काही कथा आकड्यांनी लिहिल्या जात नाहीत; त्या घामाने, अश्रूंनी आणि कधीही हार न मानणाच्या जिद्दीने लिहिल्या जातात. संजू सॅमसनची कथा अशीच आहे. कधी संघात स्थान मिळाले, कधी बाहेर बसावे लागले; कधी चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या, तर कधी टीकेचे वादळही झेलावे लागले. पण या सर्वांमध्ये संजू शांत राहिला - मनात एकच विश्वास ठेवून की, एक दिवस स्वतःला सिद्ध करेन. आणि त्याने ते करून दाखवले!
अहमदाबादच्या भव्य स्टेडियमवर जेव्हा संजूने आपली खेळी साकारली, तेव्हा ती केवळ धावांची इनिंग नव्हती; ती वर्षानुवर्षे साचलेल्या संघर्षाची, संयमाची आणि स्वप्नांची उधळण होती. त्या क्षणी कोट्यवधी भारतीयांच्या मनात एकच भावना होती, हा खेळाडू खरोखरच खास आहे. आज प्रत्येक जण संजूची थोरवी गात आहे. पण त्या थोरवीमागे असलेली वाट मात्र काटेरी होती.
केरळच्या शांत वातावरणात वाढलेला संजू लहानपणापासूनच क्रिकेटकडे आकर्षित झाला. घरातून मिळालेल्या प्रोत्साहनाने त्याच्या स्वप्नांना पंख मिळाले. केरळसारख्या राज्यातून भारतीय संघापर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान होते; पण संजूच्या डोळ्यांत स्वप्न होते आणि हातात बॅट.
त्याची फलंदाजी पाहताना एक वेगळीच लय जाणवते-सहज टायमिंग, मोहक शॉट्स आणि आत्मविश्वासाने भरलेली देहबोली. त्यामुळे तो लवकरच देशभर चर्चेत आला. आयपीएलने त्याला मोठे व्यासपीठ दिले.
राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत खेळताना त्याच्या कव्हर ड्राइव्हने आणि लांबच लांब षटकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले. त्याची ही शैली सुंदर होती, पण त्यामागे असंख्य तासांची मेहनत आणि अपार संयम दडलेला होता. काळाच्या ओघात तो केवळ खेळाडूच राहिला नाही, तर नेतृत्वाची जबाबदारीही त्याने खांद्यावर घेतली.
तरीही संजूचा प्रवास सोपा नव्हता. भारतीय संघात संधी मिळूनही सातत्याने स्थान मिळाले नाही. कधी फॉर्म घसरला, तर कधी संघसंयोजनामुळे त्याला बाहेर बसावे लागले. चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले-इतकी प्रतिभा असूनही संजू का चमकत नाही?
मात्र संजूने शब्दांनी नव्हे, तर बॅटने उत्तर दिले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, आयपीएलमध्ये पुन्हा पुन्हा धावा करत त्याने स्वतःची किंमत सिद्ध केली. प्रत्येक इनिंगमध्ये त्याची जिद्द दिसत होती-मी अजून संपलेलो नाही.
शेवटी त्या सातत्याला न्याय मिळाला. त्याच्या कामगिरीमुळे त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. संजू सॅमसन आज केवळ एक प्रतिभावान फलंदाज नाही; तो आशेचा, जिद्दीचा आणि हार न मानणाऱ्या स्वप्नांचे प्रतीक आहे. अपयश आले तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद त्याच्यात आहे. म्हणूनच भारतीय क्रिकेटला त्याच्या रूपाने असा खेळाडू मिळाला आहे, जो केवळ सामने जिंकत नाही, तर लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची हिंमतही देतो.
संजू, तू फक्त विश्वचषक जिंकला नाहीस-तू आमची मनेही जिंकलीस!
संजूच्या यशामागे कुटुंबाचा त्याग
संजू सॅमसनच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा त्याग आहे. त्याचे वडील सॅमसन विश्वनाथन दिल्ली पोलिसात कार्यरत होते. मुलाला क्रिकेटमध्ये उत्तम संधी मिळावी म्हणून त्यांनी नोकरी सोडून केरळमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिती फार मजबूत नसतानाही त्यांनी संजूच्या स्वप्नांना कधीही अडथळा येऊ दिला नाही. आई-वडिलांच्या या पाठिंब्यामुळेच संजूला क्रिकेटच्या मैदानावर स्वतःला सिद्ध करता आले. मुलावर पूर्णपणे विश्वास ठेवणाऱ्या विश्वनाथन यांना आज संजूच्या कामगिरीचा अभिमान आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.