रत्नागिरी: जगबुडी नदीच्या पुलावरुन १०० फूट खोल खाली कार कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जाताना रत्नागिरीच्या खेड येथील भरणा नाका येथे सोमवारी (१९ मे) पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
मेधा पराडकर, सौरभ पराडकर, मिताली मोरे, निहार मोरे, श्रेयस सावंत असे या अपघातात मृत्यू झालेल्या ५ जणांची नावे आहेत. पराडकर कुटुंब नालासोपारा तर, मोरे कुटुंबीय मिरा-भाईंदरमध्ये राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पराडकर आणि मोरे कुटुंबीय अंत्यविधीसाठी मुंबईमधून देवरुख येथे जात होते. मुंबई - गोवा महामार्गावरुन जात असताना भरणे नाका येथे कार जगबुडी नदीच्या पुलावरुन १०० फूट खोल नदीत कोसळली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले पण, यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, कार चालक गंभीर जखमी झाला आहे. कारचा देखील चक्काचूर झाला आहे.
दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच आहे. गेल्या आठवड्यात देखील या महार्गावरील दुहेरी अपघातात दोघांचा मृत्यू आणि आठजण जखमी झाले होते. ओरोस येथे डंपरखाली चिरडून दोघांचा मृत्यू झाला होता. अनिल माळवे (१८) आणि विनायक मोहन निळेकर (२२) या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.
या अपघातात आठजण जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई - गोवा महामार्गावरील अपघाताचे ग्रहण कधी सुटणार हा प्रश्न सातत्याने कोकणातील प्रवासी उपस्थित करत आहेत. १२ वर्षापासून रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.