S Jaishankar On Europe Selling Weapons To India Enemies: रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयावर अमेरिका आणि युरोपीय देशांकडून सातत्याने टीका होत असते. मात्र, युरोप दौऱ्यावर असलेल्या भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी या टीकेला अत्यंत कडक शब्दांत चोख प्रत्युत्तर दिले. युरोपीय देशांच्या नैतिकतेवर थेट बोट ठेवत त्यांनी सुनावले की, हेच युरोपीय देश भारताच्या शत्रूंना शस्त्रे विकतात, ज्यांचा वापर थेट भारतावर हल्ले करण्यासाठी केला जातो. हा प्रकार आजचा नसून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे, असे सांगत त्यांनी पाश्चात्त्य देशांमधील विसंगती चव्हाट्यावर आणली.
फिनलंड येथे आयोजित ‘कुलतारंता टॉक्स’ (Kultaranta Talks) या विशेष कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वाल्टोनन आणि युएईच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री लाना नुसेबेह यांच्यासोबत ‘इमर्जिंग पॉवर्स अँड द न्यू जिओपॉलिटिकल कॉम्पिटिशन’ या विषयावरील पॅनेल चर्चेत भाग घेतला होता. यावेळी एका पत्रकाराने भारत 'रशियाबाबत अधिक सहानुभूती' दाखवत असून तिथून 'तेल खरेदी करण्यास जास्त उत्सुक' असल्याचा खोचक प्रश्न विचारला. या प्रश्नावर जयशंकर यांनी भारताच्या राष्ट्रीय हितांचे आणि ऊर्जा सुरक्षेचे समर्थन करत दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि पत्रकाराची बोलती बंद केली.
जयशंकर यांनी स्पष्ट केले की, भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाखाली न येता केवळ किंमत आणि उपलब्धता या बाजारपेठेच्या निकषांवरुन तेल खरेदी करतो. ज्यावेळी युरोपीय देश मध्य पूर्वेकडील देशांमधून (Middle East) मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत होते, जे भारताचे पारंपरिक पुरवठादार आहेत तेव्हा भारताला उपलब्धतेनुसार रशियाकडून तेल खरेदी करणे भाग पडले. पुढे बोलताना त्यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरुन युरोपला खडेबोल सुनावले. "कोणत्याही युरोपीय देशावर भारतीय शस्त्रांनी कधीही हल्ला झालेला नाही.
पण, दुर्दैवाने युरोपीय शस्त्रांबाबत मी भारतासाठी असे म्हणू शकत नाही. युरोपीय देशांनी विकलेली शस्त्रे भारतावर (India) झालेल्या हल्ल्यांमध्ये वापरली गेली आहेत, तरीही भारतीयांनी कधीही युरोपला धोक्यात आणणारे कोणतेही पाऊल उचलले नाही," असा रोखठोक युक्तिवाद त्यांनी केला.
यावेळी जयशंकर यांनी अमेरिकेच्या (America) बदलत्या धोरणांवर आणि त्यांच्या दुटप्पी भूमिकेवरही कडाडून टीका केली. 2022 मधील घडामोडींचा दाखला देत ते म्हणाले की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि महागाई रोखण्यासाठी खुद्द वॉशिंग्टननेच भारताला रशियन तेल खरेदी सुरु ठेवण्यास प्रोत्साहित केले होते. परंतु, नंतरच्या काळात परिस्थिती बदलताच अमेरिकेने रशियन तेलावर निर्बंध लादले आणि स्वतःच्या सोयीनुसार ते हटवले.
"हे सर्व धोरणांचे खेळ आहेत आणि आम्ही हे खेळ चांगल्या प्रकारे समजतो. त्यामुळे येथे कोणीही मानवी मूल्ये किंवा नैतिकतेचा आव आणू नये. जेव्हा स्वतःच्या फायद्याचे असते तेव्हा धोरणे लागू करायची आणि सोयीनुसार ती बदलून घ्यायची, हे जग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे," अशा शब्दांत जयशंकर यांनी जागतिक राजकारणातील पाश्चात्त्यांच्या दुटप्पीपणाचा पर्दाफाश केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.