पणजी: गोवा मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या मागील साडेचार वर्षांतील कार्याची तसेच त्यांच्या खात्याच्या कामांची माहिती जाणून घेण्याबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी आज भाजपच्या मंत्र्यांची आणि प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक घेतली.
६ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोवा दौऱ्यावर येत असल्याने ऐनवेळी पक्षाची व मंत्र्यांच्या कामगिरीची विचारणा झालीच तर ती त्यांच्यासमोर मांडता यावी, यासाठी ही बैठक घेतली असल्याची चर्चा आहे. येथील एका तारांकित हॉटेलमध्ये आज सायंकाळी मुख्यमंत्री सावंत यांनी ही बैठक घेतली.
मुख्यमंत्री म्हणाले, की सरकारने गत निवडणुकीवेळी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर सुशासन देण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. प्रत्येक मंत्र्याकडून कोणती कामे करता येऊ शकतात, त्याचबरोबर त्या कामांमध्ये काही अडचणी असल्यास मुख्यमंत्री या नात्याने मार्गदर्शन करू, असेही आश्वासन दिले आहे. शिवाय उर्वरित कामांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आल्याचे सावंत यांनी नमूद केले.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, की केंद्रीय मंत्री गोव्यात येत आहेत. शिवाय मंत्र्यांनी केलेली कामे आणि होणाऱ्या कामांबाबत माहिती सादर केली. काही मंत्र्यांनी कामे करताना येणाऱ्या अडचणीही मांडल्या. त्या कशा पद्धतीने लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले, की ही पक्षाची अंतर्गत बैठक होती. निवडणूक जवळ आली आहे; परंतु पक्षाची रणनीती काय ठरली, असे विचारताच अशा गोष्टी आपण उघड करू शकत नाही, असे ते म्हणाले.
या बैठकीविषयी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, माझ्या खात्याने गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या कामांचा आणि हाती घेतलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी, तसेच पुढे काय करणे आवश्यक आहे, यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजिली होती. याव्यतिरिक्त इतर कोणतीही चर्चा झाली नाही. निवडणुकीवरही चर्चा झाली नाही. केवळ सरकारच्या कामांवर चर्चा झाली.क्रीडामंत्री रमेश तवडकर म्हणाले, की प्रत्येक मतदारसंघातील आधीच हाती घेतलेल्या आणि यापुढे हाती घ्यायच्या विकासकामांबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मंत्र्यांच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सरकारमधील सर्व मंत्री आणि राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यात मागील साडेचार वर्षांत मंत्र्यांनी काय कामे केली, याचा आढावा घेण्यात आला. तसेच सध्या सुरू असलेल्या कामांचाही सर्व मंत्र्यांकडून आढावा घेण्यात आला. भविष्यात त्यांच्या खात्यातर्फे करावयाची कामे आणि प्रलंबित कामांचीही माहिती जाणून घेण्यात आली. त्याचबरोबर केंद्रीय योजनांची कशा पद्धतीने अंमलबजावणी करता येईल, याविषयीही चर्चा करण्यात आली.
त्याविषयी दीपकलाच विचारा : कामत
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले, की सावई-वेरे येथील एक रस्ता खचला असून त्याची दुरुस्ती केली जाईल. मी या रस्त्याची पाहणी केली असून, हा रस्ता ज्या कंत्राटदाराने केला आहे, तो ते काम करणार आहे. कदंबच्या बसस्थानकाचे काम कदंब महामंडळ व आयडीसी करते. दीपक ढवळीकर यांनी साबांखात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाविषयी कामत यांना विचारले असता, ‘त्याबाबत तुम्ही दीपकलाच विचारा’ असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.
सर्व मंत्री समाधानी : सदानंद तानावडे
खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, आगामी काळात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. मंत्र्यांनी केलेल्या कामांचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. अनेकांनी आपल्या खात्याच्या कामांचे व होऊ घातलेल्या कामांचे सादरीकरण केले. यावेळी कोणत्याही मंत्र्याने नाराजी व्यक्त केली नसल्याचे तानावडे यांनी नमूद केले.
निवडणूक व्यूहरचनेवर चर्चा
आजच्या बैठकीविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, की मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे संघटन या विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मंत्र्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना व विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.