Tata Group Crisis Dainik Gomantak
गोवा

Tata Group Crisis: टाटांच्या 'ट्रस्ट'वरच अविश्वासाचे सावट? ऐतिहासिक वारसा असलेल्या समूहात सत्तेवरून वादाची ठिणगी!

Tata Trust Dispute 2026: एकूण ३० लाख कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या टाटा समूहातील वाद भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करू शकतो.

दैनिक गोमन्तक डिजिटल

अरुण जयराम कामत

एकूण ३० लाख कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या टाटा समूहातील वाद भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे धास्तावलेल्या केंद्र सरकारला या ट्रस्टच्या वादात लक्ष घालावे लागलेय. एकंदर ‘ट्रस्ट’च्या विश्‍वासाचा प्रश्‍न उभा राहिला आहे.

२०२६ च्या पद्म पुरस्कार वितरण सोहळा नुकताच राष्ट्रपती भवनात पार पडला. हा कार्यक्रम पाहताना २००० सालातील पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यातील एक विलक्षण योगायोग आठवला. त्या वर्षी ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते डॉ. माशेलकर आणि श्रीयुत टाटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. वरवर पाहता साधी वाटणारी गोष्ट. पण ह्यात एक विशेष बाब होती. राष्ट्रपती नारायणन हे आपले शिक्षण टाटा स्कॉलरशीप मिळाल्यामुळे पूर्ण करू शकले होते. टाटा ट्रस्टच्या शिष्यवृत्ती मिळाल्या नसत्या तर राष्ट्रपती नारायणन आणि शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या आयुष्याला कदाचित दुसरे वळण लागले असते.

राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याहस्ते पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारे रतन टाटा हे टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष होत. असा हा दुर्मिळ योगायोग त्या दिवशी जुळून आला होता. दूरदृष्टीच्या स्व. जमशेदजी टाटा यांनी १८६८ साली टाटा उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. १९०२ साली जमशेदपूर हे देशातील पहिले नियोजनबद्ध औद्योगिक शहर निर्माण केले.

स्व.जमशेदजी टाटांनी १८९८ साली आपल्या वैयक्तिक संपत्तीमधील ३० लाखांची मालमत्ता (जवळपास त्यांची अर्धी संपत्ती) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या उभारणीसाठी दान केली. बंगळुरूस्थित ह्या संस्थेने आज संशोधन क्षेत्रातील जागतिक दर्जाची संस्थात स्थान निर्माण केले आहे.

सर रतनजी टाटा हे जमशेटजींचे धाकटे पुत्र होते.

रतनजींचे अकाली(१९१८ मध्ये) निधन झाले. सर रतन यांनी इच्छापत्रात नोंदवले होते; माझी संपत्ती शिक्षण, ज्ञान आणि उद्योगाच्या प्रगतीसाठी, ज्यात अर्थशास्त्र, स्वच्छता विज्ञान आणि कला यातील शिक्षण तसेच इतर सार्वजनिक उपयोगाच्या कामांसाठी द्यावा.’ त्यासाठी सर रतन टाटा ट्रस्टची स्थापना १९१९ मध्ये ८० लाखांच्या निधीसह झाली आणि आज ती देशातील सर्वात जुन्या अनुदान देणाऱ्या संस्थांपैकी एक आहे.

जमशेदजी टाटा यांचे सुपुत्र सर दोराबजी टाटा यांनी वडिलांच्या निधनानंतर १९०४ साली टाटा समूहाची धुरा हाती घेतली. आपल्या मृत्यूपूर्वी १९३२ साली सर दोराबजी यांनी जवळपास एक कोटीची आपली सर्व संपत्ती दान करून सर दोराब टाटा ट्रस्टची स्थापना केली. ल्युकेमियाने मृत्यू पावलेल्या स्वर्गवासी पत्नीच्या नावे अडीच दशलक्ष रुपये देणगी देऊन लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट स्थापन केले.

‘समाज हा व्यवसायातील केवळ एक भागधारक नाही, तर तो व्यवसायाच्या अस्तित्वाचा मूळ उद्देशच आहे.’ टाटा उद्योगसमूह स्थापन करताना जमशेदजी टाटा यांनी आपले धोरण स्पष्ट केले होते.

टाटा सन्समध्ये प्रमुख म्हणजे ६६%भागीदारी आहे ती वर उल्लेखित विविध टाटा ट्रस्टची. सर दोराबजी टाटा ट्रस्टची २७.९८% टक्के तर सर रतन टाटा ट्रस्टची २३.५६% टक्के हिस्सेदारी आहे.

शिवाय अन्य टाटा ट्रस्टची १५%. म्हणजे टाटा कंपन्यामधील एकूण नफ्यातील दोन तृतीयांश नफा हा ट्रस्टमार्फत विविध समाजपयोगी उपक्रम व संस्थासाठी विनियोग केला जातो. उद्योगातील नफा हा समाजासाठी आहे, या तत्त्वावर आधारित हे प्रारूप जगभरातील उद्योजकांसाठी अचंब्याचा विषय आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये रतन टाटा यांचे निधन झाले. त्यानंतर टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यांच्यामधील संबंधात तणाव निर्माण होऊ लागला.

स्व. रतन टाटानंतर त्यांचे सावत्र भाऊ नोएल नवल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली.

