भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. मात्र, ऋतुराजने मैदानात आपल्या बॅटने उत्तर दिलं आहे. जयपूर येथे सुरू असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत गोव्याविरुद्ध खेळताना ऋतुराजने तुफानी शतक झळकावून निवड समितीला आरसा दाखवला आहे.
या सामन्यात महाराष्ट्र संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. केवळ ३ धावांवर महाराष्ट्राचे ३ गडी बाद झाले असताना ऋतुराज पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. एका बाजूने विकेट्स पडत असताना त्याने अतिशय संयमी खेळ केला. त्याने केवळ डाव सावरला नाही, तर विकी ओस्तवालच्या साथीने सातव्या विकेटसाठी १०८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
ऋतुराजने १३१ चेंडूत १३४ धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये ८ चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे महाराष्ट्राने ७ बाद २४९ धावांचा सन्मानजनक टप्पा गाठला.
या शतकासह ऋतुराजने विजय हजारे करंडक स्पर्धेत सर्वाधिक १५ शतके झळकावण्याच्या अंकित बावनेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे, अंकितने ९४ डावांत हा टप्पा गाठला, तर ऋतुराजने केवळ ५९ डावांत ही किमया साधली आहे. याव्यतिरिक्त, लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद २० शतके पूर्ण करण्याचा मानही आता ऋतुराजच्या नावावर जमा झाला आहे.
ऋतुराजने या खेळीदरम्यान ५,००० लिस्ट-ए धावांचा टप्पाही पार केला. सध्या त्याची सरासरी ५८.८३ इतकी असून, किमान ५० डाव खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये ही जगातील सर्वोत्तम सरासरी आहे. त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकल बेवन यांनाही या बाबतीत मागे टाकले आहे.
मागील महिन्यात रायपूर येथे पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावूनही ऋतुराजला संघात स्थान न मिळाल्याने अनेक माजी खेळाडूंनी संताप व्यक्त केला होता, परंतु ऋतुराजने आपल्या कामगिरीतून टीकाकारांना शांत केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.