Raghav Chadha Resigns: आम आदमी पार्टीमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. पक्षाचे सर्वात तरुण आणि प्रभावी चेहरा मानले जाणारे खासदार राघव चड्ढा यांनी पक्षाला रामराम ठोकला. केवळ राजीनामाच नाही, तर राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टीच्या दोन-तृतीयांश राज्यसभा खासदारांसह भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. "आम आदमी पार्टी आता भ्रष्ट लोकांच्या हातात आहे," असा खळबळजनक आरोप करत त्यांनी अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वावर तोफ डागली.
पत्रकार परिषदेत बोलताना राघव चड्ढा अत्यंत आक्रमक आणि तितकेच भावूक दिसले. ते म्हणाले की, "ज्या पक्षासाठी मी माझ्या रक्ताचे पाणी केले आणि तारुण्याची 15 वर्षे दिली, तो पक्ष आज आपल्या मूळ उद्दिष्टांपासून पूर्णपणे भरकटला आहे. आम्ही राजकारणात करिअर करण्यासाठी आलो नव्हतो, तर आमचे चांगले करिअर सोडून देशसेवेसाठी आलो होतो. मात्र, आजची 'आप' सामान्य लोकांपासून दूर गेली. माझ्यासमोर दोनच पर्याय होते, एक तर राजकारण सोडणे किंवा नवा मार्ग निवडणे. म्हणूनच, मी आता जनतेच्या हितासाठी भाजपमध्ये (BJP) सामील होत आहे."
राघव चड्ढा यांनी दावा केला की, त्यांच्यासोबत राज्यसभेतील दोन-तृतीयांश खासदार आहेत, ज्यामुळे पक्षफुटीच्या कायद्यानुसार त्यांचे सदस्यत्व धोक्यात येणार नाही. त्यांच्यासोबत भाजपमध्ये जाणाऱ्या खासदारांमध्ये संदीप पाठक, अशोक मित्तल, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, स्वाती मालीवाल, विक्रमजीत सिंह साहनी आणि राजेंद्र गुप्ता यांसारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या संकल्पावर विश्वास ठेवून आता देशहितासाठी काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या बंडाने आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) राज्यसभेतील अस्तित्व जवळपास संपवले. पंजाब आणि दिल्लीतून राज्यसभेवर गेलेल्या या 7 खासदारांच्या एक्झिटमुळे अरविंद केजरीवालांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला. संसदेत भाजपची ताकत वाढली असून आम आदमी पार्टीच्या 'भ्रष्टाचारविरोधी' प्रतिमेला या बंडाने मोठा तडा गेला.