Rajnath Singh Warning to Pakistan 2026: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात पेटलेल्या युद्धाच्या ज्वाळांचे चटके आता दक्षिण आशियाई देशांनाही बसू लागले असतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. केरळमध्ये आयोजित 'सैनिक सन्मान संमेलना'च्या व्यासपीठावरुन बोलताना सिंह यांनी स्पष्ट केले की, जर पाकिस्तानने सध्याच्या आंतरराष्ट्रीय संकटाचा फायदा घेऊन भारतात कोणत्याही प्रकारचे दुःसाहस करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. आजचा भारत दहशतवादाच्या विरोधात 'झिरो टॉलरन्स'चे धोरण राबवत असून सीमेच्या या पार आणि त्या पार दोन्ही ठिकाणी कारवाई करण्यास तो सक्षम आहे.
राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आपल्या भाषणात 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत पाकिस्तानला त्यांच्या मर्यादांची जाणीव करुन दिली. ते म्हणाले की, "जगातील सर्वच देशांनी पाहिले आहे की, भारतीय सैनिकांनी अवघ्या 22 मिनिटांच्या आत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले होते." 2 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
सिंह यांनी ठामपणे सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर' अजून संपलेले नाही आणि जर पुन्हा अशी चूक झाली, तर भारताची प्रतिक्रिया पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक घातक आणि विनाशकारी असेल. उरीनंतरची सर्जिकल स्ट्राईक असो, पुलवामानंतरची एअर स्ट्राईक असो किंवा आता पहलगामच्या घटनेनंतर केलेले 'ऑपरेशन सिंदूर' असो, भारताने दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम सातत्याने केले.
संरक्षणमंत्र्यांचा हा इशारा अशा वेळी आला, जेव्हा पाकिस्तानी प्रसारमाध्यमे सातत्याने असा प्रचार करत आहेत की भारत 'फॉल्स फ्लॅग' ऑपरेशनची तयारी करत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन'ने असा दावा केला होता की, आंतरराष्ट्रीय लक्ष भरकटवण्यासाठी भारत (India) अशी पावले उचलू शकतो. मात्र, भारतीय संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तान स्वतःच्या अंतर्गत कमकुवतपणावरुन आणि अफगाणिस्तानसोबत सुरु असलेल्या 'उघड युद्धा'वरुन लक्ष हटवण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहे. पाकिस्तान सध्या सौदी अरब आणि इराण यांच्यातील संघर्षातही अडकलेला दिसत आहे.
सौदी अरब आणि पाकिस्तान यांच्यात 'नाटो'च्या धर्तीवर एक संरक्षण करार झाला आहे, ज्यानुसार सौदीवर हल्ला झाल्यास पाकिस्तानला मदत करणे अनिवार्य आहे. जर सौदी अरब इराणच्या विरोधात युद्धात उतरला, तर पाकिस्तानला त्यातून अंग काढून घेणे कठीण होईल. पाकिस्तानसमोर सर्वात मोठे आव्हान हे आहे की, त्यांना इराणसारख्या शिया-बहुल देशाविरुद्ध इस्रायल किंवा अमेरिकेच्या बाजूने उभे राहायचे नाही, कारण तसे केल्यास त्यांच्या स्वतःच्या देशातील 20% शिया लोकसंख्या भडकू शकते. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत राजनाथ सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्याने पाकिस्तानच्या अडचणीत अधिकच भर पडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.