Goa Loksabha Election: 'भारतीय संविधान गोव्यावर जबरदस्ती लादलं', काँग्रेस उमेदवाराच्या वक्तव्याने वांदग

Capt Viriato Fernandes: विरियातो दुहेरी नागरिकत्वाचे समर्थक असून, 2019 साली राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ त्यांनी या सभेत दिला.
Capt Viriato Fernandes And CM Pramod Sawant
Capt Viriato Fernandes And CM Pramod SawantDainik Gomantak

Capt Viriato Fernandes Goa

भारतीय संविधान गोव्यावर जबदस्ती लादलं असं वक्तव्य दक्षिण गोव्याचे काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केले. या वक्तव्यावरुन गोव्यात वादंग निर्माण झाला असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरियातो यांच्यासह काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे.

काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी 14 वर्षे विलंब केला. आता त्यांचा उमेदवार भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस करतोय? अशा शब्दात सावंत यांनी टीका केली.

राज्यातील लोकसभा मतदानासाठी अवघे पंधरा दिवस उरले असताना, सर्वत्र सभांचा धडाका सुरु आहे. विरियातो दक्षिणेतील एका कोपरा सभेत बोलत असताना गोव्यावर संविधान लादल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले.

विरियातो दुहेरी नागरिकत्वाचे समर्थक असून, 2019 साली राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ त्यांनी या सभेत दिला.

काय म्हणाले वरियातो?

2019 लोकसभा निवडणुकीच्यावेळी तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष गोव्यात आले असता गिरिश चोडणकर यांनी माझी त्यांच्याशी पणजीतील हॉटेलमध्ये भेट घडवून आणली. यावेळी गांधीच्याकडे आम्ही दुहेरी नागरिकत्वासह 12 मागण्या मांडल्या. दरम्यान, त्यांनी दुहेरी नागरिकत्वाची मागणी संविधानिक आहे का? असा प्रश्न केला. त्याला नाही असे उत्तर आम्ही दिले.

पण, 1961 साली गोवा स्वतंत्र झाला त्यावेळी गोव्यावर जबरदस्ती संविधान लादण्यात आल्याचे मी त्यांना समजावून सांगितले, असे विरियातो सभेत म्हणाले.

Capt Viriato Fernandes And CM Pramod Sawant
Panaji News : उत्तर गोव्यात गेल्‍या १० वर्षांत १२०० प्रकल्‍प केले मंजूर : श्रीपाद नाईक

26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान स्विकारले पण, गोवा 1961 रोजी पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला, आमच्यावर संविधान लादण्यात आले, त्यावेळी संविधानात गोव्याचा समावेश नव्हता, असेही विरियातो म्हणाले.

विरियातो यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचा देखील संदर्भ यावेळी दिला. गोमन्तकीय त्यांच्या भविष्याचा निर्णय घेतील असे नेहरु म्हणाले होते मात्र आमच्या भविष्याचा निर्णय दुसऱ्याच कोणीतरी घेतला, असे विरियातो म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या ओएसडीला त्यांनी विरियातो यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे सांगितले. आणि संविधान अंगीकारले त्यावेळी गोव्यासाठी त्यात तरदूत नव्हती असेही, गांधी म्हणाल्याचा उल्लेख विरियातो यांनी केला.

मुख्यमंत्री सावंत यांची टीका

'भारतीय संविधान गोव्यावर जबरदस्तीने लादण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या दक्षिण गोवा उमेदवाराच्या वक्तव्याने मी चकीत झालोय. गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर स्वातंत्र्यसैनिकांचा दृढ विश्वास होता.'

'काँग्रेसने गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी 14 वर्षे विलंब केला. आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस केलंय? काँग्रेसने भारत तोडोचे राजकारण ताबडतोब थांबवावे. काँग्रेस आपल्या लोकशाहीला धोका आहे,' असे मत मुख्यमंत्री सावंत यांनी सोशल मिडिया एक्सवर व्यक्त केले.

Capt Viriato Fernandes And CM Pramod Sawant
loksabha Election : मयेत सर्व पक्षांकडून प्रचाराचा धडाका; भाजपसह आरजी, काँग्रेसनेही घरोघरी वाटली पत्रके

प्रिय मुख्यमंत्री, राजकीय फायदा घेण्यासाठी आणि द्वेष पसरविण्यासाठी माझ्या भाषणातील ठराविक शब्दांचा विपर्यास करण्याचा प्रयत्न करु नका. मी काय बोललो यावर खुली चर्चा करण्यास मी तयार आहे. तसेच, भाजप सरकाराच्या नेतृत्वाखाली गोव्याची ओळख नष्ट करण्याचा सुरु असलेला प्रयत्न, वाढलेली बेरोजगारी, महागाई, गुन्हे आणि भ्रष्टाचार यावरही चर्चा करण्यास तयार आहे, असे उत्तर विरियातो यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेसचे दक्षिण गोवा विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपने निषेध केला असून, त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. विरियातो यांनी संविधानाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांची उमेदवारी बाद करण्याची मागणी भाजपने केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com