लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत 'मॅच फिक्सिंग'चा आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. आता त्यांच्या या आरोपावर राज्याचे मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्लाबोल केला. राहुल यांच्याकडून करण्यात आलेले आरोप 'हास्यास्पद' असून हा 'जनतेचा अपमान' असल्याचे फडणवीस म्हणाले. ज्या नेत्यांना जनतेने नाकारले ते आता जनादेश नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, फडणवीस यांनी राहुल यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. राहुल यांच्याकडून करण्यात आलेले आरोप केवळ लोकशाहीसाठी धोकादायक नाहीत तर महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासावर आणि निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मी किंवा महाराष्ट्रातील जनता अशा आरोप करणाऱ्या लोकांना अजिबात माफ करणार नाही, असे पुढे बोलताना फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले की, "राहुल गांधींच्या लिखाणाचा उद्देश फक्त गोंधळ पसरवणे आहे. ते कोणालाही पटवून देऊ शकत नाहीत.'' एवढ्यावरच न थांबता फडणवीस यांनी काँग्रेसचे सरकार असताना निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्यांमधील हस्तक्षेपावरही प्रश्न उपस्थित केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेल्या "बनावट मतदारांच्या" आरोपावर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, 2024 मध्ये 26 लाखांहून अधिक तरुण मतदार सामील झाले असून ही वाढ मागील ट्रेंडशी सुसंगत आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचे पत्र काळजीपूर्वक वाचावे. मतदारांच्या संख्येत कोणतीही असामान्य वाढ झालेली नाही.
राहुल गांधी यांनी शेवटच्या क्षणी वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा एनडीएला झाल्याचा दावा केला. यावर फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, "हे पूर्णपणे अपूर्ण असत्य असून हास्यास्पद आरोप आहे. अनेक जागांवर विरोधी उमेदवारांना वाढलेल्या मतदानाचा फायदा झाला.''
फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा पुरावे लपवल्याचा आरोपही फेटाळला. सरकारने निवडणूक घोटाळ्याचे पुरावे लपवले, असे राहुल म्हणाले होते. त्यावर फडणवीस म्हणाले की, 'राहुल यांचा हाही आरोप निराधार आणि जनतेच्या विश्वासाला धक्का देणारा आहे.'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात महायुतीला निवडणुकीत मोठा जनादेश मिळाला. तर दुसरीकडे मात्र भारत जोडो यात्रेनंतरही लोकांनी राहुल गांधींना महाराष्ट्रातील जनतेने नाकारले.' शिंदे यांनी राहुल यांच्याकडून आरक्षण आणि संविधानाशी संबंधित केलेले दावे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले. दुसरीकडे, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही एक्स (पूर्वी ट्विटर) वर पाच मुद्द्यांची पोस्ट शेअर केली. नड्डा म्हणाले की, राहुल गांधी खोटे बोलतात. प्रत्येक निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी आत्मपरीक्षण करण्याऐवजी बिनबुडाचे आरोप करुन संवैधानिक संस्थांची बदनामी करतात.'
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगानेही कडक टिप्पणी केली. आयोगाने म्हटले की, 'राहुल यांचे आरोप अप्रमाणित असून कायद्याच्या राज्याचा अपमान करतात. भारतीय निवडणुका कायद्यानुसार पूर्ण पारदर्शकतेने घेतल्या जातात. मात्र काही नेते खोटे आरोप करुन निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करतात.'
राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल यांचे आरोप केवळ फेटाळलेच नाहीत तर त्यांना 'लोकशाहीसाठी धोकादायक' असल्याचेही म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.