पणजी: राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर दररोज सरासरी तीन अपघात घडत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीतून समोर आलेले आहे.
२०२२ ते २०२४ या तीन वर्षांच्या काळात राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर एकूण ३,३०४ अपघात घडले. त्यात २०२२ मधील १,२५९, २०२३ मधील १,१२५ आणि २०२४ मधील ९२० अपघातांचा समावेश आहे. यातून प्रत्येक महिन्याला राष्ट्रीय महामार्गांवर ९२ आणि प्रत्येक दिवसाला सरासरी तीन अपघात घडत असल्याचे दिसून येते. याच काळात राष्ट्रीय आणि इतर सर्व प्रकारच्या मार्गांवर ८,५३९ अपघातांची नोंद झालेली असल्याचेही मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय दरवर्षी देशभरातील राष्ट्रीय आणि अंतर्गत मार्गांवर होणाऱ्या अपघातांची नोंद घेऊन त्यासंदर्भातील अहवाल सादर करीत असते. त्यात वाढत्या अपघातांची कारणेही अधोरेखित केली जातात.
राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणची अपघातप्रवण क्षेत्रे हटवण्यात येत आहेत. शिवाय दुखापती प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जात असून, त्याअंतर्गत देशभरातील सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांत एकूण १९६ ट्रॉमा केअर सुविधा मंजूर करण्यात आल्या आहेत, असेही मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.