पणजी: गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे २२ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबरदरम्यान २७ दिवसीय ‘गोवा राखण यात्रा’ काढण्यात येणार आहे. गोव्याची जमीन, अस्मिता, पर्यावरण, संस्कृती आणि भवितव्य कोणत्याही राजकीय अथवा व्यावसायिक स्वार्थासाठी तडजोडीला लावले जाणार नाही, असा ठाम संदेश यात्रेतून देण्यात येणार आहे.
ही यात्रा राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांतून जाणार असून, जास्तीत जास्त गावे, शहरे आणि वस्त्यांपर्यंत पोहोचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दोनापावला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा, एम.के. शेख, सुनील कवठणकर आणि मीडिया व कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर उपस्थित होते. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे यात्रेचे संयोजक असतील.
नगर नियोजन कायद्यातील ३९ अ कलमाबाबत भूमिका स्पष्ट करताना आलेमाव म्हणाले की, २०२७ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास मंत्रिमंडळाची पहिली स्वाक्षरी ३९ अ रद्द करण्यासाठी असेल. गोव्याच्या जनतेचे हित हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोव्याच्या पर्यटनासाठी शाश्वत आणि संतुलित धोरण स्वीकारले जाईल. पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक रचनेचे संरक्षण करताना ब्रिटन व युरोपसह पारंपरिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील दर्जेदार पर्यटकांना गोव्यात आकर्षित करण्यावर भर दिला जाईल, असे आलेमाव यांनी सांगितले.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच सचिन पायलट यांच्यासह राष्ट्रीय नेते यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी साखळी मतदारसंघात गांधी जयंतीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत ‘गोवा राखण यात्रा’च्या टी-शर्टचे आणि प्रचारात्मक व्हिडिओचे अनावरण करण्यात आले. गोव्याची जमीन, पर्यावरण, वारसा, संस्कृती, रोजगाराच्या संधी आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व समाजघटकांनी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसने केले.
गोव्यासाठीचा लढा!
युरी आलेमाव यांनी ही यात्रा कोणत्याही समाजाविरोधातील लढा नसून गोव्याच्या जनतेचा गोव्यासाठीचा लढा असल्याचे सांगितले. जमीन बळकावणे, डोंगर कापणे, भ्रष्टाचार, फसवणूक, बेरोजगारी आणि सरकारी नोकऱ्यांची विक्री याविरोधात काँग्रेस आवाज उठवणार असून गोवा काही मोजक्या स्वार्थी शक्तींच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
जनतेसोबत करणार काम
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस केवळ जनतेशी संवाद साधणार नसून त्यांच्या समस्या, मते, दृष्टिकोन आणि अपेक्षाही जाणून घेणार असल्याचे सांगितले. जनतेच्या इच्छेविरुद्ध कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. सामाजिक सलोखा, एकता, पर्यावरणीय समतोल आणि गोव्याची संस्कृती जपण्यासाठी जनतेसोबत काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.