Goa Sand Mining Permit News
पणजी: आता पर्यावरण दाखले मिळाले तरी गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीसाठी रेती काढण्याचे परवाने अडले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी अधिकृतपणे रेती काढणे शक्य होण्याची शक्यता मावळली आहे.
राज्यात २०१८ पासून रेती काढणे बंद आहे. त्यामुळे शेजारील राज्यांमधून रेती आणावी लागत आहे. राष्ट्रीय हरित लवाद, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ यांच्यासमोरील खटल्यांना तोंड देत सरकारने अखेर परवाने देण्यासाठीची सज्जता केली होती. त्यासाठी पारंपरिकरित्या रेती काढणाऱ्यांकडून परवान्यांसाठी खाण खात्याने अर्ज मागवले होते.
मांडवी व झुआरी नदीत १२ ठिकाणी रेती काढण्यासाठी परवाने देण्यात येणार आहेत. मांडवी नदीत ७ तर झुआरी नदीत ५ ठिकाणी ही रेती काढता येणार आहे. दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेकडून अभ्यास करवून घेतल्यानंतर रेती काढण्यासाठीची सज्जता केली आहे.
रेती काढण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्यातील बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल आणि रेतीच्या वाढलेल्या दरांवर नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे. पर्यावरण दाखल्यांतील अटीनुसार उत्खनन केवळ पारंपरिक पद्धतीने, म्हणजे हाताने करण्यास परवानगी आहे; परंतु यंत्राद्वारे उत्खननास मनाई आहे. प्रत्येक परवानाधारकाला प्रतिवर्षी १ हजार घनमीटर रेती काढण्याची मर्यादा असेल आणि पावसाळ्यात (१ जून ते ३० सप्टेंबर) उत्खनन बंद ठेवणे बंधनकारक आहे.
परवान्यांपैकी ७० टक्के परवाने पारंपरिक रेती उत्खनन व्यावसायिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
उत्खनन सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेतच करता येईल आणि नदीच्या दोन्ही काठांपासून किमान २५ मीटर अंतरावर उत्खनन क्षेत्र असावे. पुलांपासून ५०० मीटर अंतरात रेती काढता येणार नाही, तसेच नदीतील बेट परिसराजवळ ५० मीटरपर्यंत उत्खननास मनाई आहे.
सध्या रेती काढण्यावर बंदी असल्याने स्थानिक बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. रेतीसाठी शेजारील सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातून आयात करावी लागत होती. परिणामी, रेतीच्या वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेत रेतीचे दर दुपटीने वाढले आहेत.
रेतीच्या किमतीत झालेल्या वाढीचा थेट परिणाम बांधकाम खर्चावर झाला आहे. लहान प्रकल्प, गृहबांधणी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची किंमत वाढली. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले. याशिवाय, सामान्य नागरिकांच्या घरबांधणीच्या स्वप्नावरही पाणी फिरले आहे.
प्राधिकरणाची बैठक एप्रिलमध्ये झाल्यानंतर त्यात याविषयी चर्चा होणार आहे. प्राधिकरणाने परवान्यास हिरवा कंदील दाखवला तर त्या बैठकीचे इतिवृत्त मे मध्ये कायम केले जाणार आहे. त्यानंतरच परवाने देण्यासाठी खाण खाते अर्ज विचारात घेऊ शकणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात रेती काढण्यासाठी आता पावसाळ्यानंतरच्या हंगामाचीच वाट पाहावी लागणार आहे.
याआधी पर्यावरण दाखले मिळाल्यावर परवाने जारी करता येतील, असे खाण खात्याला वाटत होते. गोवा राज्य पर्यावरण आघात मूल्यमापन प्राधिकरणाने पर्यावरण दाखले देताना प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याची अट घातली आहे. त्यामुळे खाण खात्याला नव्याने प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.