आगोंद: अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची खरी ताकद मातृशक्ती आणि युवाशक्तीकडे आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्याचे सामर्थ्य केवळ मातृशक्तीकडेच आहे, असे ठाम प्रतिपादन मराठीप्रेमी ॲड. रोशन सामंत यांनी केले.
मराठी राजभाषा निर्धार समिती गोवा व मातृशक्ती कार्यकर्त्यांच्या वतीने काणकोण प्रखंडाचा मेळावा चार-रस्ता-काणकोण येथील निराकार मठ सभागृहात पार पडला.
यावेळी सामंत बोलत होत्या. व्यासपीठावर कन्या वसतिगृहाच्या प्रमुख व मातृशक्ती राज्य प्रमुख डॉ. अनिता तिळवे, विशाखा फळदेसाई, भक्ती हडपकर, अरुणा देसाई, महिला प्रमुख व मुख्याध्यापिका रेश्मा पाटील उपस्थित होत्या.
पोर्तुगीज राजवटीतही आपल्या पूर्वजांनी मराठीचे संरक्षण केले. मराठीचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी काही वस्त्यांमध्ये दहा ते बारा मराठी शाळा सुरू केल्या होत्या.
गोवा मुक्तीनंतर पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी मराठीसाठी हजारभर शाळा सुरू केल्या. मराठी ही गोव्याची मातृभाषा आहे.
तिचे हक्काचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी थोडे-थोडे योगदान द्यावे. मराठी राजभाषा झालीच पाहिजे, असेही सामंत म्हणाल्या.
प्रारंभी शिशुवाटिकेतील मुलांच्या पालकांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मुलांनी पौराणिक सांस्कृतिक नृत्ये सादर केली, तर श्रीस्थळच्या महिलांनी फुगडी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. भक्ती हडपकर यांनीही विचार मांडले. मराठी भाषेसंदर्भातील ठराव प्रा. दिव्या चंद्रेकर यांनी वाचून दाखवला.
उपस्थित महिलांनी तीनवेळा ‘ओम’ उच्चारत ठराव संमत केला. तसेच शपथ घेतली. सूत्रसंचालन प्रा. दिव्या चंद्रेकर यांनी केले तर रेश्मा पाटील यांनी आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.