पणजी: कुळे येथे दूधसागर नदीत बुडून चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. पाण्याची खोली किंवा जलप्रवाहाची माहिती नसलेल्या ठिकाणी जाणे टाळावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
नवेवाडे-वास्को येथील एकाच कुटुंबातील तीन युवक आणि त्यांचा एक मित्र शनिवारी सहलीसाठी गेले असता ही दुर्घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, समुद्र, नदी, तलाव किंवा इतर जलाशयांमध्ये उतरण्यापूर्वी त्या ठिकाणच्या परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे. ती नसेल तर पाण्यात उतरणे धोकादायक ठरते.
दरम्यान, पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी युवकांसह पालकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले.