टी-२० विश्वचषकाच्या रणधुमाळीत भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे अचानक मायदेशी परतलेला भारताचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंह पुन्हा एकदा टीम इंडियाच्या ताफ्यात सामील होणार आहे. झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी रिंकू संघात परतल्याने भारतीय फलंदाजीची ताकद द्विगुणित झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रिंकू सिंहच्या अनुपस्थितीमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र, रिंकूने हा निर्णय केवळ आपल्या कुटुंबासाठी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. रिंकूचे वडील खानचंद सिंह हे कर्करोगाशी झुंज देत असून त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या वडिलांच्या कठीण काळात त्यांच्यासोबत राहण्यासाठी रिंकूने तातडीने घर गाठले होते. वडिलांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते, ज्यामुळे रिंकूने पुन्हा एकदा देशसेवेसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी पत्रकार परिषदेत रिंकूच्या पुनरागमनाची अधिकृत माहिती दिली. कोटक यांनी स्पष्ट केले की, "रिंकू सिंह बुधवारी संध्याकाळपर्यंत हॉटेलमध्ये संघासोबत रिपोर्ट करेल. २६ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो निवडीसाठी उपलब्ध असेल." या माहितीमुळे रिंकू विश्वचषकातून बाहेर पडल्याच्या सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
भारतीय संघासाठी झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत रिंकू सिंहचे संघात असणे ही एक मोठी जमेची बाजू आहे. रिंकू केवळ एक स्फोटक फलंदाज नाही, तर तो डावाचा शेवट 'फिनिशर' म्हणून अत्यंत चोखपणे करतो. त्याच्याकडे असलेल्या फटकेबाजीच्या कौशल्यामुळे शेवटच्या षटकांत धावगती वाढवणे भारताला सोपे जाते. फलंदाजीसोबतच रिंकूचे क्षेत्ररक्षणही जागतिक दर्जाचे असल्याने मैदानात त्याचा वावर प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करणारा ठरतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.