Suryakumar Yadav Statement: आशिया कपच्या सुपर फोर सामन्यात रविवारी (21सप्टेंबर) भारतीय संघाने पाकिस्तानचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय संघासाठी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे सर्वात मोठे हिरो ठरले. त्यांच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताने पाकिस्तानने दिलेले 171 धावांचे मोठे आव्हान सहज पार केले. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानी पत्रकाराला पत्रकार परिषदेत दिलेले सडेतोड उत्तर सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
दरम्यान, या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने 171 धावांचा डोंगर उभारला होता. एकवेळ असे वाटत होते की, पाकिस्तानचा (Pakistan) संघ 180 ते 190 धावांपर्यंत मजल मारेल, पण भारतीय गोलंदाजांनी नंतरच्या षटकांमध्ये जबरदस्त कामगिरी करत धावांवर लगाम लावला. प्रत्युत्तरात, 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी धडाकेबाज सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. त्यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने हे लक्ष्य केवळ 4 गडी गमावून सहज गाठले.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी पत्रकार आणि त्यांच्या संघाला चांगलेच फटकारले. एका वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकाराने सूर्यकुमारला विचारले की, "सर, भारत आणि पाकिस्तानच्या संघांमधील दर्जातील (Standards) फरक खूप वाढला आहे का?" पत्रकाराच्या या प्रश्नावर सूर्यकुमार यादव हसला आणि त्याने तात्काळ उत्तर दिले.
सूर्यकुमार म्हणाला, "सर, माझी तुम्हाला विनंती आहे की, आतापासून आपण भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला ‘प्रतिस्पर्धा’ म्हणणे बंद केले पाहिजे." सूर्यकुमारच्या या उत्तराने पत्रकार काहीसा गोंधळून गेला. त्याने स्पष्टीकरण दिले की, तो 'प्रतिस्पर्धा' (Rivalry) नाही, तर 'दर्जा' (Standards) बद्दल बोलत आहे. त्यावर सूर्यकुमारने मिश्किलपणे उत्तर दिले.
त्यावर सूर्या म्हणाला, "आता कसली आलीय स्पर्धा? जर दोन संघांनी 15 सामने खेळले असतील आणि त्यात स्कोअर 8-7 असेल तर ती स्पर्धा असते. इथे तर स्कोअर 13-1 किंवा 12-3 असा आहे. इथे कोणतीही स्पर्धा नाहीये." असे बोलून तो हसू लागला. सूर्यकुमारच्या या उत्तराने संपूर्ण पत्रकार परिषदेत टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याने केवळ आपल्या विजयाचाच आनंद व्यक्त केला नाही, तर भारतीय संघाचा आत्मविश्वास आणि पाकिस्तानवरील वर्चस्वही दर्शवले.
कर्णधार म्हणून सूर्याने आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, “ज्या पद्धतीने संघ पुढे जात आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. यामुळे माझे काम खूप सोपे झाले आहे. पाकिस्तानने सुरुवातीच्या 10 षटकांत 91 धावा केल्या होत्या, पण त्यावेळीही आमच्या संघाने संयम गमावला नाही. ड्रिंक्सच्या वेळी मी खेळाडूंना सांगितले की खेळ आता सुरु झाला आहे.”
शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्या सलामीच्या जोडीवर बोलताना सूर्यकुमारने दोघांचेही तोंडभरुन कौतुक केले. तो म्हणाला, “शुभमन आणि अभिषेक हे आग आणि बर्फाचे मिश्रण आहेत. ते एकमेकांना पूरक ठरतात आणि त्यांना एकत्र फलंदाजी करताना पाहणे खूप मजेदार आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना कोणालातरी 10-12 षटके फलंदाजी करण्याची गरज होती आणि त्यांनी हे काम यशस्वीरित्या पार पाडले.”
एकंदरीत, भारतीय संघाने (Team India) पाकिस्तानला केवळ मैदानावरच हरवले नाही, तर पत्रकार परिषदेतही आपल्या कर्णधाराच्या आत्मविश्वासपूर्ण उत्तराने बाजी मारली. सूर्याच्या या सडेतोड उत्तरामुळे भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.