अहमदाबाद: टी-२० विश्वचषक चालू झाल्यावर पटापट सामने पार पडले आणि साखळी फेरीतला भारताचा शेवटचा सामना जवळ आला. भारत वि. नेदरलँड्स सामना म्हटल्यावर खूप उत्साह वाटत नाही. भारतीय संघाचा सध्याचा विजयी धडाका बघितला, तर बुधवारचा सामना कठीण जाईल, असे वाटत नाही.
तरीही भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत समोरच्या संघाला ना कमी लेखेल, ना तयारीत किंवा एकाग्रतेत बाधा आणेल. थोडक्यात शेवटचा सामना जिंकून सुपर-८ फेरीत ताठ मानेने जायची औपचारिकता भारतीय संघ गांभीर्याने पूर्ण करणार आहे.
चालू विश्वचषक स्पर्धेत अनुभवाने कमी असलेल्या संघांनीही चांगली चमक दाखवली. त्यातील एक संघ आहे नेदरलँड्सचा. पहिल्याच सामन्यात त्यांनी पाकिस्तान संघाला फेस आणला होता. एक झेल सुटला नाही, तर पाकिस्तानची गत ऑस्ट्रेलियासारखी झाली असती.
नेदरलँड्स असा आहे, ज्यांनी भूतकाळात ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या संघांना हरवून खळबळ माजवली होती. चांगला खेळ ते करतात फक्त त्यात सातत्य दिसत नाही. कर्णधार स्कॉट एडवर्डस संघाचा आधारस्तंभ आहे.
फलंदाजीत अजून सांगायचे झाले, तर लीड्स आणि लीविट्स चमक दाखवू शकतात. गोलंदाजीत अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज वॅन डर मर्व्ह, विबक आणि क्लेन चांगला मारा करायची क्षमता राखतात.
भारतीय संघाला फलंदाजीत सुधारणा घडवून सुपर-८ फेरीत जायचे आहे. म्हणजेच चांगली सुरुवात गरजेची आहे. झालेल्या तीनही सामन्यात सलामीला धक्का लागला आहे. अभिषेक शर्मा दोन सामन्यांत फारच लगेच बाद झाला आहे.
मोठ्या संघांना तोंड देण्याअगोदर अभिषेकला चांगली फलंदाजी करून लयीत यायचे आहे. गोलंदाजीत फार काही बदल होणार नाहीत. सामन्याकरिता तयार केलेली खेळपट्टी बघून कुलदीपची फिरकी राखायची का अर्शदीपला परत संघात आणायचे, हे ठरेल.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील भारताचा पहिला सामना नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहे. सामन्यात खूप मोठा रस नसला तरी गर्दी होण्याची शक्यता दाट आहे, कारण सुपर-८ किंवा अंतिम सामन्याची तिकिटे खूप महाग आहेत.
याच कारणाने बुधवारच्या सामन्याला खचाखच नव्हे तरी ७० हजार प्रेक्षक येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. आमचा स्पर्धेतील शेवटचा सामना भव्य नरेंद्र मोदी मैदानावर साधारणपणे ७० हजार प्रेक्षकांसमोर आणि तगड्या भारतीय संघासमोर होणार आहे.
आमच्यासाठी हा सामना नसून मोठा प्रसंग आहे. मोठा अनुभव आहे. एकदा मागच्या विश्वचषक सामन्यात आम्ही भारतासमोर खेळलो होतो, पण त्या संघातील काही नावे आता दिसत नाहीत. सध्याच्या भारतीय संघाची ताकद आम्ही जाणून आहोत. म्हणून लढत देण्याची पूर्ण तयारी आम्ही करत आहोत, असे तो म्हणाला.
गेल्या काही वर्षांत पात्रता फेरीचे अडथळे पार करत नेदरलँड्स संघाने थोडी प्रगती करून दाखवली आहे. आता कामगिरीत थोडे सातत्य आणायची गरज आहे. मोठ्या संघांसमोर खेळूनच आम्हाला आमच्या क्षमतेची खरी ओळख पटते. मला वाटते आम्हाला चांगला खेळ केल्यावर त्या दिवशी फिनिशिंग टच देता यायला हवा.
मोठे संघ आणि आमच्यात फावत आहे, पण विश्वचषक स्पर्धेत खेळूनच आमच्यात सुधारणा होत असते. आम्ही चांगला खेळ केला की मायदेशात अजून काही लहान मुले बॅट बॉल उचलून खेळायला लागत असतात, हे लक्षात घ्यायला हवे, असे नेदरलँड्सचा कर्णधार एजवर्डसने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.