

कला अकादमी आयोजित करत असलेल्या 50 व्या कोकणी राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने चर्चेला (किंवा धुरळा उडवत असलेले) येणारे काही विषय; ‘अॅबसर्ड’ वाटावे इतके कमालीचे तर्कदुष्ट ठरत चालले आहेत. नाट्यलेखनासाठी युगांक नायक यांना दुसरे बक्षीस देण्यात आल्यानंतर ते मांडत असलेले मुद्दे ही या अॅबसर्डीटीचीच उदाहरणे तर आहेतच पण दुसरे बक्षीस न स्वीकारता (दिले गेल्यास) अवार्ड मात्र स्वीकारायला ते तयार आहेत ही या अॅब्झर्डिटी मालिकेची परिसीमा आहे.
‘पहिले बक्षीस न देता दुसरे बक्षीस देणे’ या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे, कला अकादमी आता नाट्य लेखनासाठी पहिली/दुसरी बक्षिसे न देता‘अवॉर्ड’ (पुरस्कार) द्यायचा विचार करत आहे हा या अॅब्जर्डिटीचा विनोदी आयाम आहे. अवॉर्ड मिळाल्यामुळे नेमके काय होणार आहे? पहिल्या बक्षिसाला लायक न ठरलेल्या नाट्यसंहितेचा दर्जा त्यातून वाढणार आहे काय? खरे तर चर्चा नाट्यसंहितेवर व्हायला हवी होती.
एरवीच ‘अवॉर्ड’ किंवा ‘पुरस्कार’ काँग्रेस गवतासारखे सर्वत्र भारंभार वाढून आलेले दिसतात. काही पुरस्कार तर चक्क विकत घेतले जाताना दिसतात. त्यात असा आणखी एक अवॉर्ड निर्माण करणे, तो मिळणे किंवा कुणीतरी तो मान्य करून स्वीकारणे हे फार मजेशीर आहे. कला अकादमीच्या राज्य नाट्य स्पर्धेत असे काही आतापर्यंत घडले नव्हते परंतु आता ते घडवले जात आहे.
खरे तर कला अकादमीच्या इतिहासात, गेल्या चार-पाच वर्षातच अनेक ॲबसर्ड अघटीते घडली आहेत, त्यात ही आणखी एक पडलेली भर आहे. इतकेच. तसे पाहू जाता या साऱ्या प्रकरणात खरी सॉफ्ट टार्गेट कला अकादमी बनलेली दिसते. कला अकादमीचे नवीन अध्यक्ष बाबू कवळेकर यांच्या म्हणण्यानुसार नाट्यस्पर्धेचा नियमांमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे आहे. त्यांचे बरोबरच आहे, एखादी स्पर्धा ५० वर्षे एकाच ठोकताळ्याने चालणे हे काही प्रगतीचे लक्षण नाही. अध्यक्षांचे आणखी एक मत गंभीरतेने लक्षात घेणे खूप गरजेचे आहे-ते म्हणतात, ‘चांगल्या नाट्य लेखकांची आज वानवा आहे. चांगले लेखक आज कमी कमी होत चालले आहेत.’
नाट्य चळवळीसाठी ओरिजिनल नाट्यसंहिता ही महत्त्वाची असते. हे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. उदाहरणार्थ, पुंडलिक नायकांनी लिहिलेल्या सशक्त नाट्यसंहितानी कोकणी नाट्यक्षेत्राला ऊंची दिली व आजचा काळ दाखवला. त्यांच्या पावलांवर अनेक नाटककार आजही चालताना दिसतात.
कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेचा निकाल नाट्य चळवळीसाठी एक प्रमाण ठरत असतो. त्यामुळे त्याला एक अकॅडमीक महत्व असते. हे देखील बरोबर आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा. नाट्यस्पर्धांमुळे गोमंतकीय नाट्यक्षेत्राला फायदा झाला आहे तसेच त्याचे खूप नुकसानही झाले आहे. सादरीकरणाच्या शैलीचा विचार केला तर आपली नाटके नाट्यस्पर्धांमुळे खूप एकसाची बनत गेली आहेत. एनकेन प्रकारे बक्षीसे मिळवणे हाच स्पर्धेचा निकष बनला आहे. स्पर्धेतील नाटकांमध्ये जे काही तथाकथित प्रयोग (आशयाच्या दृष्टीने तर झालेच नाही) झाले ते प्रोसिनियमच्या चौकटीत, तांत्रिक स्तरावर झाले.
स्वतंत्र नाट्यसंहितेला प्रथम पारितोषिक न देणे हे प्रमाण ठरू शकत नाही. ते सर्वात अधिक अपमानजनक आहे. हा पायंडा नाट्य चळवळीसाठी मारक ठरेल. हे कला अकादमीचे नवे तंत्र आहे काय? मला पहिले बक्षीस न देऊन त्यांना एक उदाहरण सेट करायचे आहे. युगांक यांचे हे म्हणणे मात्र अतिरंजित आहे. जर त्यांना पहिले बक्षीस न देऊन त्यांना एक उदाहरण जर सेट करायचे असते तर यापूर्वीच्या नाट्यस्पर्धांमध्ये लेखकांना पहिलेच काय पण दुसरे बक्षीस देखील न देता केवळ प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. त्याचे काय? पहिले बक्षीस न देणे हा पहिल्यांदाच घडते आहे काय? मागं हा ‘पायंडा’ कसा काय ठरतो?
