India boycott Asia Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणावाचा थेट परिणाम आता क्रिकेटच्या मैदानावरही दिसून येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने २०२५ मध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत न खेळण्याचा आणि त्याचे यजमानपद स्वीकारण्यालाही स्पष्ट नकार दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही इंग्रजी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांमधील वाढत्या भू-राजकीय आणि लष्करी संघर्षामुळे बीसीसीआयने हा कठोर निर्णय घेतल्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. यावर्षी आशिया कपचे आयोजन भारत आणि श्रीलंका करणार होते. मात्र, आता भारताने घेतलेल्या कथित माघारीमुळे या स्पर्धेच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इतकेच नव्हे, तर पुढील महिन्यात श्रीलंकेत होणारी महिलांच्या इमर्जिंग टीम्स आशिया कप स्पर्धाही भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या आशिया कप स्पर्धेबाबत अंतिम निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेच्या आगामी बैठकीत होईल. विशेष म्हणजे, या परिषदेचे अध्यक्षपद सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडे आहे. तरीही, भारताने या स्पर्धेत खेळणार नसल्याचे आणि त्याचे आयोजनही करणार नसल्याचा स्पष्ट निर्णय कालवल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे असल्याने, स्पर्धेच्या आयोजनातील सर्व आर्थिक नुकसान त्यांना सोसावे लागण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचा हा निर्णय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांबाबतच्या धोरणातील एका मोठ्या बदल ठरू शकतो. यापूर्वी अनेकदा दोन्ही देशांमधील राजकीय तणावाचा परिणाम क्रिकेट सामन्यांवर झाला असला तरी, थेट स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय अधिक कठोर मानला जातोय.
भारताच्या या भूमिकेमुळे २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्त्वाची मानली जाणारी आशिया कप स्पर्धा आता धोक्यात आली आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या प्रमुख पाच संघांचा समावेश असतो आणि गतविजेता भारत असल्याने या निर्णयाचे महत्त्व अधिक आहे.
मागील काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. अनेक बहुपक्षीय स्पर्धांमध्ये हायब्रिड मॉडेलचा अवलंब करण्यात आला होता. २०२३ चा आशिया कप तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानने आयोजित केला असला तरी, भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. यावर्षीच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताने पाकिस्तानला न जाता दुबईत आपले सामने खेळले होते. मात्र, आता थेट स्पर्धेतून माघार घेण्याचा बीसीसीआयचा निर्णय दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांवर दीर्घकाळ परिणाम करू शकतो. राजनैतिक संबंध सुधारल्याशिवाय क्रिकेटच्या मैदानावर दोन्ही प्रतिस्पर्धकांमध्ये पुन्हा सामना रंगण्याची शक्यता कमीच दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.