

गोवा हा दक्षिण कोकणाचा एक भाग जो शिलाहार राज्यकर्त्यांच्या ताब्यात असताना कदाचित शास्तादेव कदंबने कल्याणी चालुक्यांना केलेल्या मदतीमुळेच त्यांना हंगल कदंबांप्रमाणे गोव्याचे सिंहासन मिळाले. कल्याणी चालुक्यांकडून हा वारसा शास्तादेव कदंबना (इ.स ९६०) चालुक्यांचा सामंत म्हणून मिळाला व चंद्रपूर किंवा आताचे दक्षिण गोव्याचे चांदोर ही गोव्याची राजधानी बनविण्यात आली.
९८० मध्ये त्याचा मुलगा गुहालदेव कदंब (९८०-१००५) उत्तराधिकारी म्हणून सिंहासनावर विराजमान झाला. दुसऱ्या शास्तादेवाच्या (१००५-१०५०) राजवटीत गोव्याने शिलाहारांच्या दक्षिण शाखेवर विजय मिळवून प्रादेशिक विस्तार केला. त्याचा उत्तराधिकारी जयकेशी कदंब-पहिला (१०५०-१०८०) याच्या काळात गोपकपट्टणमला (किंवा आताचे उत्तर गोव्याचे शहर वेल्हा-गोवा) राजधानी बनविण्यात आले.
कल्याणी चालुक्यांचा सामंत म्हणून जयकेशी कदंबने सोमेश्वर चालुक्याच्या सैन्याला चालुक्य प्रदेशातून चोलांना हाकलून लावण्यास मदत केली होती. राजा जयकेशी कदंब पहिला यांची राजकन्या मायनल्ला किंवा मीनलदेवी कदंबबद्दल विविध दंतकथा व आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात. राजा जयकेशी कदंबच्या राजवटीच्या सुमारास राजा करणदेव सोलंकी (१०६४-१०९२) हा गुजरातच्या चालुक्य(सोलंकी) घराण्यातील एक राजा.
कर्णाचा जन्म चालुक्यांचा राजा भीम पहिला आणि राणी उदयमती यांच्या पोटी झाला. १२व्या शतकातील जैन इतिहासकार हेमचंद्र यांच्या मते, राजा भीमाला तीन पुत्र होते, मूलराजा, क्षेमराजा आणि कर्ण. राजा भीमाने कर्णाला सिंहासनावर बसवून संन्यास घेतला व कर्ण राजाने आपली राजधानी अनाहिलपट्टक (आधुनिक पाटण-गुजरात) इथून सध्याच्या गुजरात आणि आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य केले.
राजा कर्णाचा विवाह राजा जयकेशी कदंब पहिला यांची राजकन्या मायनल्ला किंवा मीनलदेवी कदंब हिच्याशी झाला. हे लग्न कसे झाले याचे परस्परविरोधी वर्णन विविध आख्यायिकांत येते. कवी हेमचंद्राचा बाराव्या शतकातील ग्रंथ ‘द्वैश्रया’नुसार मायनल्ला किंवा मीनलदेवी ही अत्यंत सुंदर राजकन्या होती. एकदा तिने एका चित्रकाराने काढलेले राजा कर्णाचे चित्र पाहिले. राजा कर्णाच्या रूपावर मोहित होऊन तिने इतर सर्व इच्छुकांना नाकारले आणि त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्धार केला.
वडील जयकेशी कदंब यांच्या संमतीने तिने स्वत:चे चित्र घेऊन एका कलाकाराला कर्णाच्या दरबारात पाठवले. कदंब राजाने कर्णासाठी हत्तीसह भेटवस्तूही पाठवल्या. कर्ण जेव्हा त्या गुणी हत्तीला पाहण्यासाठी बागेत गेला, तेव्हा त्याला राजकुमारी त्याची वाट पाहत बसलेली दिसली. त्याने काही प्रश्न विचारून तिची ओळख पडताळून पाहिली आणि मग तिच्याशी लग्न केले. चौदाव्या शतकातील कवी मेरुतुंगाच्या ‘प्रबंध चिंतामणी’ नुसार मायनल्लादेवी या राजकन्येला एके दिवशी तिचे गतायुष्य आठवले.
त्या पूर्वजन्मात श्रद्धाळू शैव होत्या, त्यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाण्याचा बेत आखला होता. मात्र, गुजरातच्या राज्यकर्त्यांनी लादलेला तीर्थ कर भरता न आल्याने तिला बहुलोडा येथे सोमनाथ मंदिराच्या अगोदर थांबविण्यात आले.
जेव्हा मायनल्लाला किंवा मीनलदेवी हिला तिच्या मागील जन्मातील हा प्रसंग आठवला, तेव्हा तिने गुजरातच्या राजाशी लग्न करण्याचा आणि हा अन्यायकारक कर माफ करण्याचा निर्णय घेतला.
तिच्या आग्रहाखातर जयकेशी कदंब पहिला यांनी कर्णाकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला, पण कर्णाने त्या राजकन्येला नाकारले. त्यानंतर मायनल्ला आपल्या आठ महिला साथीदारांसह कर्णाच्या दरबारात आली आणि तिने राजाने लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली.
कर्णाने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला, परंतु एका राजकन्येची आत्महत्या वा मृत्यूचा विचार मान्य नसलेली कर्णाची आई उदयमतीने आपण मुलींसह मरणार असल्याचे जाहीर केले. परिणामी कर्णाला माघार घ्यावी लागली.
त्याने मायनल्लाशी लग्न केले, पण तिच्याकडे दुर्लक्ष करत राहिला. अखेर एका मंत्र्याच्या मदतीने त्यांना जिंकता आले. पुढे मायनल्लाला किंवा मीनलदेवीनी राजा कर्णाच्या मृत्युनंतर आपल्या मुलाला राजा जयसिंह सिद्धराजा याला सोमनाथ मंदिरात जाण्याचा लादलेला तीर्थकर माफ करण्यासाठी राजी केले. याला आणखी एका इतिहासकारानेही दुजोरा दिला आहे. काश्मिरी कवी बिल्हाना यांनीही या घटनेचा उल्लेख केलेला दिसतो.
कवी बिल्हाना यांनी कर्णाच्या दरबारात त्यांनी काही काळ मुक्काम केला आणि कर्णाला नायक म्हणून सादर करणाऱ्या ‘कर्ण-सुंदरी’ या काव्यनाटकाची रचना केली. या काव्यनाट्यानुसार कर्णाने राजकन्येचे (ज्याला कर्णसुंदरी किंवा कर्णाची सुंदर स्त्री म्हटले जाते) स्वप्न पाहिले आणि तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ईर्ष्याग्रस्त असलेल्या त्याच्या राणीने कर्णसुंदरीच्या वेशभूषेत लपलेल्या मुलाशी त्याचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्णाच्या चतुर मंत्र्याने तिची योजना हाणून पाडली.
बिल्हान हा कर्णाचा समकालीन असला तरी त्याचे वर्णन हे नाटक अथवा काव्य असावे. बिल्हान कदाचित १०७२ ते १०७८च्या दरम्यान कर्णाच्या दरबारात होता. हेमचंद्र आणि बिल्हान या दोघांनीही चालुक्यांच्या संरक्षणाखाली लेखन केले, गुजरातमध्ये विरमगाम आणि ढोलका येथे तलाव बांधण्याचे श्रेय मायनल्लादेवी यांना जाते. साबरकांठा जिल्ह्यातील बालेज गावातील ‘मीनल बावडी’ तिच्या कार्यकाळातील असून ती १०९५मध्ये बांधण्यात आली.
राजकोट जिल्ह्यातील नडियादमधील एक बावडी आणि वीरपूरमधील ‘मीनलदेवी वाव’देखील तिच्याशी संबंधित आहे व चालुक्यांच्या स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.गोव्यातील गोपकपट्टणमचा राजा जयकेशी कदंब पहिला यांची राजकन्या मायनल्ला किंवा मीनल देवींच्या गुजरातमध्ये राजकोट व आजूबाजूच्या जिल्ह्यात जलराजकुमारी म्हणून विविध दंतकथा व आख्यायिका प्रसिद्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.