पुणे : माझी प्रकृती उत्तम असल्याचा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. ते शनिवारी गोव्यात दाखल होतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
मुख्यमंत्री सावंत यांनी स्वतः एक व्हिडिओ जारी करून आपल्या प्रकृतीसंदर्भातील सर्व शंकांचे निरसन केले आहे. त्यांनी म्हटले, की मी सर्वसाधारण तपासणी करण्यासाठी काल पुण्यातील ‘रुबी’मध्ये दाखल झालो आणि दिवसभरात सर्व तपासण्या करून घेतल्या. माझी प्रकृती उत्तम आहे, मी पुढच्या एक दिवसात गोव्यात परतून नियमित कामकाजास सुरुवात करणार आहे.
माझ्या प्रकृतीसंदर्भात दिवसभरात अनेक अफवा पसरल्या; परंतु माझ्या सर्व चाचण्या सामान्य आहेत आणि कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. पत्रकार व माध्यम समूहातील मित्र यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस केली आणि स्वाभाविकपणे चिंताही व्यक्त केली.
त्यांचा मी ऋणी आहे. शुक्रवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीसंदर्भात बरीच माहिती प्रसृत झाली होती. रुबी इस्पितळातूनही परस्परविरोधी निवेदने जारी झाली. भाजपच्या नेत्यांकडूनही विपर्यास्त माहिती जारी झाल्याने वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व शंकांचे निरसन करणारी चित्रफित जारी केली.
मुख्यमंत्री सावंत यांना वैद्यकीय चाचण्यांसाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचे सर्व अहवाल सामान्य असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्यावर कोणतीही मोठी शस्त्रक्रिया केलेली नाही, असा दावा रुबी इस्पितळातर्फे करण्यात आला.
तत्पूर्वी काल परस्परविरोधी निवेदन केले होते. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गोव्यातील प्रसारमाध्यमांना ‘सावंत यांच्यावर शस्रक्रिया झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. (शनिवारी) ते गोव्यात येतील’, असे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी तर्क-वितर्क वर्तविण्यात येऊ लागले होते.
‘जल जीवन मिशन २.०’अंतर्गत भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि गोवा सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. पुणे येथे असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आभासी पद्धतीने या करार करण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
हा करार केंद्रीय जल शक्ती मंत्री सी.आर. पाटील, राज्याचे पाणी पुरवठामंत्री सुभाष फळदेसाई तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आभासी पद्धतीने करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जल जीवन मिशनच्या पहिल्या टप्प्यात गोव्याने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा सुनिश्चित केला आहे. या मजबूत पायावर उभे राहून आता जल जीवन मिशन २.० अंतर्गत सेवा वितरण अधिक सक्षम करणे, टिकाऊपणा वाढविणे आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेवर भर देण्यात येणार आहे.
१ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल प्लॅटफॉर्म, डॅशबोर्ड, जिओ-टॅगिंग आणि रिअल-टाईम डेटा एकत्रिकरणाद्वारे प्रगत निरीक्षण प्रणाली उभारण्यावर भर देण्यात आला आहे.
२ याशिवाय, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, तसेच पाणी व्यवस्थापनासाठी गावपातळीवरील पथकांना प्रशिक्षण देण्यासाठी संरचित कौशल्यविकास कार्यक्रम राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
३ पाणीपुरवठा पायाभूत सुविधांची दीर्घकालीन कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत देखभाल व संचालन यंत्रणा विकसित करण्यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.