परीक्षकांपैकी साहित्यिक कोण होते? त्यांना साहित्याची काय जाण होती? ज्यावेळी नाट्य दिग्दर्शक एखादी संहिता निवडतो तेव्हा आपली साहित्याची जाणच तो पणाला लावत असतो. त्याने स्वत: कुठलीही साहित्य निर्मिती केलेली नसली तरी साहित्याचे भान त्याला असते म्हणूनच सादरीकरणासाठी तो (किंवा निर्माता) विशिष्ट नाट्यसंहिता निवडतो. तीच गोष्ट आपल्याला अभिनेत्यासंबंधीही म्हणता येईल. या स्पर्धेतील परीक्षक अनुभवी नाट्यकलाकार होते त्यामुळे युगांक नायक यांचा मुद्दा अस्थानी ठरतो. आणि नाट्यलेखन ही बाब शुद्ध साहित्यापेक्षा नाटकाच्या क्राफ्टशी अधिक संबंधित आहे. हे क्राफ्ट समजून-उमजून लिहिणारे नाट्यलेखक गोव्यात कमीच आहेत. त्यामानाने दिग्दर्शक हे क्राफ्ट नक्कीच अधिक चांगल्या प्रकारे समजतात. नाट्यलेखकांनाही साहित्याची जाण असतेच असे नाही. अशी उदाहरणे खूप आहेत.
निकालाबाबतीत आम्ही कुठलाही पत्रव्यवहार करणार नाही हा नियम कला अकादमीची दमदाटी दर्शवतो. अर्थातच दर्शवतो.बाळा राया मापारी यासारख्या बहुजन समाजाच्या नायकावर जेव्हा बोलले जाते तेव्हा बुद्धिवादी लोक अस्वस्थ होतात. हा नायक वर्ग-संघर्षाचा देखील भाग होता. शेतकरी-कामगारांचा (Worker) प्रश्न त्याने व्यापक राष्ट्रवादाकडे जोडला होता. बुद्धिवादी वर्गाने त्याच्यावरील आपला राग अशा प्रकारे नाट्य स्पर्धेच्या निकालातून दाखवून दिला.
मग याच विषयावर काही वर्षांपूर्वी लिहून सादर केल्या गेलेल्या प्रकाश वजरीकर यांच्या ‘होमखण’ या नाटकाला स्पर्धेत लेखनाचे प्रथम बक्षीस कसे मिळू शकले? त्यावेळी त्यांच्या प्रयोगालाही बक्षीस मिळाले होते. युगांक यांना ही गोष्ट ठाऊक असणारच. यंदा देखील ‘होमखण’ हे नाटक स्पर्धेत होते. (आणि विशेष बाब म्हणजे प्रकाश वजरीकर यांच्या ‘होमखण’ नाटकाच्या पुस्तकाला युगांक नायक यांचीच प्रस्तावना आहे. अनेकांना वाटते तसे बाळा राया मापारी यांच्यावर लिहिले गेलेले युगांक यांचे ‘देश-राग’ हे पहिले आणि एकमेव नाटक नाही.) मी परीक्षकांच्या सामूहिक निर्णयाचा आदर करतो. हे छान आहे.या सगळ्या अशा प्रकारच्या घडामोडीत नाट्य लेखक हा सॉफ्ट टार्गेट बनत असतो. इतर विभागात असे घडले असते तर मोठा गदारोळ झाला असता.
नाट्यस्पर्धेतील इतर विभागात देखील यापूर्वी पहीली-दुसरी बक्षीसे गेलेली नाहीत. वैयक्तिक अभिनयासाठी पहिले किंवा दिग्दर्शनासाठी पारितोषिक दिले गेले नाही असे खूपदा झाले आहे. त्यामुळे ‘गदारोळ झाला असता’ आणि ‘फक्त लेखकालाच सॉफ्ट टार्गेट बनवले जाते’ या युगांक यांच्या दाव्याला काहीच अर्थ नाही. (मात्र ‘पारितोषिक दिले गेले नाही’ असे यापूर्वी कधी घडते आहे का हे विचारले जाते तेव्हा युगांक चतुराईने ‘आपल्याला ठाऊक नाही’ असे उत्तर देतात. मात्र असे पूर्वी घडले आहे याची माहिती त्यांना नसणे हे असंभव आहे.) हे राजकारण (Politics) आहे. बाळा राया मापारीची मुख्य व्यक्तिरेखा माजी मंत्री गोविंद गावडे यांनी निभावली होती. त्यामुळे लोकांनीच ठरवावे की नेमके काय झाले असेल. युगांकच्या या उत्तरातच खरे राजकारण दडलेले आहे, असे म्हणता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.