Goa Assembly 2022 Khari Kujbuj

 
Dainik Gomantak
गोवा निवडणूक

नवरोबांचे काही खरे नाही?..खरी कुजबूज..!

दैनिक गोमन्तक

Goa Assembly 2022

अधिक बॅनर्स, अधिक मोबदला!

कार्यक्रम, सोहळ्यानिमित्त मंगलमय वातावरण निर्मितीसाठी आपण पताका, तोरणे लावतो. आता निवडणूक सोहळा घटिका समीप आल्‍याने राजकीय पक्षांनी चौका चौकात, शहरात लक्ष्‍यवेधी ठिकाणी पक्षाचे चिन्ह असलेल्‍या पताका जळीस्‍थळी लावल्‍या आहेत. त्‍यातील काही पक्षीय पताका रातोरात गायब होतात, तरीही दुसऱ्या दिवशी नव्‍या जोशात पूर्वी लावल्‍या, त्‍यापेक्षा अधिक पताका, तोरण लावल्‍या जातात. कार्यकर्ते व रोजंदारीवरील कामगार पताका लावून त्‍याचे मोबाईलवर (Mobile) टिपण न विसरता करीत आहेत. काही ठिकाणी तर एकच पोस्‍टर, बॅनर लावून त्‍याचे फोटो काढून ते काढले जाते व अन्‍य ठिकाणी तोच बॅनर लावला जातो आणि पुन्‍हा फोटो काढला जातो. त्‍यांचा हा प्रताप बघणाऱ्यांचे कुतुहल वाढले. चौकशबुद्धीने विचारले आणि आतील गोटातील सत्‍य उलगडले. साळसूदपणे त्‍या पोस्‍टर लावणाऱ्यांनी उत्तर दिले, अधिक बॅनर्स, पोस्‍टर्स लावली, तर अधिक मोबदला. मोबाईलवरील फोटोंचा पुरावा आहेच ना! ∙∙∙

कुंभारजुवेत पुन्हा शांतता!

कुंभारजुवे मतदारसंघात आमदार पांडुरंग मडकईकर आजारी झाले, तेव्हा अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आणि स्वयंघोषित उमेदवारीही जाहीर केली. पण काही महिन्यात पांडुरंग मतदारसंघात फिरू लागले, तेव्हा ते स्वयंघोषित उमेदवार थोडे नरमले. काहींनी पक्ष बदलले, तरीसुद्धा काहींच हाती लागत नाहीत, म्हणून पुन्हा दुसरा पक्षही जवळ केला. पण आत्ता या मतदारसंघात पुन्हा शांतता निर्माण झाली आहे. कारण उमेदवारीबाबत कॉंग्रेस, आप, तृणमूल, भाजपमध्ये काहीच हालचाल दिसत नाही. तेव्हा आगामी काही दिवसात उमेदवारीचे गाजर पाहूनच पुन्हा पक्षांतर होण्याची शक्यता आहे. ∙∙∙

बाबू झाला भाऊ!

केपेचे आमदार बाबू कवळेकर (Babu Kavlekar) यांची प्रतिमा कोणालाही सहजपणे भेटणारे आमदार अशी आहे. केपेतील कित्येक लोक अजूनही त्यांना बाबू या एकेरी नावाने हाक मारतात. मात्र मंत्री झाल्यावर काम वाढल्याने असेल कदाचित बाबू आता पूर्वीसारखे सहज भेटत नाहीत. कालच्या सभेत माजी आमदार दामू नाईक यांनी जे वक्तव्य केले ते पाहिल्यास दामुच्याही कानांवर ही गोष्ट गेली तर नाही ना असे कित्येकांना वाटल्याशिवाय राहिले नाही. कारण दामू म्हणाले, बाबू आता पूर्वीसारखा बाबू (लहान बाळ) राहिलेला नाही. आता तो केपेकरांचा भाऊ झाला आहे. ∙∙∙

फोंड्यात रामायण, सत्तरीत महाभारत!

राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण तापले आहे. येनकेनप्रकारेन कोठूनही निवडून येण्याचा चंग इच्छुकांनी बांधला आहे. सत्तरीत तर सध्या महाभारत सुरू आहे. पर्ये मतदारसंघावरून राणे पितापुत्रांत हे महाभारत घडत आहे. मी की तू असा हा प्रकार आहे. त्यामुळे महाभारतातील रणागणाची आठवण यावी असा हा प्रकार आहे. दुसऱ्या बाजूला फोंड्यात रामायण सुरू आहे. फोंड्यात रवी नाईक आणि त्यांचे पुत्र रितेश नाईक हे राजकारणात आहेत. रितेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र रवींनी त्यावेळेला हा प्रवेश टाळला होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर रवी नाईकही (Ravi Naik) भाजपवासी झाले आहेत. तरीपण फोंड्यातील भाजपची तिकीट कोणाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुणी म्हणतात, रवींना तर कुणी म्हणतात रितेशना. आता एक खरे, दोघांपैकी एकाला जरी तिकीट मिळाले, तरी राणे पिता-पुत्राप्रमाणे या ठिकाणी बंडाळी होणार नाही. रामायणात दशरथपुत्र आज्ञाधारक होता, तसाच प्रकार रितेशचाही आहे. आहे की नाही फोंड्यात रामायण आणि सत्तरीत महाभारताची कथा...! ∙∙∙

बाबू खुश झाला!

मोग्यॉंबो खुश हुवा! हा हिंदी फिल्मी संवाद एकेकाळी बराच गाजला होता. परवा बाबू कवळेकरांच्या जनसभेतील जनतेचा महापूर पाहून बाबूचे समर्थक अवेडे पंचायतीचे सरपंच आलेल्यू अल्फान्सो यांनी मोग्यॉंबो खुश हुवा, हा संवाद म्हणून टाळ्या घेतल्या. कालपर्यंत बाबू डेंजर झोनमध्ये, सर्व बाबूच्या विरोधात, बाबूला काँग्रेस (Congress) सोडणे महागात पडेल, बाबू हरणार अशा चर्चा रंगत होत्या. मात्र केपेत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष , संघटन मंत्री व जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत आठ हजाराच्यावर जनसमुदाय आणून बाबूने आपले शक्तिप्रदर्शन करून सगळ्या चर्चा व अफवा खोट्या असल्याचे सिद्ध केले. मोग्यॉँबो खूश होवो, या ना होवो, पण बाबू मात्र निश्चितच खूष झाले आणि एल्टनचे टेंशन मात्र वाढले असणारच. ∙∙∙

नवरोबांचे काही खरे नाही?

उमेदवारी लाटण्‍यासाठी इच्छुक काय करतील, याचा काही नेम नाही. पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्‍यासाठी शक्तिप्रदर्शन हा जालीम उपाय. मात्र, त्‍यासाठी कार्यकर्ते पैसे मोजून आणणे हे सध्‍या फॅड झाले आहे. उमेदवारांचा ‘राजकीय तमाशा’ बघायचा आणि खाणे, पिणे व हातावर दिसवडा घ्‍यायचा, असाच दिनक्रम सध्‍या काहीजणांचा सुरू आहे. त्‍यासाठी किती तास लागतो, कुटुंबियांची फरफट होतेय, याचे भानच नसते. नवरोबा घरात काही सांगत नाही, सकाळी लवकर बाहेर पडतात, उत्तररात्री येतात, घरात जेवतही नाही. भूक नाही म्‍हणून सांगून वेळ मारतात, केलेले जेवण फुकट! काही पतीव्रता तर नवरोबांची जेवणासाठी मध्‍यरात्रीपर्यंत वाट बघतात. नवरोबा उमेदवारासोबत चक्क ओली पार्टी झोडून पावले मोजत कसेबसे घरात पोहोचतात आणि भूक नाही, अशी थाप नीट शब्‍द न उच्चारता मारतात. गृहिणींना वाटते नवरोबा दमलेय आणखी काही विचारायचे नाही, अशी मनाची समज करून घेतात. उमेदवारांची हौस मात्र, गृहिणींना नडतेय, हे मात्र खरे! ∙∙∙

मेश्यू खांब विसरला!

