोलंदाजांनी अचूक मारा करत गोव्याला २४४ धावांवर रोखले.
जयपूर येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघाची सुरुवात अतिशय खराब झाली होती. संघाच्या धावफलकावर अवघ्या ३ धावा असताना ३ आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. अशा वेळी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने एका बाजूने किल्ला लढवला. त्याला खालच्या फळीतील फलंदाज विकी ओस्तवालने मोलाची साथ दिली.
या जोडीने सातव्या विकेटसाठी १०८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ऋतुराजने १३१ चेंडूंत १३४ धावांची नाबाद खेळी साकारली, ज्यात ८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने ५० षटकांत ७ बाद २४९ धावांपर्यंत मजल मारली.
२५० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गोवा संघाची सुरुवात आश्वासक होती. कश्यप बखले (४२ धावा) आणि स्नेहल कवठणकर (४० धावा) यांनी गोव्याला चांगली सुरुवात करून दिली.
मधल्या फळीत धीरज गावकरने ३४ धावांचे योगदान दिले, तर अष्टपैलू ललित यादवने ५७ धावांची नाबाद खेळी करून गोव्याला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते. मात्र, महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी संयम राखला आणि गोव्याचा डाव ५० षटकांत २४४ धावांवर रोखला.
या शतकासह ऋतुराज गायकवाडने विजय हजारे करंडकात सर्वाधिक १५ शतके झळकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय संघात स्थान न मिळाल्याचा कोणताही दबाव न दाखवता ऋतुराजने आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राचा हा विजय संघिक प्रयत्नांचे फळ असून, फलंदाजीतील कमतरता गोलंदाजांनी भरून काढली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.