नवी दिल्ली: सर्व बायकांना समान वागणूक दिल्यास मुस्लिम व्यक्ती अनेक पत्नी ठेवू शकतो, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कुराणमध्ये वैध कारणास्तव बहुपत्नीत्वास मान्यता देण्यात आली आहे. पण, लोकांनी या स्वार्थासाठी वापर केला, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मुरादाबाद कोर्टात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र फेटाळताना न्यायमूर्ती अरुण कुमार सिंग देसवाल यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. फुरकाण या मुस्लिम व्यक्तीविरोधात २०२० याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. फुरकाणला अगोदरच एक पत्नी असताना त्याने दुसऱ्या एका महिलेशी विवाह केला.
अगोदरच एक पत्नी असल्याची माहिती न दिल्याने या महिलेने कोर्टात धाव घेतली होती. याशिवाय बलात्काराचा आरोप देखील फुरकाणवर ठेवण्यात आला होता. मुरादाबाद पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर फुरकाणसह इतर दोघांना समन्स बजावण्यात आला होता.
तक्रारदार महिलेचे फुरकानसोबत नातेसंबंध होते त्यानंतरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, असा युक्तिवाद फुरकानच्या वकिलांनी मुरादाबाद न्यायालयात केला. अगोदरच लग्न केलेल्या व्यक्तीने दुसरा विवाह केल्यास भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४९४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन ते लग्न अवैध ठरवावे, असाही युक्तिवाद करण्यात आला.
न्यायमूर्ती देसवाल यांनी समान नागरी कायद्याचा दाखला देत मुस्लिम व्यक्तीला चार लग्न करण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांने कोणताही गुन्हा केला नसल्याचे नमूद केले. अनेक पत्नी ठेवण्यामागे कुराणमध्ये ऐतिहासिक कारण सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, लग्न आणि तलाक याबाबतचा निर्णय शरियत कायदा १९३७ अंतर्गत घेतले जावेत, असेही न्यायमूर्ती देसवाल म्हणाले.
दोन्ही पत्नी मुस्लिम असल्याने फुरकानचे दोन्ही विवाह वैध असल्याचे निरीक्षण अलाहबाद उच्च न्यायालयाने १८ पानी निवाड्यात नोंदवले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २६ मे रोजी ठेवण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.