कुठे काय बोलावे, याचे तारतम्य राहिले नाही, म्हणजे बोलणाऱ्याचे आणि बोलण्यास सांगणाऱ्याचे हसे होते, याचे उत्तम उदाहरण परवा भाजपच्या केपेतील सभेत मेश्यू डिकॉस्टा या इसमाने दिले. मेश्यूला केपेचे आमदार बाबू कवळेकर यांच्या प्रचार सभेत बोलायचे होते. मात्र मेश्यू विसरला की सभा बाबूची आहे आणि तो बाबूच्या धर्मपत्नी सावित्रीला आम्ही भाजपच्या उमेदवारीवर निवडून आणणार असे बोलून गेला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे गुणगान करीत सावित्री या अंत्योदय स्तरावर काम करीत असून बाबूंबरोबर त्याही भाजपच्या आमदार बनणार असे मेश्यू बोलला बरे झाले, मेश्यू बोलत होता, तेव्हा मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष मंचावर नव्हते. मात्र सभेला मंडपाबाहेर उभा असलेल्या एकाने मेश्यूला भाषणावर छान कोटी केली "मेश्यू खांबो चुकलो. ऐतिहासिक नाटकात भीम व दुर्योधनाचे पात्र खेळणाऱ्या कलाकारांनी आपले संवाद मंचाच्या खांब्यावर चिकटविले होते. खांब्याला पाहून दोघे संवाद बोलत होते. नाटकात लढाई करताना दोघे बाजू बदलतात व भीम दुर्योधनाचे संवाद बोलतो, तर दुर्योधन भिमाचे संवाद म्हणतो मेश्यूचा खांब बदलला आणि तो सावित्रीचे गुणगान करून गेला ∙∙∙

गर्दीचे गणित असे!

मंगळवारी केपे येथे झालेल्या भाजपच्या सभेत 10 हजार लोकांची उपस्थिती असल्याचा दावा आयोजकांनी केला असला तरी केपे नगरपालिका चौकाचे एकूणच क्षेत्र पाहिल्यास या लहानशा जागेत भाजपने 10 हजार लोक कोंबले कसे? हा प्रश्न पडावा. तरीही या सभेला असलेली उपस्थिती तशी लक्षणीय होती, असे म्हणावे लागेल. काही बसेस सांगे आणि गावडोंगरी येथून आणल्या गेल्या तरी केपेतील लोकही बऱ्यापैकी होते. यामागचे कारण सांगण्यात येते, ते असे की केपे जे लोक आले होते, त्यांना वाहतूक खर्च दिला होती.यासाठी कुपन सिस्टीम केली होती. परत घरी जाताना हे कुपन दाखविले, की पैसे दिले गेल्याचे सांगितले जात आहे. आधी पैसे दिले आणि तो सभेला आलाच नाही तर! नसती बिशाद नको, म्हणून तर ही अशी तजवीज होती. ∙∙∙

मेश्यू खांब विसरला!

कुठे काय बोलावे, याचे तारतम्य राहिले नाही, म्हणजे बोलणाऱ्याचे आणि बोलण्यास सांगणाऱ्याचे हसे होते, याचे उत्तम उदाहरण परवा भाजपच्या केपेतील सभेत मेश्यू डिकॉस्टा या इसमाने दिले. मेश्यूला केपेचे आमदार बाबू कवळेकर यांच्या प्रचार सभेत बोलायचे होते. मात्र मेश्यू विसरला की सभा बाबूची आहे आणि तो बाबूच्या धर्मपत्नी सावित्रीला आम्ही भाजपच्या उमेदवारीवर निवडून आणणार असे बोलून गेला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे गुणगान करीत सावित्री या अंत्योदय स्तरावर काम करीत असून बाबूंबरोबर त्याही भाजपच्या आमदार बनणार असे मेश्यू बोलला बरे झाले, मेश्यू बोलत होता, तेव्हा मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष मंचावर नव्हते. मात्र सभेला मंडपाबाहेर उभा असलेल्या एकाने मेश्यूला भाषणावर छान कोटी केली "मेश्यू खांबो चुकलो. ऐतिहासिक नाटकात भीम व दुर्योधनाचे पात्र खेळणाऱ्या कलाकारांनी आपले संवाद मंचाच्या खांब्यावर चिकटविले होते. खांब्याला पाहून दोघे संवाद बोलत होते. नाटकात लढाई करताना दोघे बाजू बदलतात व भीम दुर्योधनाचे संवाद बोलतो, तर दुर्योधन भिमाचे संवाद म्हणतो मेश्यूचा खांब बदलला आणि तो सावित्रीचे गुणगान करून गेला ∙∙∙

आता पाळी कुणाची?

चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेतील आमदारांची संख्य्या या दिवसातील राजिनामा सत्रामुळे दिवसेदिवस घटत चालली आहे, निवडणुकीची घोषणा होईपर्यत ती किती राहिल असा प्रश्न पडूं लागला आहे. मुद्दा तेवढ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही तर अशा या राजिनाम्यामुळे संबंधित मतदारसंघ पोरके झालेले असून या मंडळींना तेथील लोकांचे काहीच पडून गेलेले नाही हेच सिध्द होते, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ∙∙∙

प्रियोळात ‘आप’चे उमेदवार नोनू?

प्रियोळ मतदारसंघात भाजप, मगोनंतर गोविंद गावडे यांनी विजश्री मिळवली. या मतदारसंघात अद्याप काँग्रेसला मतदारांनी जवळ केले नाही. तेव्हा तृणमूलही दूरच आहे. म. गो.शी तृणमूलची युती झाल्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक तृणमूलवासीयांचे काय होणार? हा मोठा प्रश्‍न त्यांना सतावत आहे. जे नोनू नाईक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी ओबीसीच्या मतावर हक्क सांगत आत्ता ‘आप’ची झाडू हाती घेतली असून शक्य तेथे ‘झाडू’ चा प्रताप दाखवत आहेत. भ्रष्‍ट्राचार, फसवणुकीविरोधात ‘झाडू’ मारण्यासाठी त्यांनी परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. त्यामुळे ‘आप’ला प्रियोळ मतदारसंघात ‘नोनू’च उमेदवारी फटकावतील, अशी मतदारांत चर्चा सुरू आहे. ∙∙∙

सतीशराव लोकांमध्ये मिसळू लागले

प्रसिद्धी, व्यासपीठ यापासून दोन हात दूर राहणारे भाजपचे महामंत्री सतीश धोंड मध्यंतरी व्यासपीठावर दिसू लागले होते. मात्र मंगळवारी केपे येथे झालेल्या सभेच्यावेळी सतीशराव व्यासपीठावर न चढता लोकांमध्ये फिरत असताना दिसले. सध्या गोव्यात भाजप विरोधात लोकांमध्ये जी चीड आहे ती घालविण्यासाठी आता लोकांत मिसळणे गरजेचे हे कदाचित त्यांना कळले नसावे ना ! ∙∙∙

...प्रियोळ प्रगतिपथावर!

प्रियोळ मतदारसंघात विकासाठी गंगा आपण आणल्याचा दावा मंत्री गोविंद गावडे करीत असून विकासाची संपूर्ण माहिती सहजपणे सदिच्छा भेटीत देत असून आत्ता त्यांच्या विकासाचा तपशील ‘हर बोले प्रियोळ प्रगतिपथावर’ या पुस्तिकेत दिलेला आहे. प्रियोळ प्रगती मंचतर्फे प्रकाशित या पुस्तिकेत केव्हा, कधी, कुठे, कोणता विकास केला याचे सचित्र दर्शन या पुस्तिकेत केले आहे. एका अर्थाना गोविंदाने आपले प्रगतिपुस्तकच मतदारांसमोर ठेवले आहे. कारण घरोघरी हे पुस्तक कार्यकर्त्यांनी पोचविले आहे. अनेकांना वाटले हा दिवाळी-नाताळचा विशेष अंक असावा, हे तर गावडे यांच्या कामाचे प्रगती पुस्तक आहे. ∙∙∙

असाही एक योगायोग

ग्वाल्हेर मधील सिंदिया राजघराणे व गोव्यातील राणे घराणे यांचे नाते आहे. पण योगायोगाची गोष्ट म्हणजे त्या घराण्याप्रमाणेच गोव्यातील राणे कुटुंबात राजकीय वादळ उठले आहे. तेथे माता व कन्या भाजपात तर पुत्र काँग्रेसमध्ये. गोव्यात पिता काँग्रेसमध्ये तर पुत्र भाजपात आहे. तेथे काँग्रेसमधून नातू भाजपात दाखल झाला आहे. गोव्यात स्नुषा कोणत्या पक्षात ते अजून स्पष्ट झालेले नाही. ∙∙∙

भाजपने जोशुआंना डावलले?

