पणजी: गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या घटलीय, अशा आशयाच्या आकडेवारीसह केलेल्या पोस्टमुळे गेल्या महिन्यात वादंग निर्माण झाला. राज्यातील टॅक्सी माफिया, हॉटेलचे वाढलेले दर, स्थानिकांचा उद्धटपणा यावर अनेकांनी खापर फोडले. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवून सरकारने स्पष्टीकरणात शक्ती वाया घालवल्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मिडियावर गोव्यातील पर्यटनावर वाद सुरु झाला आहे.
गोव्याचा दिल्ली करण्याचा प्रयत्न देशी पर्यटकांनी केल्याने पर्यटनाचा ऱ्हास होत गेल्याचे रोखठोक मत गोव्यातील उद्योजक तरुणीने व्यक्त केले आहे. गोव्यातील पर्यटनाचा खराब अनुभव आल्याचे मत एका पर्यटकाने सोशल मिडियावर व्यक्त केले होते. या पोस्टवर तरुणीने प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला.
"गोव्याच्या सुट्टीवरुन परतलो आणि माझ्या लक्षात आलं की लोक गोव्याऐवजी बाली, थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांना पसंती का देत आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे स्थानिक लोकांची पर्यटकांप्रती असलेली निरुत्साही वृत्ती. गोव्यात पैशाचे मूल्य नाही आणि सध्या पर्यटकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले पर्याय उपलब्ध आहेत", असे मत उदीत भंडारी नावाच्या एक्स युझरने व्यक्त केले.
भंडारीच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. यात तरुण उद्योजक आयेशा लोबो हिने देखील मत व्यक्त केले. "पर्यटकांचे बेशिस्त वागणे, दारू पिऊन गाडी चालवणे, मारामारी करणे, परिसरातील शांतता भंग करणे यामुळे आम्ही त्रस्त झालोय. महिला पर्यटक आणि स्थानिकांना असुरक्षित वाटतेय."
"होय आम्हाला हे नको आहे! निश्चितच तुन्ही इतर पर्यटनस्थळी जा - आम्हाला आमच्या संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि वारशाची कदर करणारे लोक हवे आहेत, जे केवळ स्वस्तात मिळणारी मौजमजा आणि अल्कोहोलसाठी येत नाहीत," अशी प्रतिक्रिया लोबो या तरुणीने दिलीय.
"तुम्ही तेच लोक आहात ज्यांनी गोव्याची दिल्ली करुन त्याचा ऱ्हास केला. येथील नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास केला जेणेकरुन समुद्राकिनाऱ्यावर किंवा आसगावमध्ये तुम्हाला घरे बांधता येतील. गोमंतकीय खाद्यपदार्थाऐवजी तुम्हाला दिल्लीचे पदार्थ येथे मिळतील. स्थानिकांनी तुम्ही थमकावले असेल, त्यांना इजा केली असेल आणि त्याबदल्यात तुम्ही रेड कार्पेटची अपेक्षा करता? आम्हाला असे लोक नको आहेत", असे आयेशा लोबोने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोरोनानंतर गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याची आकडेवारी एका पोस्टद्वारे एका एक्स युझरने शेअर केली होती. पर्यटकांच्या घटलेल्या आकडेवारीचा ठपका राज्यातील टॅक्सी माफिया, वाढलेले हॉटेलचे दर, खराब वाहतूक व्यवस्था यावर ठेवण्यात आला. अनेकांनी गोव्यातील पर्यटनाचा वाईट अनुभव शेअर केला. यामुळे महिनाभर पर्यटनावरुन सोशल मिडियावर वाद पाहायला मिळाला. अनेक बड्या हस्ती आणि तज्ञांनी देखील या वादात उडी घेत मतं व्यक्त केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.