Goa Water Issue |River
Goa Water Issue |River Dainik Gomantak
गोवा

Goa Water Issue: ‘हलतरा’ धरणामुळे वाळवंटीवर संकट!

दैनिक गोमन्तक

Goa Water Issue: कर्नाटकने म्हादईची कळसा उपनदी उद्‍ध्वस्त केल्याने म्हादईवर परिणाम दिसून येत आहेत. भविष्यात ‘हलतरा’ धरणासाठीही हालचाली सुरू झाल्यामुळे वाळवंटी नदीवर परिणाम होणार आहे. शिवाय वझरा-सकला धबधबाही बंद होण्याची शक्यता आहे. कारण चोर्लातील हलतरा नदीवरच येथील धबधबे अवलंबून आहेत.

घाटावरून येणारे पाणी वळवल्यास या भागातील जलस्रोत कमी होणार असून जनजीवनावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मत पर्यावरणप्रेमी मधू गावकर यांनी प्रत्यक्ष परिसरात गत दोन दिवसीय पाहणीप्रसंगी सांगितले.

म्हादईची उपनदी हलतरावर कर्नाटकने धरण किंवा बंधारा बांधल्यास या परिसरातून येणाऱ्या पाण्यावर परिणाम होणार आहे. पाणी कमी झाले तर वझरा, सकला धबधबा भविष्यात गायब होणार आहे. कारण हलतरातून येणारे पाणी विर्डी परिसरात येते.

कट्टिका नाल्यात ते जमा होते, त्यानंतर पुढे इतर नाले मिळतात आणि पुढे वाळवंटी नदीत येते. हीच वाळवंटी नदी केरी, घोटेली, साखळी असा प्रवास करीत आमोणा परिसरात म्हादई-मांडवीला मिळते. या सर्व परिसरावर हलतरावर धरण बांधल्यास परिणाम होणार आहे.

रमणीय असे वझरा, सकला धबधबे व तेथील सदाबहार निसर्गावर संक्रांत येणार असून जैविक संपत्तीवरही निश्‍चित परिणाम होण्याची शक्यता गावकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील विर्डीचे ग्रामस्थ कर्नाटकच्या हालचालीसंदर्भात जागृत झाले असून त्यांनीही विरोध केला आहे. परंतु अद्याप या भागातील अनेकांना हलतरावर धरण बांधल्यास उद्‍भवणाऱ्या परिस्थितीची कल्पना नाही. या ग्रामस्थांतसुद्धा जागृती निर्माण करण्याची आवश्‍यकता आहे. गोवा व महाराष्ट्राच्या या परिसरातील अनेक गावे जलस्रोतावर अवलंबून आहेत.

पाणीच कमी झाले तर शेती, बागायतीबरोबरच जैवविविधतेवरही संकट येणार आहे. त्यादृष्टीने ग्रामस्थांनी विरोध करणे गरजेचे आहे. विर्डीपासून शिरोली, केरी, घोटेली, तळेखोल, पर्ये परिसरातील पाणी कमी होणार आहे.

गोडे पाणी कमी झाल्यास निश्‍चितपणे खारे पाणी आतपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारीवरही परिणाम होईल, असेही गावकर यांचे मत आहे.

विर्डी धरणही नकोच!

कट्टिका नदीवर महाराष्ट्र सरकारने अर्धवट बांधलेले धरणही गोव्यासाठी धोकादायकच आहे. पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर व इतरांच्या विरोधामुळे हे धरण पूर्ण होऊ शकले नाही. अनेक परवाने न घेताच महाराष्ट्र सरकारने काम सुरू केले होते. ते काम बंद पाडल्यामुळे काही प्रमाणात गोव्याला दिलासा मिळाला आहे.

परंतु भविष्यात हे धरण गोव्यासाठी घातक ठरणार आहे. तेव्हा हे विर्डी धरण गोव्यासाठी नकोच आहे. हलतराचे पाणी कमी झाल्यास येथील पाणीसाठा कमी होणार आहे. येथील जलस्रोत जिवंत ठेवण्यासाठी गोवा, महाराष्ट्र सीमेवरील लोकांसाठी शासनाने बाजू मांडली पाहिजे. कर्नाटकच्या मनमानी कारभाराला आळा घातला पाहिजे, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

जागरूक वनाधिकारी हवे!

कट्टिका नदीचे पात्र किंवा हलतरावर अवलंबून असलेल्या धबधबा परिसरात जानेवारीतच पाणी कमी झाल्याने समस्या निर्माण होत आहे. सध्या या पत्रात पाणीसाठा जेमतेमच आहे. कारण हलतरा किंवा इतर परिसरातील जंगलावर मानवी आघात होत असल्यामुळे पावसावरही परिणाम झाला आहे. निसर्गचक्र बदलत आहे.

त्याचा परिणाम म्हणून जानेवारीतच या पात्रातील पाणीसाठा कमी होत आहे. हलतरावर धरणाला विरोध करण्याबरोबरच परिसरातील जंगलतोडीला विरोध केला पाहिजे. वनाधिकारी, वनपालांनी जागरूक राहिल्या जंगले आणि जलसाठाही वाचेल, असेही मधू गावकर म्हणाले.

पाणी प्रकल्पावर परिणाम

साखळी आणि पडोशे या दोन्ही वॉटर ट्रिटमेंट प्लांटवर देखील हलतरा धरणाचा मोठा दुष्परिणाम होऊन सत्तरी, डिचोली आणि बार्देश तालुक्यातील जनतेला पाण्याचे दुर्भिक्ष्य सोसावे लागेल. विर्डी धरण प्रकल्प बंद झाल्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी हलतराचे पाणी बंद झाल्यास तीनही तालुक्याच्या जलपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.

सध्याच काही ठिकाणी नळ कोरडे पडत आहे. टॅंकरचा वापर करावा लागत आहे. त्या ठिकाणी भविष्यात पाणी पोचणे कठीण होईल, असा इशारा पर्यावरण अभ्यासकांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT