Nitin Gadkari Goa Visit Projects Inauguration
वास्को: निसर्गसंपन्न गोव्यात रस्तेअपघात कमी व्हावेत यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रीय महामार्ग आणि इतरही रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधा, तसेच रस्त्यांवर वन खात्याच्या सहकार्याने झाडे लावून गोव्याला प्रदूषणमुक्त करा, असा सल्ला केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
४ हजार २०० कोटी रुपयांच्या विविध पाच प्रकल्पांचे भूमिपूजन व एका प्रकल्पाचे लोकार्पण केल्यानंतर गडकरी आज येथे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार संकल्प आमोणकर, दाजी साळकर, उल्हास तुयेकर व मान्यवर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना मी केंद्रीय बंदरविकासमंत्री होतो. त्यावेळी त्यांनी एमपीटीवरील वाहतूक कोंडीचा विषय मांडला होता. तेव्हापासून या प्रकल्पाला सुरवात झाली.
प्रकल्पाला विलंब झाला, पण त्याचे आज उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. ६४५ कोटींच्या या प्रकल्पाची १८ पैकी १३ किलोमीटरची कामे यापूर्वीच पूर्ण झालेली आहेत. मी विद्यार्थिदशेत गोव्यात आलो तेव्हा वाहतूक कोंडी अनुभवली आहे. आता गोव्यातील ही समस्या निश्चितपणे कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नितीन गडकरी हे केंद्रीय रस्तेवाहतूकमंत्री बनल्यापासून देशाचा कायापालट झाला आहे. त्यांनी छोट्याशा गोव्यासाठी आत्तापर्यंत ४० हजार कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे समस्त गोमंतकीयांवर त्यांचे मोठे उपकार आहेत व ते कधीही विसरता येणार नाहीत. दुसरीकडे राज्यात ५५० कोटींची अन्य कामे सुरू आहेत. रस्ता हा विकासाचा आरसा आहे. गोव्यात आता रस्त्यांचे जाळे पसरले आहे. गडकरींच्या दूरदृष्टीमुळे गोव्यातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलला आहे, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
गेल्या ११ वर्षांत चिमुकल्या गोव्याला ४० हजार कोटी मिळणे हे फक्त ‘डबल इंजिन’ सरकारमुळे शक्य झाले. गेल्या ५० वर्षांत हे शक्य झाले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यांचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. नितीन गडकरी यांनीही गोव्याला काही कमी पडू दिले नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
१एमईएस महाविद्यालय चौक ते बोगमाळो चौकादरम्यान उड्डाणपूल व क्वीनीनगर चौक येथे व्हियूपी. (४७२ कोटी)
२झुआरी जोडरस्त्याच्या शेवटचे टोक ते मडगाव बगलरस्त्याच्या आरंभापर्यंत चौपदरी रस्ता. (३९८ कोटी)
३नावेली ते कुंकळ्ळी व बेंदुर्डे ते पोळे रस्त्याचे चौपदरीकरण. (२१२३ कोटी)
४फोंडा-भोमपर्यंत चौपदरी रस्त्याची पायाभरणी. (५५७ कोटी)
दाबोळी येथे भारतीय नौदलाकडून अतिक्रमण झाल्याचे माझ्या कानावर आले आहे. त्यामुळे जमीन संपादनात अडचणी येत आहेत. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांना नोटीस पाठवून जागा मोकळी करावी, अशी सूचना गडकरी यांनी केली. विमानतळावर होणारे अपघात हे सरकारी चुकांमुळे होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याबाबतही मी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या, असेही ते म्हणाले.
कन्याकुमारी ते मुंबई द्रुतगती महामार्ग बांधणार. त्यातील बराच भाग गोव्यातून जाईल. त्यासाठी स्वतंत्र वृक्षहानी न करता, लोकांच्या घरांना धक्का न लावता जागा ठरविण्यात येईल. या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक गोव्याबाहेरून कन्याकुमारीच्या दिशेने जाईल.
पर्यटकांना अल्पावधीतच इप्सितस्थळी पोहोचता यावे यासाठी रोप-वे ही पर्यावरणपूरक संकल्पना लवकरच राबविण्यात येईल.
कुंकळ्ळी बगलमार्गाचे काम लवकरच मंजूर करण्यात येईल.
फोंडा ते भोम या दहा किलोमीटरच्या व ५५७ कोटींच्या प्रकल्पाचे उर्वरित काम मार्चपर्यंत पूर्ण करणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.