सर्वेश बोरकर
शिवराज्याभिषेक या आपल्या भारतीय अस्मितेच्या व स्वाभिमानाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण सोहळ्याचा पुन्हा पुन्हा जागर होणे, ही आपल्या व समाजाची नितांत गरज.
जा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हिंदू तिथीनुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशीला झाला. या वर्षी शिव शक ३५३ या दिवसाची सुरुवात झाली आहे. ग्रेगोरियन किंवा इंग्रजी कॅलेंडरनुसार शिवाजी राज्याभिषेकची तारीख ६ जून १६७४ रोजी होती.महाराजांचा शिवराज्याभिषेक या इतिहासातील विलक्षण, अशा अलौकिक घटनेला त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.
शिवराज्याभिषेक या आपल्या भारतीय अस्मितेच्या व स्वाभिमानाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण सोहळ्याचा पुन्हा पुन्हा जागर होणे, ही आपल्या समाजाची नितांत गरज. इंग्रजांनी शिवाजी महाराजांकडे औपचारिक दूत १६ एप्रिल १६७४ रोजी पाठवण्याचा निर्णय घेतला. विशेषत: महाराजांचा राज्याभिषेक १६७४ साली जूनमध्ये रायगडला होणार होता. यावेळी इंग्लिश राजदूत हेन्री ऑक्सिंडन यांची इंग्लिश प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
त्यांना आणि नारायण शेणवी यांना रायगडला पाठवण्यात आले. १३ मे ते १६ जून या कालावधीत ऑक्सिंडेनच्या महाराजांच्या भेटीची कथा त्याच्या पत्रांमध्ये किंवा वर्णनात मोठ्या प्रमाणात चित्रित केली गेली आहे; ज्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, वाटा घाटीचा मार्ग आणि अंतिम करार याबद्दल मौल्यवान तपशील आहेत.राज्याभिषेकाला उपस्थित असलेले इंग्लिश राजदूत हेन्री ऑक्सिंडन यांनी कार्यवाहीचा ज्वलंत लेखाजोखा पुढीलप्रमाणे दिला आहे. या घटनेच्या मराठा ऐतिहासिक नोंदींमध्येही स्पष्टपणे विपुल नोंदी आहेत.
महाराज शिवाजी राजे भोसले यांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६, शुक्रवार घटी २१, पळे ३४, विष्कंभ ३८, घटिका ४०, पळे सिं ४२ तीन घटिका रात्र उरली असताना म्हणजेच हिंदू तिथीनुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशीला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. सामान्य रयतेचे स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष करून ‘छत्रपती’ हे पद धारण केले गेले.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून संभाजीराजे महाराजांचाही अभिषेक करण्यात आला. या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने आधी सुरू झाली होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते.
चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. राज्यातील श्रीमंत, गणमान्य व्यक्ती, सरदार, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज गढून गेले होते. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाई यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवदर्शन केले आणि ते रायगडाला १२ मे १६७४ रोजी परत आले.
२१ मे रोजी पुन्हा रागयगडावर ते धार्मिक विधीत गुंतून गेले. महाराजांनी २८ मे रोजी प्रायश्चित्त घेतले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह विधी केला. त्यावेळी गागाभट्टांना ७ हजार होन तर इतर सर्व ब्राह्मणांना मिळून १७ हजार होन दक्षिणा दिली. दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून मंत्रोच्चार आणि संस्कारांबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बाल संभाजी राजे थोडेसे मागे बसले होते.
अष्टप्रधानांतील गंगेसारख्या आठ मुख्य नद्यांचे पाणी जलकुंभात भरून आणले होते; त्या जलाने छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला गेला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहीर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राजमुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली तसेच मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शुभ चिन्हांनी सजवलेले होते. सभासदांची बखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे (सध्याच्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे १६.१२ कोटी रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. सोळा सुवासिनींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेने महाराजांना आशीर्वाद दिला.
ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, वस्त्रे, शस्त्रे दान केली. हे सर्व सकाळी आठ वाजेपर्यंत संपले. समारंभ संपल्यावर, रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.शिवराज्याभिषेकाला त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या भारतीय अस्मितेच्या व स्वाभिमानाच्या या सोहळ्याचा पुन्हा पुन्हा जागर होणे, ही समाजाची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.