Ishan Kishan Emotional Statement: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे युवा सलामीवीर ईशान किशन. ईशानने आपल्या बॅटने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. त्याने अवघ्या 32 चेंडूंमध्ये 76 धावांची वादळी खेळी खेळत भारताचा विजय सोपा केला. या चमकदार कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले, मात्र त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत ईशानच्या मनातील खदखद आणि संघातून बाहेर असताना सोसलेल्या वेदना समोर आल्या आहेत.
गेल्या बऱ्याच काळापासून ईशान किशन (Ishan Kishan) भारतीय संघाबाहेर होता. संघातून डच्चू मिळाल्यानंतर त्याच्यासमोर अनेक प्रश्न उभे होते. मात्र, खचून न जाता त्याने घरगुती क्रिकेटचा मार्ग निवडला. तिथे त्याने धावांचा पाऊस पाडला आणि पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ईशान म्हणाला, "मी या सामन्यात पहिल्या चेंडूपासून चांगला कनेक्ट करु शकत होतो, त्यामुळे माझा स्वतःवरचा विश्वास वाढला. मला फक्त चांगले शॉट्स खेळायचे होते आणि ते खेळले की धावा आपोआप येतात हे मला माहीत होतं."
संघातून बाहेर असतानाच्या काळाबद्दल बोलताना ईशान किशन भावूक झाला. तो म्हणाला, "संघातून बाहेर पडल्यावर माझं पूर्ण लक्ष केवळ घरगुती क्रिकेटवर होतं. कधीकधी स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत करावी लागते. मी स्वतःला एकच प्रश्न विचारायचो की, काय मी खरोखरच भारतीय संघासाठी खेळण्यास पात्र आहे? म्हणूनच माझ्यासाठी घरगुती क्रिकेटमध्ये खेळणे आणि धावा करणे अत्यंत महत्त्वाचे होते. आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही तिथे ट्रॉफी जिंकली आणि तोच आत्मविश्वास मी आज मैदानात घेऊन उतरलो."
ईशानने पुढे सांगितले की, त्याने फलंदाजीला उतरण्यापूर्वी स्वतःला विचारले होते की, "मी हे पुन्हा करु शकतो का?" आणि त्याच्या मनातले उत्तर स्पष्ट होते. त्याने ठरवले होते की बाद झालो तरी चालेल, पण क्रिकेट मात्र दर्जेदारच खेळायचं. "आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता किंवा क्रॉस-बॅटेड शॉट्स खेळायचे नव्हते. तरीही 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करणे गरजेचे होते, जे आम्ही साध्य केले," असे ईशानने स्पष्ट केले.
ईशान किशनच्या या पुनरागमनाने आणि त्याच्या प्रांजळ कबुलीने क्रिकेट वर्तुळात त्याच्या जिद्दीचे कौतुक होत आहे. संघात स्थान मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यानंतर मैदानात दिलेले हे चोख प्रत्युत्तर यामुळे ईशानचे स्थान आता टी-20 क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भक्कम होताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.