म्हापसा येथे भाजपतर्फे झालेल्या देवस्थान पदाधिकारी संमेलनात आमदार जोशुआ डिसोझा यांची व्यासपीठावर असलेली अनुपस्थिती त्या कार्यक्रमावेळी चर्चेत होती. काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेले सुधीर कांदोळकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना म्हापशात भाजपची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या खुद्द भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचाच परिपाक म्हणून भाजपचे विद्यमान आमदार जोशुआ डिसोझा यांना मुद्दामहून त्या कार्यक्रमाबाबत डावलले आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्या कार्यक्रमात वक्त्यांनी भाजप, राज्य सरकार, केंद्र सरकार, मुख्यमंत्री सावंत, पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली असली तरी एकाही वक्त्याने म्हापशाच्या आमदाराच्या कार्यांची(?) ओझरतीदेखील प्रशंसा केली नाही. या एकंदर घडामोडींमुळे सुधीर कांदोळकर यांच्या संभाव्य भाजपप्रवेशाबाबत दुजोरा मिळतो, एवढे मात्र नक्की! ∙∙∙

प्रियोळात नेमके काय दडलेय?

सुरवातीला प्रियोळ मतदारसंघात आतला, बाहेरचा उमेदवार अशी चर्चा रंगली. त्यानंतर जातीचे राजकारणही पुढे आले. भंडारी समाजाला प्रतिनिधित्व हवे, असाही सूर लावला गेला. त्यातून पुढे ‘आप’ची सूत्रे नोनू नाईक, राजदीप नाईक यांच्याकडे आली. पण आत्ता एक नवा वैश्‍य समाजातील अभियंता आपले नशीब आजमावण्यासाठी गुप्त बैठका घेत आहे. आपली किमान सहा हजार मते आहेत, असे तो छातीठोकपणे सांगत आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमके काय दडले आहे, त्याचाच शोध इच्छुक उमेदवार घेत असावेत, अशी चर्चा मतदारांत सुरू आहे. ∙∙∙

संकल्प रथ आणि सरकारचे ध्येयधोरण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रत्येक मतदारसंघातून संकल्प रथ फिरवण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांसाठी लोकांकडून त्यांची मते आणि सूचना मागविण्यात येत आहेत. या सूचना आत्ताच का? असा प्रश्न काही जाणकार नागरिक विचारत आहेत. त्यांच्या मते गेल्या दहा ते जनतेच्या मताचा विचार करत होते, की आपला अजेंडा राबवत होते, असाही प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय. ∙∙∙

फिफ्टी-फिफ्टीची शक्यता!

फोंडा तालुक्यात सध्या मतदार संभ्रमात आहेत. यावेळेला कोण निवडून येणार, हे कोणालाच माहिती नाही. मडकई मतदारसंघातही वेगळेच चित्र असून इतर ठिकाणी फिफ्टी फिफ्टी असा प्रकार आहे. त्यामुळे मडकई सोडल्यास इतर ठिकाणच्या मतदारसंघात सुंदोपसुंदी ही होणारच. त्याचबरोबर प्रत्यक्ष निवडणूक आणि मतदावेळी काय होणार? याची चिंता सूज्ञ मतदारांना लागून राहिली आहे. यावेळेला निवडून येण्याचा चंग प्रत्येक उमेदवाराने बांधला आहे. त्यामुळे येणारा काळ हा कसा असेल कोण जाणे बाबा... असे मतदारच म्हणू लागले आहेत. ∙∙∙

एक चान्स ‘आप’लाही द्या!

‘आप’चे केजरीवाल यांनी एक चान्स ‘आप’ला हे सांगताना मगोचे पंधरा वर्षांचे सरकार, काँग्रेसचे 27 वर्षे सरकार आणि भाजपचे पंधरा वर्षाचे सरकार आपण (गोमंतकीयांनी) दिले. आता एक चान्स ‘आप’लाही देऊन बघा. कारण ही सर्व सरकारे भ्रष्टाचारी होते, असा जाहीर वक्तव्य केले. मात्र जुन्या जाणकार मंडळींकडून याला आक्षेप आहे. भाऊसाहेबांचा सरकारही भ्रष्टाचारी होते का? असा सरळ प्रश्नही लोक विचारत आहेत. या यापूर्वीच्या सरकारांनी कोणतीच विकास कामे केली नाहीत, असेही केजरीवाल म्हणतात. मग उभारलेले पूल, रुग्णालय शाळा, शैक्षणिक संस्था कशा उभ्या राहिल्या हाही प्रश्नच आहे, आता केजरीवाल सर काय उत्तर देतात, हे बघावे लागणार. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT