पणजी: गोव्यातून पंढरीची वारी जाण्याची परंपरा पोर्तुगीजपूर्व कालखंडापासून सुरू आहे. एकात्मतेचा संदेश देत पंढरपूरला पायी जाणारा भाविक प्रत्येकाला ‘माऊली’ म्हणून संबोधतो आणि विठ्ठलनामात तल्लीन होतो. सरकारकडून १ लाख ते ५ लाखांपर्यंत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही केवळ आर्थिक मदत नसून राज्यातील जनतेचा आनंद निर्देशांक वाढावा, आरोग्य चांगले राहावे तसेच परंपरा आणि संस्कृती टिकविण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. कला अकादमी येथे आयोजित वारकरी अनुदान योजनेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी कला आणि संस्कृतीमंत्री रमेश तवडकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार डॉ. दिव्या राणे, आमदार प्रवीण आर्लेकर, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, संचालक विवेक नाईक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, यंदा गोव्यातून पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची वारी प्लास्टिकमुक्त व्हावी, यासाठी सरकारकडून कपड्याच्या पिशव्या व इतर आवश्यक साहित्य पुरविण्यात आले आहे. प्रथमोपचार पेटीही देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूरात पुढील वर्षी गोवा भवनाचे उद्घाटन
राज्यातील वारकरी पंढरपूरला जात असल्याने त्यांच्या निवासाची सोय व्हावी, या उद्देशाने गोवा विठ्ठल-रखुमाई भवन उभारण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. मंदिरापासून सुमारे २ ते ३ किमी अंतरावर जमीन निश्चित करण्यात आली असून, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. पुढील वर्षी या भवनाचे उद्घाटन करण्याची संधी मुख्यमंत्री म्हणून मला मिळावी, यासाठी चरणी प्रार्थना करावी, असे सावंत म्हणाले.
मंत्री, आमदार झाले वारकरी
कला अकादमीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विठ्ठलनामाच्या गजरात आमदार, मंत्री, खासदार तसेच स्वतः मुख्यमंत्री हरिनामात तल्लीन झाले. ‘ज्ञानेश्वर माऊली... ज्ञानराज माऊली... तुकाराम...’ या गजरात वारकऱ्यांसोबत सर्वांनी ठेका धरला. आमदार डॉ. दिव्या राणे यांनी तुळशीवृंदावन डोक्यावर घेत हरिनामात सहभाग घेतला. मुख्यमंत्री सावंत यांनी चिपळ्या आणि वीणा हातात घेत हरिनामात तल्लीत झाले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले...
राज्यातील नोंदणीकृत सुमारे ३,५०० वारकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.कोणत्याही वारकरी मंडळाने सरकारकडे मदतीची मागणी केली नव्हती; सरकारने स्वतःहून ही योजना सुरू केली आहे.राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना सुरू ठेवण्यात येणार असून, अयोध्येतही लवकरच गोवा राम भवन उभारण्यात येणार आहे.
आजच्या इंटरनेटच्या युगातही मोठ्या प्रमाणात तरुणाई भक्ती आणि परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेत आहे, ही समाधानाची बाब आहे.राज्यातील ३५ वारकरी मंडळे आणि सुमारे ३,५०० वारकऱ्यांना वारकरी अनुदान योजनेचा लाभ मिळाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.