डॉ. ऑस्कर रिबेलो
जेन-झीने आपल्या विनोदबुद्धीने, चातुर्याने आणि सहज मोहक शैलीने आम्ही जुन्या पिढ्यांनी अंगावर वाहून नेलेले विखारी राजकीय ओझे झटकून टाकले. त्यांनी असा काही अप्रतिम राजकीय प्रयोग घडवून आणला की, आम्ही फक्त आश्चर्याने पाहत राहिलो. आनंद आणि विजयाचा तो क्षण खरोखरच अविस्मरणीय होता.
खरं सांगायचं तर, विद्यार्थ्यांच्या लढ्यात एवढा दणदणीत विजय मिळेल, याची खुद्द झुरळांनाही कल्पना नसावी! चिकाटी, जिद्द, संघर्षाची तयारी आणि वाघासारखी झुंजार वृत्ती घेऊन जेन-झेडची पिढी मैदानात उतरली. आम्ही भारतातील राजकारणाचे जुने ‘डायनासोर’ मात्र आपापल्या विचारांच्या आणि राजकीय चौकटीत अडकून पडलो होतो. एकमेकांच्या पलीकडे पाहण्याची आमची तयारी नव्हती.
राजकारणाच्या रंगमंचावर दिखाऊपणापलीकडे काही ठोस घडू शकते, याची आशाही आम्ही जवळजवळ सोडून दिली होती. आणि अचानक...धाडकन्! जेन-झीने आपल्या विनोदबुद्धीने, चातुर्याने आणि सहज मोहक शैलीने आम्ही जुन्या पिढ्यांनी अंगावर वाहून नेलेले विखारी राजकीय ओझे झटकून टाकले. त्यांनी असा काही अप्रतिम राजकीय प्रयोग घडवून आणला की, आम्ही फक्त आश्चर्याने पाहत राहिलो.
आनंद आणि विजयाचा तो क्षण खरोखरच अविस्मरणीय होता. आता डोक्यात साचलेली कोळिष्टके थोडी झटकून, आपल्या या ‘दरिद्री गोयां’साठी या संपूर्ण घटनाक्रमातून मला काही महत्त्वाचे धडे दिसतात. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नव्हते, मुळीच नव्हते! या आंदोलनाचा संबंध सत्ताधारी भाजपसह कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाशी नव्हता. काय घडत आहे, याचा अंदाज राजकीय पक्षांनाही आला नव्हता.
आता अर्थातच सर्व पक्ष या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न करतील. तो त्यांचा अधिकार आहे. पण या आंदोलनामागे कोणत्याही पक्षाचा हात नव्हता. हा जेन-झीच्या मनात अनेक वर्षे साचलेल्या संतापाचा उद्रेक होता. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या, तडजोडींच्या राजकारणावर उभ्या राहिलेल्या आणि सामान्य माणसाचा विश्वास गमावलेल्या व्यवस्थेविरुद्धचा हा संताप होता.
भाजपची नेहमीची ‘देशविरोधी’, ‘हिंदूविरोधी’ अशी आरोपांची पोपटपंचीही यावेळी चालली नाही. कारण हा मुद्दा वेगळा होता. हा तरुणांच्या भविष्याशी संबंधित खरा आणि ज्वलंत प्रश्न होता. विशेष म्हणजे, राजकारणात नेहमी दोन पावले पुढे असणारा भाजपही हा उद्रेक ओळखू शकला नाही. इतर कोणत्याही राजकीय पक्षालाही त्याची चाहूल लागली नाही. भ्रष्टाचार हा आता देशाच्या राजकारणातील सर्वांत मोठा मुद्दा बनत आहे.
२०१४ मध्ये ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनाने भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी आणला होता. भाजपने बँकिंग व्यवस्था, आर्थिक व्यवहार आणि करचुकवेगिरी रोखण्यासाठी काही प्रशंसनीय प्रयत्न केले असतील; पण राजकीय भ्रष्टाचार आणि सत्तेचा लोभ कमी झालेला दिसत नाही. उलट, परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याचे जाणवते.
गोव्याचेच उदाहरण घ्या. भ्रष्टाचाराचा दुर्गंध इतका पसरला आहे की, तो झाकण्यासाठी ‘डिओडरंट’ अन् ‘परफ्यूम’ही अपुरे पडतील, अशी स्थिती आहे. दावे मोठे केले जाताहेत. पण प्रत्यक्ष कृती मात्र पोकळ आहे. आणि आता सामान्य माणसाला हे सगळे समजू लागलेय. ‘झुरळ’ जागा झाला आहे आणि तो प्रतिकार करू लागलाय. आंदोलकांना देशविरोधी ठरवले वा त्यांच्यावर राजकीय शिक्के मारले, तरी जनतेच्या मनातील भ्रष्टाचाराविषयीचा संताप कमी होणार नाही.
माझे काही मित्र कट्टर ‘आरएसएस’ समर्थक आहेत व त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर मतभेदही होतात. संघाच्या कार्यपद्धतीमुळे देशाला अनेक प्रामाणिक व भ्रष्टाचारापासून दूर राहणारे नेते मिळाले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, श्यामा प्रसाद मुखर्जी, मनोहर पर्रीकर आणि इतर अनेक नेते याचे उदाहरण आहेत.
पण आजची स्थिती काय आहे? काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अनेक नेत्यांवरच पक्षाची राजकीय ताकद अवलंबून आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी पक्ष बदलणाऱ्यांची संख्या वाढली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनासाठी भाजपशी निष्ठावान असलेले काही नेते आक्रमकपणे पुढे आले. कारण त्यांची पार्श्वभूमी संघाशी जोडलेली आहे. पण पक्षांतर करून आलेले नेते त्याच ताकदीने त्यांच्या बचावासाठी उभे राहिले का? उत्तर ठामपणे ‘नाही’ आहे.
आता भ्रष्टाचार हा सर्वांत मोठा राजकीय मुद्दा बनत आहे. त्यामुळे ‘आरएसएस’ व भाजपने काळाची ही नवी चाहूल ओळखायला हवी. विरोधकांसाठीही ही मोठी संधी आहे; पण... २०१४ मध्ये भाजप अत्यंत शिस्तबद्ध, संघटित आणि सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज होता. २०२६ मध्ये विरोधकांकडे मात्र अशी एकजूट दिसत नाही.
या ऐतिहासिक जेन-झी आंदोलनाचा राजकीय परिणाम काहीही असो, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. जेन-झी आता ओळखीच्या राजकारणाच्या सापळ्यात सहज अडकणार नाही. जात नाही, हिंदू-मुस्लिम नाही. भाषेच्या नावावरचे राजकारण नाही. ‘आम्ही विरुद्ध तुम्ही’ या नेहमीच्या राजकीय खेळालाही ते सहज बळी पडणार नाहीत. झुरळांना जात असते का? धर्म असतो का? कुतूहल म्हणून विचारतोय! जग पुन्हा मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.