

साळ: तिलारी कालव्याचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून खंडित झाल्याने लाटंबारसे परिसरातील सोनारभाट, लाडफे, नानोडा, भटवाडी आदी भागांतील शेती व बागायती संकटात सापडल्या आहेत. पाण्याअभावी मिरची, भाजीपाला, केळी तसेच हिरव्या चाऱ्याची पिके करपण्याची भीती निर्माण झाली असून तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकऱ्यांनी पडीक जमीन लागवडीखाली आणली आहे. तिलारीच्या पाण्यावर अवलंबून राहून भातशेतीबरोबरच मिरची, भाजीपाला व अन्य बागायती पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.
मात्र ऐन उन्हाळ्यात कालव्यातील पाणी गायब झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.महादेव गाड्डी, दत्ता गाड्डी, नारायण साळगावकर, लक्ष्मण वझे, महेश वझे, श्रीकांत मळीक, अजित आंबोस्कर आदी शेतकऱ्यांनी सांगितले की, पाणीपुरवठा सतत अनियमित राहिल्याने उभी पिके धोक्यात आली आहेत.
या भागात अनेक शेतकरी वर्षभर मिरची व भाजीपाला लागवड करतात. तसेच दूध व्यवसायासाठी हिरव्या चाऱ्याची लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. पाण्याअभावी या सर्व पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नानोडा परिसरातील शेतकरी पावसाळी पिकांबरोबरच भाजीपाला उत्पादनावर अवलंबून आहेत. ऑक्टोबरपासून मेहनत घेऊन उभी केलेली पिके आता पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असल्याची खंत जयेंद्र केरकर, वासुदेव गाड, प्रभाकर गावणेकर, दीपक वझे, जयंत सिद्धये, दयानंद भुस्कुटे, रामा म्हवलिंगकर आणि संतोष कलंगूटकर यांनी व्यक्त केली. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या प्रश्नाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून शेती व बागायतींसाठी तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.