Why did Mamata Banerjee lose in Bhawanipur Dainik Gomantak
देश

बंगालमध्ये सत्तापालट! 'मिनी इंडिया'ने का नाकारली दीदींची साथ? भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवाची 5 मोठी कारणं

West Bengal Assembly election: पश्चिम बंगालच्या राजकारणात २०२६ मध्ये एक असा भूकंप झाला आहे, ज्याची कल्पना कदाचित तृणमूल काँग्रेसने (TMC) कधीच केली नव्हती.

Sameer Amunekar

कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात २०२६ मध्ये एक असा भूकंप झाला आहे, ज्याची कल्पना कदाचित तृणमूल काँग्रेसने (TMC) कधीच केली नव्हती. ममता बॅनर्जी यांचा त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या 'भवानीपूर' मतदारसंघातून झालेला पराभव हा केवळ एका जागेचा पराभव नसून, बंगालमधील १५ वर्षांच्या टीएमसी राजवटीच्या अंतावर उमटलेला शिक्का मानला जात आहे. पाच वर्षांपूर्वी नंदीग्राममध्ये शुभेंदु अधिकारी यांनी ममतांना धूळ चारली होती आणि आता भवानीपूरमध्ये त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करत त्यांनी 'जायंट किलर' ही आपली ओळख अधिक गडद केली आहे.

सोमवारची मतमोजणी एखाद्या थरारपटासारखी होती. सकाळी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीत शुभेंदु यांनी आघाडी घेतली, पण दुपारपर्यंत ममतांनी जोरदार मुसंडी मारत १९,००० मतांची आघाडी घेतली होती. मात्र, संध्याकाळ होता होता चित्र पालटले. २० पैकी १८ फेऱ्या संपल्यानंतर शुभेंदु यांनी ११,००० मतांची निर्णायक आघाडी घेत विजयाचा झेंडा फडकवला. या ऐतिहासिक पराभवाची इनसाईड स्टोरी आणि त्यामागची पाच महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१. जनसांख्यिकी समीकरण आणि 'मिनी इंडिया'चा बदललेला कल

भवानीपूर हा मतदारसंघ 'मिनी इंडिया' म्हणून ओळखला जातो. येथे ४२% बंगाली हिंदू आणि ३४% बिगर-बंगाली (गुजराती, मारवाडी) हिंदू मतदार आहेत. आतापर्यंत हा भाग ममतांचा गड मानला जात होता. मात्र, यावेळी केवळ व्यापारी वर्गच नाही, तर बंगाली हिंदू मतदारांचा मोठा गटही शुभेंदु अधिकारी यांच्याकडे वळला. शुभेंदु यांनी मांडलेले हिंदुत्वाचे समीकरण आणि स्थानिक प्रश्नांनी ममतांच्या पारंपारिक मतपेढीला खिंडार पाडले.

२. आर.जी. कर प्रकरण: महिला सुरक्षेचा मुद्दा ठरला निर्णायक

ममता बॅनर्जी यांच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण 'आर.जी. कर मेडिकल कॉलेज'मधील बलात्कार आणि हत्या प्रकरण मानले जात आहे. या घटनेने संपूर्ण देशात संताप निर्माण केला होता. ममता बॅनर्जी यांची प्रतिमा आतापर्यंत महिलांची 'रक्षक' अशी होती, पण या प्रकरणाने ती प्रतिमा धुळीस मिळवली. महिला मतदारांमध्ये सुरक्षा आणि प्रशासकीय दिरंगाईबद्दल प्रचंड आक्रोश होता, ज्याचे रूपांतर मतपेटीतून विरोधात झाले.

३. मतदार यादीतील फेरबदल

निवडणुकीपूर्वी मतदार यादीत झालेल्या विशेष दुरुस्तीचा (SIR) मोठा फटका टीएमसीला बसला. भवानीपूरमधून सुमारे ४७,००० ते ५१,००० नावे हटवण्यात आली होती. टीएमसीचा दावा आहे की, ही नावे त्यांच्या हक्काच्या मतदारांची होती. याव्यतिरिक्त, १५ वर्षांच्या सत्तेनंतर निर्माण झालेली 'सत्ताविरोधी लाट' (Anti-Incumbency) स्पष्टपणे जाणवत होती. भ्रष्टाचार, सिंडिकेट राज आणि खंडणीखोरी यांसारख्या मुद्द्यांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते, ज्यामुळे सुशासनाचे दावे फोल ठरले.

४. 'लक्ष्मी भंडार'पेक्षा सुरक्षित भविष्याला प्राधान्य

ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचारात 'लक्ष्मी भंडार', 'कन्याश्री' आणि 'आरोग्य साथी' यांसारख्या लोककल्याणकारी योजनांवर भर दिला होता. मात्र, मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित महिलांना केवळ ५००-१००० रुपयांची मदत पुरेशी वाटली नाही. वाढती बेरोजगारी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्याचा विचार करून सुशिक्षित समाजाने टीएमसीला नाकारले. सरकारी योजना या केवळ निवडणुकीपुरत्या मलमपट्टीसारख्या आहेत, हे मतदारांना उमजले.

५. शुभेंदु अधिकारींचे 'मॅथेमॅटिकल' चक्रव्यूह

भाजपाने ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने लढली होती. खुद्द अमित शाह यांनी शुभेंदु यांच्या उमेदवारीसाठी ताकद लावली होती. शुभेंदु यांनी बूथ स्तरावर अचूक रणनीती आखली. त्यांनी बिगर-मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यात यश मिळवले. प्रचारादरम्यान जेव्हा ममतांना भाजपाच्या रॅलीमुळे भाषण सोडावे लागले, तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास उडाल्याचे दिसले होते. "शक्य असेल तर मला मत द्या," ही त्यांची हतबल विनंती जनतेने गांभीर्याने घेतली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Breaking धोनीने घेतला मोठा निर्णय! दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी 'यलो आर्मी'ला मोठा झटका; चाहत्यांमध्ये नाराजी

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा! विद्यार्थिनीवर अत्याचार करून खाजगी फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; शिक्षकाला 11 वर्षे कारावासाची शिक्षा

VIDEO: फटाका कारखान्यात मोठा स्फोट; 21 जणांचा मृत्यू, 61 जण गंभीर जखमी; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Rohit Sharma: 'मुंबईच्या राजा'चं दमदार कमबॅक! LSG विरूध्द रचला इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

Assembly Election 2026: सिनेपडद्यानंतर आता राजकारणातही 'विजय'! प्रस्थापितांना धूळ चारत मिळविला ऐतिहासिक विजय, ममतांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलले!

SCROLL FOR NEXT