काणकोण: श्रीस्थळ औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त टाकी हटविताना साठवलेली मळी खालवडे येथील शेतजमिनीत व ओहळांमध्ये वाहून गेल्याने शेती व पाणीप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे, अशी माहिती श्रीस्थळ जैवविविधता समितीचे अध्यक्ष विनय तुबकी यांनी दिली.
गेल्या चार दिवसांपासून ओहळातील पाणी दुर्गंधीयुक्त झाले असून त्यावर अवलंबून असलेली मिरची शेती धोक्यात आली आहे. हे पाणी सिंचनासाठी वापरल्यास पिके करपण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच दूषित पाण्यामुळे जलचरांना धोका निर्माण झाला असून मासे मृतावस्थेत आढळण्याची भीती व्यक्त होत आहे.
या टाकीत एका मद्यनिर्मिती कंपनीची मळी साठवून ठेवण्यात आली होती. कंपनी बंद पडून सुमारे वीस वर्षे उलटली असून टाकीला गळती लागल्याने ती फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत ग्रामस्थ, पंचायत व जैवविविधता समितीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाकी रिकामी करून हटविण्याचे निर्देश दिले होते.
मात्र, टाकी कापून हटविताना आवश्यक खबरदारी न घेतल्याने मळी सखल भागातील शेतांमध्ये व ओहळात वाहून गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वीही अशाचप्रकारे मळी नदीपात्रात जाऊन मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्याचे समितीचे सदस्य शिरीष पै यांनी सांगितले.
योग्य कारवाई करू!
याप्रकरणी जलस्त्रोत खात्याचे अभियंते व पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे. हेतुपुरस्सर मळी सोडण्यात आली का, याचा तपास केला जाईल. जल व मृदा प्रदूषण ही गंभीर बाब असून संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल, असे उपजिल्हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.