डिचोली: यंदाचा काजू पिकाचा हंगाम जवळपास संपुष्टात आला असून काजू पिकाच्या हंगामात डिचोलीतील विविध भागांत चालणारा काजूपासून दारू गाळणीचा व्यवसायही बहुतेक भागात बंद झाला आहे. गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून धडधडणाऱ्या दारूभट्ट्याही शांत झाल्या आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत दारूभट्ट्यांची धडधड पूर्णपणे बंद होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
यंदा काजू हंगामाच्या मध्यंतरी काजूच्या बहरावर परिणाम झाल्याने यंदा काजू पीक तसेच दारू विशेष करुन ‘फेणी’ उत्पादनात मोठी घट झाली आहे, असा दावा काही काजू बागायतदारांनी केला आहे. अनुकूल हवामानामुळे यंदा काजू हंगामाच्या सुरवातीस काजूच्या झाडांना समाधानकारक बहर आला होता. मात्र, मध्यंतरी एप्रिल महिन्याच्या दरम्यान काजूच्या बहरावर परिणाम झाला. स्थानिक काजू बागायतींमध्ये काजू बोंडू कमी झाले. त्यामुळे बहुतेक भागात दारू उत्पादनावर परिणाम झाला आहे, असे दारू उत्पादकांचे म्हणणे आहे.
काजू पिकाच्या हंगामात तालुक्यातील सर्वण, मये, कारापूर, नार्वे, धुमासे, कुडचिरे, उसप आदी भागात काजू बोंडुंपासून दारू गाळणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असतो. साधारण तीन महिने दारू भट्टया पेटतात. यावर्षीही विविध भागात दारूभट्टया पेटल्या होत्या. आता काजू हंगाम जवळपास संपुष्टात आल्याने उसप, नार्वे आदी काही भागात दारू गाळणीचा व्यवसाय बंद झाला असून दारूभट्टयांची आगही विझली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दारू उत्पादनात मोठी घट झाली आहे, अशी माहिती नार्वे येथील काजू बागायतदार तुकाराम गावडे यांनी दिली. यंदा
मध्यंतरी स्थानिक बागायतीतून मिळणाऱ्या काजू बोंडुंचे प्रमाण घटले. महाराष्ट्रातूनही बोंडू मिळणे कठीण झाले. त्यामुळे दारू उत्पादन घटले आहे. यंदा फेणी उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. अशी कैफियत उसप येथील काजू बागायतदार तुळशीदास गावकर यांनी मांडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.