नवी मुंबई: भारतीय महिला संघ इतिहासासह स्वप्नपूर्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे. १९८३ मध्ये कपिलदेव यांनी प्रभमच विश्वकरंडक जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली होती तशीच क्रांती उद्या हरमनप्रीत कौरचा भारतीय महिला संघ घडवणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम सज्ज झालेय. नुकतीच दिवाळी उत्साहात पार पडली आहे. उद्याची रात्र तशीच फटाक्यांच्या आतषबाजीने दुमदुमून जाऊ शकेल, केवळ भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा अडथळा पार करायचा आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांची मक्तेदारी मोडून यंदा भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ महिला एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे, त्यामुळे महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे.
२०१७ मधील विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियालाच हरवून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. यजमान इंग्लंडशी तुल्यबळ लढतही दिली; परंतु विजेतेपदाचा उंबरठा थोडक्यात पार करता आला नव्हता.
मिथाली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्या संघाचा अवघ्या नऊ धावांनी पराभव झाला होती. आताही ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्या वेळी अपूर्ण राहिलेली स्वप्नपूर्ती या वेळी पूर्ण करण्याची जबाबदारी हरमनप्रीत आणि स्मृती मानधनासारख्या अनुभवी खेळाडूंवर आहे आणि अर्थात दोन दिवसांपूर्वी अनन्यसाधारण खेळी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जवरही सर्वांचे लक्ष असणार आहे.
याच डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे तीनशे पलीकडचे कडवे आव्हान दिमाखात पार करून विजय मिळवला होता. त्या विजयाने कमालीची स्फूर्ती आणि ऊर्जा संघात संचारली, त्यामुळे भारतीय संघाकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे. त्यासाठी तमाम मुंबई आणि नवी मुंबईकर प्रेक्षक एकमुखाने आणि एकदिलाने भारतीय संघाच्या पाठीशी उभे राहणार आहेत.
या स्पर्धेत शानदार सुरुवात केल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यामुळे मायदेशात होत असलेल्या या विश्वकरंडक स्पर्धेची मोहीम अडचणीत आली होती; मात्र त्यानंतर न्यूझीलंडला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली आणि त्याच जोमाने ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवून लावले, त्यामुळे साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झालेला असला तरी उद्याच्या सामन्यासाठी भारतीय संघाला पसंती दिली जात आहे.
संघ ः भारत ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), जेमिमा रॉड्रिग्ज, हर्लीन देओल, शेफाली वर्मा, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, क्रांती गौड, रेणुका ठाकूर, श्री चरणी, अरुंधती रेड्डी, राधा यादव.
दक्षिण आफ्रिका ः लॉरा वुलफार्ट (कर्णधार), ताझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्टा (यष्टीरक्षक), कराबो मेसो (यष्टीरक्षक), ॲनेके बॉश, नादीन डे क्लर्क, ॲनेरी डर्क्सेन, मरिझान कॅप, स्यूने लूस, नोंडुमिसो शांगासे, क्लोए ट्रायॉन, आयाबोंगा खाका, मसाबाटा क्लास, नोंकुलुलेको म्लाबा, तुमी सेखुखुने.
मुंबई, नवी मुंबईत वातावरणात बदल झालेला आहे. गेल्या काही दिवस पाऊस पडत होता, आता पावसाची लक्षणे नसल्यामुळे उष्णता वाढली आहे. परिणामी, रात्री मोठ्या प्रमाणात दव पडत आहे, त्यामुळे रात्री गोलंदाजी करताना अडचणी येऊ शकतात. अर्थात त्यासाठी नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरू शकतो.
जेमिमा रॉड्रिग्जच्या एका खेळीने सर्व समीकरणे आणि वातावरण बदलले असले तरी उद्या विजेते होण्यासाठी भारतीय संघाला प्रामुख्याने क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सोपे झेल सोडण्यात आले होते.
तसेच वेगवान गोलंदाजीतही अचूकता आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रांती गौड आणि रेणुका ठाकूर यांना लय सापडली नव्हती; मात्र फिरकी गोलंदाजी दीप्ती शर्माने अंतिम टप्प्यात अचूकता आणल्यामुळे ऑस्ट्रेलियाला त्यांना अपेक्षित साडेतीनशे धावांचा टप्पा गाठू दिला नव्हता.
दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने आपल्या कामगिरीत चांगली सुधारणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध साखळी सामन्यात ६९ धावांत गारद झाल्यानंतर त्याच संघाला उपांत्य फेरीत पराभूत करण्याचा पराक्रम दक्षिण आफ्रिकेने केला होता आणि तोही अगोदरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९७ धावांत बाद झाल्यानंतर केला होता. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही परिस्थिती गाफील राहून चालणार आहे.
अनुभवी मरिझान कॅप (२०४ धावा, १२ बळी), नादीन डे क्लर्क (१९० धावा, ८ बळी), ताझमिन ब्रिट्स (२१२ धावा), क्लोए ट्रायॉन (१६७ धावा, ५ बळी) आणि कर्णधार लॉरा वुलफार्ट (४७० धावा) यांनी स्पर्धेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यांच्याकडून भारतीयांना धोका संभवतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.