मेहली मिस्त्री यांच्या टाटा ट्रस्ट बोर्ड वरील फेरनेमणुकीचा प्रस्ताव २०२५ साली ट्रस्टच्या बैठकीपुढे आला. ट्रस्ट वरील नोयल टाटा समर्थक गटाने या पुनर्नियुक्तीला विरोध केला. रतन टाटा यांच्या निधनानंतर विविध ट्रस्टींचे परस्पर विरोधी दृष्टीकोन उघडपणे समोर येऊ लागले.

अगदी १९८९ मधील एक प्रकरण उफाळून आले आहे. १८ जानेवारी १९८९ रोजी ‘नवाजबाइ रतन टाटा ट्रस्ट’च्या मालकीचे टाटा सन्सचे ८३३ इक्विटी शेअर्स दिवंगत नवल होर्मसजी टाटा यांच्या वैयक्तिक नावे हस्तांतरित केले. टाटा सन्सच्या शेअर रजिस्टरमध्ये या व्यवहाराचे मूल्य ‘शून्य’ असे नोंदवण्यात आले. या हस्तांतरणाला १२ मे २०२६ रोजी तक्रारदार सुरेश पाटीलखेडे यांनी ॲड. कात्यायनी अग्रवालमार्फत हरकत घेतली आहे.

टाटा ट्रस्टमधील मतभेद मुख्यतः टाटा सन्सच्या संचालक मंडळावर कोणाचे प्रतिनिधित्व असावे, निर्णय प्रक्रिया कशी असावी आणि ट्रस्ट्सने टाटा सन्सवर किती नियंत्रण ठेवावे यावर केंद्रित आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या एकतृतीयांश जागा टाटा ट्रस्टच्या नामनिर्देशित प्रतिनिधींसाठी राखीव असतात. सध्या टाटा सन्सच्या संचालक मंडळावर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा आणि उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन हे दोन ट्रस्ट प्रतिनिधी आहेत.

या दोघांमध्येही अनेक विषयांवर तीव्र मतभेद आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष नोयल टाटा यांनी आपले सुपुत्र नेव्हील टाटा यांची ट्रस्ट बोर्डवर केलेली नेमणूक ही घराणेशाहीची नांदी असल्याची टीका होत आहे.

खुद्द टाटा सन्स सध्या कठीण कालखंडातून जात आहे. एअर इंडिया विमानसेवेतील वाढता तोटा समूहाला डोईजड होत आहे.

ह्यात भर पडली आहे, ती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांची. नवीन नियमांनुसार मध्यवर्ती बँकेने टाटा सन्सचे वर्गीकरण ‘अप्पर-लेयर नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी’ म्हणून केले आहे. या वर्गीकरणामुळे कंपनीला अनिवार्यपणे शेअर बाजारात सूचिबद्ध व्हावे लागेल. या अटींच्या पूर्ततेसाठी आरबीआयने दिलेली तीन वर्षांची मुदत आता संपुष्टात आली आहे.

ट्रस्टचे संचालक वेणू श्रीनिवासन यांनी उघडपणे टाटा सन्सच्या नोंदणीचे समर्थन केले आहे, तर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा शेअर बाजारातील लिस्टिंगच्या विरोधात आहेत.

काही महिन्यांपूर्वी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा, उपाध्यक्ष वेणू श्रीनिवासन, संचालक डारियस खंबाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.

एकूण ३० लाख कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या टाटा समूहातील वाद भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे धास्तावलेल्या केंद्र सरकारला ह्यात लक्ष घालावे लागले.

१९८९ च्या शेअर हस्तांतरणाचा प्रश्न सिद्ध झाला, तर टाटा ट्रस्टच्या मालकी संरचनेलाच मोठा धक्का बसू शकतो.

शिवाय मेहली मिस्त्री- टाटा वाद, श्रीनिवासन- टाटा वाद, महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांकडे असलेल्या तक्रारी यामुळे टाटा ट्रस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ज्या नैतिक मूल्यांच्या आधारावर सर जमशेदजी टाटा, सर दोराबजी टाटा, सर रतनजी टाटा यांनी ट्रस्ट स्थापन केले त्या नैतिक मूल्यांना आज कायद्याच्या कसोटीवर खरे उतरायचे आहे. ‘ट्रस्ट’च्या विश्वासाचा प्रश्न उभा राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Farming Crisis: खत महागले, शेतकऱ्यांचे गणित बिघडले; इंधन दरवाढीचा परिणाम, सरकारने हस्तक्षेप करावा, शेतकऱ्यांची मागणी

Kendra Yog 2026: मुलांच्या विवाहाचे प्रस्ताव रखडणार, धनलाभाचेही मार्ग होणार कठीण! 26 जूनपासून 'केन्द्र योग' 5 राशींसाठी ठरणार धोकादायक

पॉक्सो प्रकरण; आरोपी डॉक्टरला प्रशिक्षणासाठी रुग्णालयात परतण्याची परवानगी, विशेष न्यायालयाचा सशर्त दिलासा

Goa Smart City: पणजी होणार 'स्मार्ट आणि सुरक्षित'; उर्वरित भागातही बसवले जाणार सीसीटीव्ही

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8 व्या वेतन आयोगाआधी 'महागाई भत्त्या'त दोनदा होणार वाढ

SCROLL FOR NEXT