भारतात नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये बांग्लादेशच्या सहभागावरून निर्माण झालेला वाद आजही थांबण्याचे नाव घेत नाहीये. या स्पर्धेतून बांग्लादेशने माघार घेतल्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. आता स्पर्धेला तीन महिने उलटल्यानंतर, बांग्लादेशचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज लिटन दास याने या निर्णयामागील धक्कादायक सत्य समोर आणले आहे. लिटन यांच्या या विधानामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (BCB) आणि तत्कालीन क्रीडा प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लिटन दास यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले की, भारत दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय हा खेळाडूंचा नव्हता. पूर्व क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी केलेला दावा फेटाळून लावताना लिटन म्हणाले की, खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांच्यात कोणतीही चर्चा झाली नव्हती. सुरक्षेचे कारण पुढे करून खेळण्यास नकार देणे, हा निर्णय खेळाडूंच्या पूर्णपणे विरोधात होता. बोर्डाने खेळाडूंना विश्वासात न घेता परस्पर हा कठोर निर्णय घेतला, जो पूर्णतः एकतर्फी होता.
लिटन यांनी जानेवारी महिन्यात खेळाडूंसोबत झालेल्या बैठकीला केवळ एक 'दिखावा' आणि 'मीडिया स्टंट' म्हटले आहे. त्यांच्या मते, त्या बैठकीत कोणत्याही प्रकारची सकारात्मक चर्चा किंवा खेळाडूंच्या शंकांचे निरसन झाले नाही. खेळाडू तिथे केवळ उपस्थित राहण्यासाठी आणि चहा-पाण्यासाठी गेले होते. खेळाडूंना केवळ क्रिकेट खेळायचे होते, परंतु त्यांच्या भावनांना आणि इच्छेला बोर्डाने साफ डावलले. खेळाडूंच्या मतांचा आदर करण्याऐवजी प्रशासनाने आपली राजकीय भूमिका लादणे पसंत केले.
सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करताना लिटन दास यांनी पाकिस्तान दौऱ्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, "जेव्हा आम्ही पाकिस्तानला गेलो होतो, तेव्हा आमच्या रूमच्या बाहेर सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात होते. ती परिस्थिती अधिक तणावपूर्ण होती. तिथे आम्ही खेळलो, तर मग भारतात सुरक्षेचा प्रश्न का निर्माण झाला?" आयसीसीने स्वतंत्र सुरक्षा तपासणी करून बांग्लादेशसाठी भारत सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिले होते, तरीही बोर्ड आपल्या निर्णयावर ठाम राहिले. बोर्डाच्या या हट्टीपणामुळे अखेर आयसीसीला बांग्लादेशची जागा स्कॉटलंडला द्यावी लागली, ज्यामुळे बांग्लादेशी खेळाडूंचे मोठे नुकसान झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.