कुडचडे: मिराबाग-सावर्डे येथे जुवारी नदीवर प्रस्तावित असलेल्या बंधाऱ्याविरोधात स्थानिक नागरिकांचा विरोध तीव्र होत चालला आहे. सोमवारी स्थानिकांनी बंधाऱ्याच्या कामासाठी आणलेली यंत्रसामग्री तेथून हटविण्यास कंत्राटदाराला भाग पाडले.
नेमके कोणते काम सुरू आहे, त्याचा उद्देश काय आणि त्याचे परिणाम काय असतील, याची कोणतीही अधिकृत माहिती सरकारने न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. सरकारतर्फे जुवारी नदीवर बंधारा उभारून त्या ठिकाणचे गोडे पाणी पंचवाडी व शिरोडा भागातील लोकांना पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या जुवारी नदीचे पाणी या भागात गोडे व पिण्यायोग्य असून ते खाऱ्या पाण्यात मिसळून वाया जात असल्याचा दावा केला जात आहे. हेच पाणी म्हैसाळ धरणात सोडून पुढे पंचवाडी व शिरोडा भागाला पुरवठा करण्याची योजना असल्याचे बोलले जात आहे. २०२३ मध्ये म्हैसाळ धरणातील जलसाठा अचानक कमी झाल्याने शिरोडा भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.
त्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने जुवारी नदीवर बंधारा बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र मिराबाग तसेच नदीकाठी असलेल्या शेजारील गावांना कोणतीही पूर्वसूचना न देता काम सुरू केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
काल झालेल्या बैठकीत नागरिकांनी हा प्रकल्प सध्याच्या स्वरूपात होऊ देणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला. स्थानिक पंचसदस्य संजय नाईक यांनी हा प्रकल्प राज्य सरकारचा असल्याचे स्पष्ट केले. शिरोडा भागातील पाणीसमस्येवर उपाय म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले; मात्र स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता काम सुरू करणे चुकीचे असल्याचे त्यांनी मान्य केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.